Tuesday, February 14, 2012

आमच्या गावची जत्रा...


       परवा रात्रीची गोष्ट आहे.थंडीची लाट जरा कमी झाली आहे असे वाटत असतानाच अचानक पुन्हा थंडी वाढली आणि हवामानशाळेनी या मोसमातील निच्चांकी हवामानाची नोंद केली.त्याच रात्री साधारण १० च्या सुमारास डेक्कन कडून नारायण पेठेत चाललो होतो,बाबा भिडे पुलावर थंडीने सगळ्या मर्यादा सोडल्या होत्या.कारण दोन्ही बाजूने नदी आणि संपूर्ण रिकामी जागा आहे. या पुलावरून जात असताना मला कायम तेथे लागणाऱ्या जत्रेची किव्वा रॅम्बो सर्कस ची प्रकर्षाने आठवण होते.परवा जात असताना पण मी सहज डावीकडे पाहिले तर नदीपात्रात कुठले तरी स्टेज उभारण्याचे काम चालू होते एवढ्या कडाक्याच्या थंडीत लोक काम करत होते.मी तसाच पुढे गेलो तर तिथे " जाहीर महाप्रचारसभा " असे मोट्ठे होर्डिंग लागले होते.मग मला लगेच समजले कि नदीपात्रामध्ये हि सभा होणार आहे.त्यानंतर सुमारे तासाभरानंतर मी पुन्हा घराकडे निघालो होतो.पुन्हा पुलावर आल्यावर त्या तयारीकडे लक्ष गेले.स्टेज चे काम बर्यापैकी पूर्ण झाले होते.लोक अजूनही कामात मग्न होते.मी घरी आलो.आणि अंथरुणावर येऊन झोपलो.का कोणास ठाऊक पण नदीपात्रात लागणारी जत्रा आणि निवडणूक या दोनच गोष्टी माझ्या डोळ्यासमोर येत होत्या..काहीवेळानंतर झोपेने माझ्या या विचारांवर ताबा केव्हा घेतला हे समजले देखील नाही.
           मी एका मोठ्ठ्या जत्रेच्या प्रवेशद्वारापाशी कुतूहलाने पाहत उभा होतो.काही लोक आत मध्ये जात होते काही बाहेर येत होते.मी देखील आत काय आहे ते बघुयात असा विचार करून जत्रेत प्रवेश केला.आत पाहतो तर काय सगळी कडे नुसता झगमगाट होता.विविध स्टॉल्स लागले होते.स्टॉल्स वर त्या त्या स्टॉल्स ची माहिती देणारे लोक होते.आमच्या स्टॉलवर काय चांगले आहे , आमचा स्टॉल कसा भारी आहे,आमच्या इथे काय गोष्टी मिळतात.आमच्या इथे कुठले खेळ आहेत त्यात तुम्ही जिंकल्यावर तुम्हाला काय मिळेल अशा आशयाचे मजकूर लिहिलेले बोर्ड्स,फळे बाहेर टांगलेले दिसत होते.काही स्टॉलवाले तर चक्क खुर्चीवर उभे राहून मोट्ठ्याने ओरडत लोकांचे लक्ष वेधून घेत होते.
         क्षणभर 'कुठे आलो या गदारोळात' असे देखील वाटले होते.पण मागे फिरलो नाही..आलोच आहोत तर नीट पाहून तरी जाऊयात असे वाटून मी जत्रेत एकरूप  झालो.
        थोडेसे चालत पुढे गेलो तर डाव्या बाजूला कमळाच्या आकाराचा मोठ्ठा तंबू उभारला होता ,बाहेर कमळाचे गुणधर्म,महत्व आणि उपयोग काय काय आहेत हे  दर्शवणारी मोठी चित्रे टांगलेली होती.चालत चालत त्या कमळाच्या आकाराच्या तंबूत देठामधून वाकून प्रवेश केला,आत मध्ये कमळाच्या फुलापासून बनविलेल्या शोभेच्या वस्तू,कमळाच्या पानापासून बनवलेल्या औषधी गोष्टी इत्यादींची टेबल्स मांडून ठेवलेली होती.शेजारी काही लोक इतर फुलांपेक्षा आमचे कमळ कसे गुणवान आहे हे आत आलेल्या लोकांना समजावून सांगण्याच्या प्रयत्न करत होते.आणि आपल्याकडील वस्तू त्यांच्या गळी उतरविण्याचा घाट घालत होते.
