Monday, May 22, 2017

IPL 2017

 दीड महिना चालू असलेले IPL काल संपले.कोण जिंकले,कोण हरले,कोणी पर्पल कॅप घेतली,कोणाची ऑरेंज कॅप हुकली,सर्वोत्कृष्ट कॅच,इमर्जिंग प्लेयर,ग्लॅम शॉट आणि या सारख्या अनेक चर्चा सोशल मीडियावर रंगल्या.आवडत्या प्लेयरमुळे होणारी आवडती टीम किव्वा नावडता खेळाडू असल्यामुळे येणारा कडवटपणा यांची प्रतिबिंबे फेसबुक,व्हाट्सअँप आणि ट्विटरने अनुभवली.

सुमारे पन्नास दिवसांच्या या कालखंडात एक प्रेक्षक म्हणून मी काय अनुभवले हा एक गमतीशीर विषय आहे.फक्त मैदानावरील वाटचाली तर सगळेच पाहतात पण जाहिरातींमधील वाटचाल देखील अनुभवण्यासारखी होती.वोडाफोनने दाखवलेले म्हातार्यांचे गोव्याचे हनिमून.अगदी गोव्याला निघण्यापासून ते परतीच्या प्रवासापर्यंत सरणारा त्यांचा रोमँटिक प्रवास मी या साठ मॅचेस बरोबर अनुभवला एकीकडे सामन्यागणिक कोहली आणि ए बी डिव्हिलियर्सचे हातापायावरचे टॅटू निघत होते आणि हे म्हातारं जोडपं दर दिवशी नवीन टॅटू काढत गोव्याभर फिरताना मी अनुभवत होतो.अगदी पुण्यासारखीच असलेली शिकाऊ 'चोंकपूर चिता' ची टीम दिवसागणिक प्रगती करत होती.हैद्राबादच्या भुवनेश्वर प्रमाणेच या चोंकपूरच्या ध्यानीसिंग नि देखील कमाल केली.अडचणींवर मात करत बॅटिंग करणारा पुण्याचा राहुल त्रिपाठी आणि या चोंकपूरचा 'पप्पी' पाहताना दोन ओव्हरच्या मध्ये अजून एक मॅच पहात असल्याचा भास मला होत होता.अर्थात रंग उडवणारी आलिया भट मध्ये नाचून नाचून नको करत होती.मॅचच्या मध्येच समजा TV लावला तर 'तुम्हे तो येह भी नही पता' असं सांगून समोरच्याचा कचरा करत पार्लेजी घशाखाली सारणाऱ्या बायका मजेशीर वाटायच्या.जणू,एक बाई आपल्याला संगतीये कि 'तुम्हे तो येह भी नही पता नही की' जयदेव उनाडकटने लास्ट ओव्हर मेडन हॅट्रिक डाली है'.आणि मग नक्की काय झालं हे मी रिप्ले मध्ये पहायचो. सिएट टायरने दिलेल्या स्ट्रॅटेजिक टाइमआउट मध्ये किती लोकांनी जेवताना वाळलेले हात धुतले आहेत. 'वोह फायर है तो मै वायर है' असं म्हणणारा तो हॅवेल्सचा वाघ जरी ५० दिवस सारखाच असला तरी प्रत्येक दिवसाला सामन्यागणिक बदलणारा वाघ वेगळाच होता.पॉलीकॅबच्या वायर वापरून वीजबिलात कपात करा सांगणारा आणि विविध भाषा अवगत असलेला आणि त्याहून मजेशीर म्हणजे एकाच बिल्डिंग मध्ये भारतातील सर्व राज्यातील बिऱ्हाडांसोबत राहणारा परेश रावल लक्षात राहिला.हे म्हणजे 'Divided by the IPL but United by the Polycabs'सारखं झालं.आणि याच्या सोबतीला 'दहा वर्ष तुमच्या नावावर' असं वाजत गाजत सांगणारे IPL चे ढोल ताशे अशा गोष्टी आपण दहा वर्ष पहात आलोय यांची जाणीव करून देत होते.जीओ धन धना धन म्हणत सगळ्या टीम्स आणि त्यांच्या खेळाडूंना नाचवणारा शेवटी खऱ्या अर्थाने नाचला आणि जिंकलापण, बाकीचे तसेच नाचत राहिले.