         मी या कलकलाटातून हळूच निसटलो आणि पुन्हा बाहेर येऊन बाकीची जत्रा पाहणे सुरु ठेवले.
थोडा पुढे चालत गेलो तर अजून एक  मोठ्ठा स्टॉल लागला होता जिथे एक खेळ चालू होता.मोठ्ठ्या थर्मोकोल वर एक भारताचा मोठा नकाशा काढला होता आणि त्यात सर्व राज्ये विविध रंगांनी रंगवलेली होती.आणि ते थर्मोकोल चे मोट्ठे शिट समोरच्या बाजूस लटकविलेले होते.आता जो कोण हा खेळ खेळत असेल त्याने  सर्वप्रथम काउंटरवर पैसे भरायचे, पैसे भरून झाल्यावर त्याला एक धनुष्य आणि ३ बाण मिळतात,  मग तिथे उभा असलेला त्यांचा स्वयंसेवक त्याला सांगतो कि अमुक एका राज्यावर बाण मारायचा आणि समजा तो बाण अचूक लागला तर त्यांनी जी काय बक्षिसे ठरवलेली होती ती त्यांना मिळणार.मी सुमारे १५ मिनिटे हा  खेळ पहात होतो.७-८ लोक माझ्यासमोर खेळले मोठ्या हौशीने पैसे भरून खेळले पण एकाचा देखील नेम अचूक लागला नाही.नंतर निराश होऊन 'जाऊदे पुढल्या  वेळी' असे म्हणत पुढे जात होते.तिथे असलेले स्वयंसेवक मात्र आपले बक्षीस सुरक्षित आहे आणि पैसे पण मिळत आहेत या आनंदात अजून लोकांना खेळण्याचे  आमंत्रण देत होते.
        मी देखील आता तिथून काढता पाय घेतला आणि पुढल्या स्टॉलवर स्थिरावलो.पुढे काहीतरी भलताच प्रकार चालू होता.मी व्यवस्थित जागा हेरून तिथून तो  प्रकार पाहू लागलो.मोठा स्टॉल होता त्यावर विविध रंगाच्या पाण्याचे ट्रे ठेवलेले होते.आणि प्रत्येक ट्रे शेजारी एक पांढऱ्या शुभ्र कापडाचे चौकोनी तुकडे कापून ठेवलेले होते.तर हा प्रकार असा होता कि दाराजवळ पैसे भरून आत जायचे, समोरच्या बाजूला त्यांचे लोक उभे होते.आपण सर्वप्रथम आपले पंजे स्वच्छ धुवायचे आणि पुसून त्या रंगीत पाण्यात बुडवायचे.बुडवून झाल्यावर तोच पंजा शेजारी ठेवलेल्या पांढऱ्या कापडावर दाब देऊन उमटवायचा आता आपल्या पंजाची प्रतिमा त्या  कपड्यावर येते.आणि मग ते कापड त्यांचे लोक आत मधील खोलीत घेऊन जातात आणि ५ मिनिटानंतर आपले कापड आणि एक कागद पुन्हा आपल्याला परत  करतात, त्या कागदावर आपले भविष्य लिहिलेले असते.( म्हणजे काहीतरी लिहिलेले असते आणि तेच तुमचे भविष्य आहे असे ते सांगत होते.)..लोक आपापला  कागद आणि कापड घेऊन स्टॉल बाहेर येत होते.काही लोक चुकीचे वाटतंय म्हणून हसत होते.काही लोक भविष्य वाचून खुश होत होते.काही लोक पैसे भरून देखिलाही "अरे नुसता पंजा बघून काही भविष्य ठरते का ?" असे म्हणत नैराश्य व्यक्त करत होते.