आधीच्या IPL मध्ये खालून एक किव्वा फारतर दोन वर असणारी पुण्याची टीम फायनल खेळेल असेल कधीच वाटले नव्हते.त्यातही मुंबईसारख्या टीमला एकाच स्पर्धेत तीन वेळा हरवेल याची सूतराम शक्यता देखील नव्हती.अर्थात मुंबईने पुण्याला फायनल मध्ये हरवले हा भाग अजूनच वेगळा.पण या गडबडीत सगळ्यात जास्त मजा आली ती लोकांचे व्हाट्सअँप,फेसबुक आणि ट्विटर वरचे मेसेज वाचून.शहराची तयार झालेली प्रतिमा आणि त्यानुसार एकमेकांवर तयार होणारे विनोद याची परमसीमा यावेळी गाठली गेली.पुणे आणि मुंबई जर फायनल खेळत असतील तर उपहासात्मक विनोदांना गगन ठेंगणं होतं याची प्रचिती आली.यात चितळे बंधू,दगडूशेठ,सिद्धिविनायक आणि मिसळपाव,शनिवारवाडा या (hp) गोष्टी सुद्धा सुटू शकल्या नाहीत तिथे अशोक दिंडा सारख्याच काय ?.लोकांची क्रिएटिव्हिटी अशा ठिकाणी इतक्या पराकोटीला कशी जाऊ शकते याचा अचंबा मला कायमच वाटतो.इथून पुढील काळात जर तिसरे,चौथे किव्वा कुठलेही महायुद्ध व्हाट्सअँपवर लढायचे ठरवले तर भारताला शह देऊ शकणारा एकही देश या पृथ्वीवर आहे असे मला वाटत नाहीं .IPL चा शेवट आफ्रिदीच्या आईची ओटी भरून करण्यात आला आणि चार जूनला होणाऱ्या भारत पाकिस्तान सामन्याआधी याच क्रिएटिव्हिटीच्या पुनःप्रत्ययाची नांदी निश्चित झाली.

जेमतेम तीन चार दिवसांची उसंत आणि मग चॅम्पियंन्स ट्रॉफीची सुरुवात आहे.इतकेदिवस उलट सुलट,वेडेवाकडे आणि शिवीगाळ या भाषेत सुसंवाद साधणारे आणि तरीही 'fair play' चे पैसे घशात घालणारे सर्वजण पुन्हा एकदा देशासाठी एकमेकांसमोर उभे ठाकतील.राज्यभक्तीची जागा राष्ट्रभक्तीने घेतली जाईल.पण या सर्वांमध्ये आपल्याला आनंद कशात मिळतो हे आपण ठरवायचे.क्रिकेट पाहणे,पाठिंबा देणे या गोष्टी तर मी लहानपणापासूनच करत आलोय.पण त्या बरोबरच डोळे आणि कान उघडे ठेऊन सभोवताली सुरु असलेल्या प्रतिक्रियांनी स्वतःचे मनोरंजन करून घेण्याच्या नवीन संधी मी हल्ली शोधत असतो.

चला तर मित्रहो तूर्तास विश्रांती घेतो.चॅम्पियंन्स ट्रॉफीच्या अगोदर IPL च्या फोटोने भरून वाहत असलेली फोनची गॅलरी आधी रिकामी करतो कारण मागचे दोन महिने तर लुटुपुटुची लढाई होती आता तर खुद्द पाकिस्तान आणि बांगलादेश आहेत. 

पु.ल तेव्हा म्हणाले होते कि क्रिकेट हा खेळण्याचा विषय नसून बोलण्याचा आहे.आज पु.ल असते तर नक्की म्हणाले असते कि क्रिकेट हा खेळण्याचा विषय नक्की नसून बोलण्याचा,पाहण्याचा,टीका करणे,विनोद,चेष्टा,मस्करी,उपहास,राग,आनंद या सर्व भावनांचा वापर करून व्यक्त होण्याचा विषय आहे.आणि यासाठी व्हाट्सअँप,फेसबुक आणि ट्विटर नव्याने सज्ज आहेतच. 

- हृषिकेश

 

Monday, May 8, 2017

पिसारा

 स्वतःचे सौन्दर्य आरशात न्याहाळण्याच्या मोहातून मनुष्य सुटला नाही तिथे या प्राण्यांचे काय.निसर्गाने मुक्तहस्ताने उधळलेली सौन्दर्य समृद्धी न्याहाळत असताना टिपलेली हि आपल्या राष्ट्रीय पक्षाची मुद्रा.

मध्यभारतातील उन्हाळा काहीसा उतरणीला लागला असे फक्त वातावरण निर्माण झाले आणि क्षणापुरता का होईना पण सूर्याने एका धागामागे विसावा घेतला.ढगांशी वारा तर झुंजला होता पण अजून काळा काळा कापूस पिंजायला तसा अवकाश आहे.मात्र हा तात्पुरता बदल या पक्षाला पिसारा फुलवण्यासाठी पुष्कळ ठरला.


 

मोराची पिसे पुस्तकात किव्वा वहीत ठेवण्यापासून ते डोळ्यासमक्ष फुलणारा पिसारा न्याहाळण्यापर्यंतचा प्रवास आज येथे पूर्ण झाला.जंगल म्हणल्यावर आणि त्यातही 'टायगर रिसर्व' असल्याने वाघासाठी आसुसलेली नजर काही काळ का होईना या पक्षावर खिळून राहते.या आणि अशा अनेक गोष्टी जंगल आपल्याला दाखवते.

असा देखावा साधारण मे महिन्याच्या सुरुवातीपासून पहायला मिळू शकतो.पंचतंत्र किव्वा लहानपणीच्या गोष्टींच्या पुस्तकावरून पावसाळ्यात मोर पिसारा फुलवतो अशी जरी माहिती आपल्याला असली तरी ती संपूर्ण चुकीची नाहीये.पण मोराच्या जीवनचक्रानुसार वंशवेल वाढवण्याची हीच ती वेळ आहे त्यामुळे भारतातील जंगलात उन्हाळयाच्या उत्तरार्धात हे दृश्य पाहणे कायमच आनंददायी ठरते.'पावसाच्या रेघात खेळ खेळू दोघात निळ्या सवंगड्या नाच' या ओळीची प्रचिती घेण्याची संधी फार कमी मिळते कारण एकतर पावसाळ्यात जंगल अधिकृतरीत्या बंद असते.आणि पाऊस पडत असताना हा सवंगडी आपल्या समोर येईलच याची शाश्वतीही नसते.

Peacock | Kanha National Park | May 2017

 

Wednesday, May 3, 2017

जिप्सी आणि वाघ

 ५०-७५ मीटरवर वाघ आहे याची खात्री आणि जाणीव इथे प्रत्येकालाच आहे कारण त्याची पाठ व्यवस्थित दिसतीये.भले त्याची काही हालचाल नाहीये.कधीतरी उठेल या आशेने एकटक त्याच्याकडे पहात ताटकळत उभे राहण्यासारखी वेडी आशा नाही.किमान तो एकदा उठावा एक मिनिटापुरता का होईना पण समोर यावा आणि पुन्हा झुडपात नाहीसा झाला तरी बेहेत्तर या एका इच्छेखातर वाट बघणाऱ्या या जिप्सी त्या घनदाट अभयारण्यात मजेशीर वाटतात.


 

असाच तास दीडतास सरतो.हट्टी वाघ जागचा हालत नाही आणि इतकावेळ रोखलेले श्वास हालचालींद्वारे,आळसाद्वारे बाहेर निमूटपणे मोकळे व्हायला लागतात.लागलेली तहान शमवली जाते.आणि वाघाची जागा सोडून इतरही जागा न्याहाळायला सुरुवात होते.अशाच परिस्थितीत दुसऱ्यांच्या जिप्सी मधील हालचाली अनुभवण्याची मजा काही वेगळीच असते.आमच्याच समोर असलेल्या गाडीचे टिपलेले हे छायाचित्र.

स्वभाव आणि परिस्थिती याची सांगड घालून या छायाचित्राचे पैलू नजरेसमोर येतात.इतकावेळ गाडीत बसलेले सगळेजण आता वाघाच्या आशेने उभे राहिलेत.काही लोक अजूनही बोट दाखवून वाघाची जागा निश्चित करण्यात मग्न आहेत.तर काही लोक त्याला मार्गदर्शन करत असावेत.वाघाची निश्चित जागा कदाचित अजूनही काहींना समजलेली नसते. काही लोकांना समोरून कोणीतरी फोटो काढतोय याची चाहूल लागताच भले परिस्थिती काही असो आपला फोटो व्यवस्थितच आला पाहिजे अशी अट्टाहास असतो.दोन तास थांबूनही चेहऱ्यावरचे हास्य अबाधित ठेवून 'फोटोसाठी काहीही' हा बाणा जपणारे हसतमुखाने कॅमेऱ्याला सामोरे जातात.काही लोकांना कोणी आपला फोटो काढतोय किव्वा आजूबाजूला काही घडतंय याची जाणंही नसते.ते आपल्याच नादात असतात.थोडक्यात काय तर प्रत्येकजण आपापल्या विश्वात रममाण असतो.