           उतार वयातील मंडळी दुसर्यांचे भविष्य सांगण्यात गुंतलेली पाहून थोडेसे आश्चर्य वाटत होते.थोडक्यात काय तर स्टॉल वाले कार्यकर्ते सोडले तर बाकीच्यांना कितपत आनंद मिळत असेल अश्या संभ्रमात मी तिथून पुढे निघालो.
गर्दी भरपूर झाली होती मी देखील गर्दीतून वाट काढत पुढे जात होतो.पुढे तर एक वेगळेच चालू होते.मोठ्ठी आगगाडी बनवली होती आणि त्या आगगाडीतून संपूर्ण जत्रेमधून फेरफटका मारण्याची संधी तुम्हाला मिळत होती.भलेमोठे इंजिन बनवले होते आणि त्यामेगे ३ डबे जोडलेले होते.संपूर्ण जत्रे मध्ये काय चालू आहे हे  तुम्हाला पहायचे असेल तर त्या इंजिनात बसा..एकदा इंजिनात बसलात कि बाकी ठिकाणी वेगळे जायची गरजच नाही अशा प्रकारची जाहिरात करणारे फलक  बाहेर लावलेले होते.सर्व तरुण मंडळी इंजिन भोवती जमली होती.इथे पण आधी पैसे भरायचे आणि आपल्या जागेवर जाऊन बसायचे.आणि मग फेरी मारून झाल्यवर पुढे जायला मोकळे.एकदा तिथून सुटलेले इंजिन पाहून मी तेथून निघालो.फेरफटका मारलेला तरुण वर्ग चांगलाच खुश वाटत होता पण बसल्या बसल्या  आपले स्टॉल नुसते बघून लोक पुढे जातात या कल्पनेने इतर स्टॉल वाले इंजिनावर भलतेच नाराज दिसत होते..
       तिथून पुढे गेलो, आपल्याला खूप उशीर झाला आहे असे वाटून कोणाला तरी वेळ विचारावी म्हणून आजूबाजूला पाहू लागलो तेवढ्यात समोरच्या स्टॉल वर  घड्याळ लावलेले दिसले,पळत पळत त्या स्टॉल पाशी गेलो पण तिथे फक्त मोठ्ठ्या घड्याळाचे चित्र टांगलेले होते आणि त्यात १० वाजून गेले होते.पण कागदाचे  घड्याळ काय खरी वेळ दाखवणार म्हणून मी वेळ विचारण्यासाठी त्या घड्याळाच्या स्टॉल वर गेलो.आणि समोर पाहतो तर अनंत प्रकारची घड्याळे मांडून  ठेवलेली  होती.काही मनगटी घड्याळे काही भिंतीवरची घड्याळे काही जुनी घड्याळे,'साहेब' लोक घालतात तसली बिनकाट्याची घड्याळे,मोठे शेतकरी लोक वापरतात तसली सोनेरी रंगाची घड्याळे अशी अनेकविध घड्याळे उपलब्ध होती.लोक आपल्या खिशाला आणि पसंतीला योग्य वाटतील अशी घड्याळे निवडत होते.सगळ्यांचे एकच मत होते "बाबा रे वेळ योग्य दाखव म्हणजे झालं".
           घड्याळे बघण्यात माझा बराच वेळ गेला मात्र आत्ता किती वाजले हे पाहण्यासाठी मला त्या घड्याळाचा उपयोग झालाच नाही शेवटी बाहेर येऊन एका काकांना विचारले "काका किती वाजले"...काका हसत म्हणाले अरे बाळा इतका घड्याळांच्या दुकानात जाऊन आलास आणि साधी वेळ तुला समजली नाही ?...आणि एवढे म्हणून  ...आणि ते काका गालातल्या गालात हसत मार्गस्थ झाले....मला काहीच समजले नाही.मी मात्र चालू आणि वेळ दाखवणाऱ्या घड्याळाच्या शोधात मार्गी लागलो.
         थोडे पुढे गेल्यावर ज्या लोकांना स्टॉल ची गरज नसावी किव्वा ज्यांना स्टॉल मिळाले नसावेत अशी लोक आपापले छोटे चौथरे टाकून बसले होते.तिथे काही लोक  लहान मुलांची खेळणी विकत होते ज्यामध्ये विमाने,सायकल,बॅट,शिट्टी,हत्ती अश्या प्रकारच्या गोष्टी मांडून ठेवलेल्या होत्या.या ठिकाणी जास्त गर्दी जाणवत नव्हती.मी आपला सहज वर वर सगळ्या गोष्टी आपल्या नजरेखालून घातल्या आणि पुढे निघालो.त्यांचा पसारा जरी लहान असला तरी आपल्या वस्तू विकायच्या  कश्या हे त्यांना पक्के ठाऊक होते.लोकांना आपल्याकडे खेचण्याचा एकही मार्ग त्यांनी मोकळा सोडला नव्हता ....
          आता मात्र मला आपल्याला पोट आहे आणि पाय देखील याची प्रकर्षाने जाणीव होऊ लागली होती.खिशात फारसे पैसे नव्हते त्यामुळे चहा कुठे मिळतोय का हे  शोधत मी थोडा पुढे गेलो आणि एका ठिकाणी मोठ्ठा फलक लावला होता "चहा घ्या...आणि तो सुद्धा फक्त आमच्याच कप -बशी मधून"मी आनंदाने तिथे गेलो माझ्याप्रमाणे अनेक लोक तिथे जमले होते.मी पैसे देऊन चहा घेतला तेव्हा तिथल्या स्टॉल वरचा माणूस मला म्हणाला कि चहा कसाही असो आमच्या कप -बशीतून घेतला म्हणजे चवदार लागणारच.मी तोंडदेखले हसून ती कप बशी घेतली आणि शेजारी उभा राहून चहा प्यायलो.चहा घेऊन झाल्यावर..चहा नसता प्यायला तर किमान पैसे तरी वाचले असते असे वाटण्याइतपत चवहीन चहा होता.माझ्याप्रमाणेच इतर लोकांच्या पण प्रतिक्रिया अश्याच होत्या.पोटातील अग्नी  विझाव्ण्याच्यी  कल्पनाच मुळात विझ्ल्यामुळे मी काहीसा निराश होऊन पुढे निघालो...
        सरतेशेवटी
  मी जत्रेच्या बाहेर पडण्याच्या दाराजवळ येऊन पोहोचलो. जत्रा संपूर्ण पाहून झाली होती. माझ्याबरोबर बरेच लोक बाहेर पडत होते काही लोक आनंदी वाटले  काहींना मनासारखे न मिळाल्याचे नैराश्य लपविता येत नव्हते.काही लोक छान टाईमपास झालं या आनंदात हसत बाहेर पडले.तर काही लोक पैसे जाऊन देखील  नेमबाजी जिंकता आली नाही याच दु:खात बाहेर पडत होते.काहींना चुकीच्या ठिकाणी पैसे घालवले याची खंत सलत होती.
परंतु जत्रेच्या दाराजवळ भिक मागणारा भिकारी आणि जत्रेतील
 प्रत्येक स्टॉल मालक यांना मात्र फक्त फायदाच होत असावा.कारण त्यांचे चेहरे कायम आनंदीच होते.
        याच  विचारात मी तेथून बाहेर पडलो.समोर पुन्हा भिडे पूल होता...घरी निघायचे यासाठी मी खिशात ठेवलेल्या गाडीच्या किल्ली साठी हात नेला आणि "चला उठा...रात्री विनाकारण जागरणं करायची मग सकाळी जाग येत येत नाही...मग अंघोळीला बरोबर घाई होते" असा आईचा गोड आवाज कानावर आदळला....ताडकन जागा झालो...
    घड्याळात ८ वाजून गेले होते....उठण्याशिवाय गत्यंतर नव्हते...






         




                                                                                                                               हृषीकेश पांडकर
                                                                                                                                (१४-०२-२०१२)

Wednesday, February 1, 2012

रोज न येणारी ..रोजनिशी..