वाघाची वाट पाहण्यात जो वेळ जातो त्या वेळात हे असे निरीक्षणाचे धंदे करण्यात मजा येते.कारण सय्यम सुटल्यानंतर किव्वा वाट पहायचा कंटाळा आल्यानंतर जो ढिलेपणा येतो तो इथे बऱ्याच वेळा जाणवतो.यात वावगं असं काहीच नाही पण फावल्या वेळात अशा गोष्टी पाहणे मजेदार असते.या नंतर वाघ दिसला किव्वा दिसला नाही हा मुद्दा पुढचा.जंगलामधील या निरव शांततेत चालू असलेल्या पाठशिवणीचा खेळात आपणच आपले मनोरंजन अशा पद्धतीने करून घेण्याचा छंदच जडलाय आता मला 😉

 

Tuesday, May 2, 2017

Sachin - A billion dreams

'क्रिकेटच्या अलीकडे आणि पलीकडे देखील खूप गोष्टी आहेत.क्रिकेट आयुष्यात एका विशिष्ट मर्यादेपर्यंत आहे मात्र जी गोष्ट शेवटपर्यंत राहणार आहे ते म्हणजे आपण एक माणूस म्हणून कसे आहोत'. या केंद्रबिंदू भोवती रेखाटलेली हि कारकीर्द.अनंत वेळा वाचलेल्या आणि अनुभवलेल्या गोष्टी पुन्हा एकदा तश्याच स्वरूपात जगणे तितकेसे उत्साहित करणारे नसते.आणि पुन्हा एकदा सचिन याला अपवाद ठरतो.१९८९ ते २०१३ या चोवीस वर्षाच्या कालखंडात ज्या ज्या गोष्टी झाल्या त्या गोष्टी आहेत तश्याच मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा पाहता पाहता सचिन कडून त्या बाबतीत ऐकणे हा अनुभव खूप वेगळा आणि मजेशीर आहे.


 

सिनेमा संपल्यावर थियेटर मधून बाहेर पडताना अनंत आठवणी,सगळ्या भावना आणि सरलेले सोनेरी दिवस पुन्हा एकदा डोकावून जातात.कारण सचिनचे चोवीस वर्षाचे करियर हे फक्त त्याचेच नाहीये.संपूर्ण भारताचा मूड एका लाकडी फळकुटाने सांभाळणारा अवलिया त्याच्याच तोंडून जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगतो तेव्हा माझ्या बालपणीच्या आणि तारुण्याच्या संपूर्ण प्रवासातले आठवणींचे बुकमार्क आज एकदा नीट तपासून परत खोवले जातात.सिनेमाचे कथानक शूटिंगच्या जागा किव्वा प्रत्येक बारीक गोष्ट माहित असूनही पाहण्याची ओढ असणे यातच सिनेमाचे यश आहे.किंबहुना हा सिनेमा नसून सचिननेच त्याची हि चोवीस वर्ष आपल्या समोर उघडली आहेत.यात अशी एकही गोष्ट नाहीये जी आपल्याला माहित नाहीये.नवीन पहायला मिळेल या आशेने जाण्यापेक्षा जुने आणि जपून ठेवलेले आठवणीतले दिवस उलगडण्यासाठी जाणार असाल तर नक्की सिनेमाला जा.

शारदाश्रम,साहित्य सहवास, शिवाजी पार्क इथं पासून ते अगदी “Dhoniiiiiiiiiii……….finishes off in style…..a magnificent strike into the crowd…..India lift the world cup after 28 years….the party starts in the dressing room…'' पर्यंतचा प्रवास आणि शेवटी त्याच २२ यार्डला पाणावलेल्या डोळ्यांनीही नमस्कार करणारी हि वामन मूर्ती पाहताना नकळत आपल्या पापण्या देखील ओलसर होतात.आणि हेच या दोन तासाचे आणि पर्यायाने चोवीस वर्षाचे फलित आहे.

वडिलांचे खंबीर मार्गदर्शन,आईचे वात्सल्य,काळजी,अंजलीची मोलाची साथ,आचरेकर सरांचे कडक शिक्षण,सावली म्हणून वावरणारा अजितसारखा वडील भाऊ,दोन गोंडस आपत्य,प्रवासातील अडथळ्यांच्या वेळी खंबीरपणे पाठीशी ठाकलेले कुटुंब आणि मित्रपरिवार आणि 'सचिन सचिन' या एका मंत्राने घट्ट बांधले गेलेले कित्त्येक करोड भारतीय या सर्वांच्या साक्षीने घडलेला सचिन त्याच्याच तोंडून व्यक्त होताना देवाच्या मूर्तीमधील आपल्यातलाच हाडामासाचा मध्यमवर्गीय सचिन आपल्यात बेमालूम मिसळून जातो.

पोर्ट एलिझाबेथ मधील 'बॉल टेम्पेरिन्ग',मुलतान मधील ते 'डिक्लेरेशन' या गोष्टी कटाक्षाने टाळल्याचे निदर्शनास येते.पण अर्थातच २४ वर्ष विवादापासून लांब राहिलेला हा तेंडल्या आजही यापासून चार हात लांब राहिला आहे.

कर्णधारपदावरून हटवल्याचे शल्य,बाबांच्या अकस्मित जाण्याने झालेली पोकळी व्यक्त करणारा सचिन,कुटुंबाला वेळ देता आला नाही हि खंत न लपवू शकलेला सचिन आणि त्याच बरोबर या करोडो चाहत्यांना आणि २२ यार्डला उद्देशून बोलताना गहिवरून आलेला सचिन पाहताना कुठेतरी आपण भावुक होतो एवढे मात्र निश्चित.

कोणताही सिनेमा पाहण्याचे अनेक पैलू असू शकतात.कोणाला सिनेमा का आवडावा अथवा का आवडू नये हा सर्वतोपरी प्रत्येकाचा खाजगी प्रश्न आहे.सचिन विषयीचे प्रेम हे सिनेमा बघण्याचे एकमेव कारण असू शकते ते यथार्थ आणि सक्षम देखील आहे.सचिन कसा घडला यात आता खाजगी असे काही शिल्लक नाहीये कारण त्याच्या कारकिर्दीतले सगळे चढ उतार हे आपण आपल्या डोळ्यांनी आणि कानांनी अनुभवले आहेत.फक्त चित्रपट म्हणून पाहताना याचा बालपणातील काळ आणि काही घरातले आणि मित्रांसमवेत असलेले क्षण पाहताना सचिनला अजून आपल्यातला बनवतात एवढे नक्की.

हर्षा,रवी,गावस्कर, ब्रॅडमन,रिचर्ड्स,लारा,वॉर्न पासून ते अगदी धोनी,कोहली,गांगुली,द्रविड पर्यंत सगळ्यांनी मांडलेले सचिन बद्दलचे मत आदरयुक्त प्रेम व्यक्त करते.आणि हे समक्ष पाहताना एक वेगळाच आनंद मिळतो.

सर्वांनीच हा सिनेमा अगोदर पाहिलेला आहे फरक फक्त इतकाच आहे कि आपण सर्वांनी तो २४ वर्षात विभागून पाहिलाय आणि आता यावेळेस तो सलग दोन तासात आपल्यासमोर उलगडत जातो.बाकी यात तसूभरही फरक नाहीये.पण काही गोष्टी कधीही आणि कितीही वेळा पहिल्या तरी त्यातली नवलाई आणि अप्रूप संपत नाहीत.

खऱ्या अर्थाने 'बायोपिक' म्हणता येणार नाही कदाचित.पण करोडो भारतीयांच स्वप्न पूर्णत्वाला नेणाऱ्या या अवलियाच्या कष्टाची आणि पर्यायाने यशाची गाथा त्याच्याच तोंडून ऐकण्याची संधी सोडू नका कारण 'क्रिकेटवेड्या भारतातील लोकांच्या गळ्यातील ताईत बनणे हे ऐऱ्यागैऱ्याचे काम नसते त्याला फक्त आणि फक्त सचिन तेंडुलकरच व्हावे लागते.' 🙂

- हृषिकेश पांडकर