          सकाळी झोपेतून जाग आल्यापासून ते अंथरुणावरून बाहेर पडेपर्यंत घरातील लोकांच्या बोलण्याचा,भांड्यांच्या आवाज येण्याची इतकी सवय झाली आहे कि एक दिवस हा आवाज झाला नाही कि अजूनही मध्यारात्रच आहे असे वाटून परत झोपावे कि काय असे वाटायला लागते.काही गोष्टींची इतकी सवय होऊन जाते कि या गोष्टी चुकीच्या कि बरोबर हा विचार करायचे कष्ट देखील घ्यावेसे वाटत नाहीत.कदाचित असू शकतीलही चुकीच्या.....
          तसेच काहीसे इथे झाले आहे...घरी आई बाबा असण्याची सवय पण अशीच काहीशी आहे.
दोन दिवस आई बाबा गावाला गेले कि कुठल्या गोष्टींना तोंड द्यावे लागते याचे प्रत्यंतर मला या आधी देखील आले आहे.पण तो अनुभव कागदोपत्री करण्याचा हा पहिलाच प्रयत्न.
    तसे पाहायला गेले तर आई बाबा गावाला जाऊन आपण घरात एकटे राहणे हि प्रचंड सामान्य आणि शुल्लक बाब आहे.पण केवळ दैनंदिन प्रवाहात अचानक  अडथळा आल्याने या गोष्टीला वेगळेच महत्व प्राप्त होते असे माझे वैयक्तिक मत आहे.
    दिवसातील २४ तासात १० तास ऑफिस,संध्याकाळचे ४ तास मित्र आणि इतर गोष्टींसाठी बाहेर आणि रात्री ७ तास झोप असे साधे समीकरण आहे. म्हणजे केवळ ३  तासांचा हिशोब लावायचा आहे.वर वर जरी हे तीनच तास मला manage करायचे आहेत असे वाटत असले तरी आई बाबा घरी असणे आणि नसणे यावर दिवसाच्या २४ तासाचा मनोर्याचा तोल सांभाळणे सर्वस्वी अवलंबून असते या निष्कर्षावर येऊन मी पोहोचलो आहे.
  परवाचीच गोष्ट आहे आई बाबा २६ जानेवारी च्या  'connected holidays' निमित्त घराबाहेर होते.मी घरी एकटाच होतो. उद्यापासून ३ दिवस आई बाबा घरात नाहीत या विचाराने झोप लागायला अवघड jaat नाही पण सकाळी आई बाबा घरात नाहीत या विचाराने अंथरूण सोडणे मात्र नक्की अवघड जाते.
              सकाळ झाली त्यामुळे उठणे क्रमप्राप्त होते.रात्री लावलेले पडदे तसेच बंद होते.त्यामुळे उठल्यावर अंथरूण आवरणे,पडदे उघडणे,पेपर,दुध आधी घरात घेणे या कामांच्या प्रत्येकी एक अश्या ६/७ आठ्या माझ्या कपाळावर डोळे उघडता क्षणीच आल्या होत्या.
नाईलाज या शब्दामागे सगळ्या आठ्या लपवून कामाला लागलो.सकाळी उठल्या उठल्या दरवाजा उघडून बाहेर जाने आणि गार दुधाची पिशवी घरात घेणे खरच नकोसे वाटते,तरी बरं ८ च वाजले होते.हि basic कामं करून दात घासायला बेसिन जवळ उभा राहिलो.आणि चहा चा प्रश्न दत्त म्हणून हजर झाला.म्हणजे दात घासून  आधी चहा करायचा आणि मग तो प्यायचा या विचारानेच कदाचित ब्रश वर आलेली जास्तीची पेस्ट बेसिन मध्ये पडली असावी....
                बेसिन आणि आसपासची सगळी कामे करून ओट्याजवळ उभा राहिलो.Gas लावला भांडे ठेवले चहा ची तयारी झाली ....चहा ठेवला.आणि बाहेर पेपर घेऊन बसलो.चहा होऊन तो कपात ओतणे या सव्वापाच मिनिटांच्या वेळेत मी सुमारे १३ वेळा gas जवळ गेलो.आणि याचे कारण असे कि एक कप चहा,त्याकडे लक्ष
देणारा मी एकटा,आणि समजा धांदरटपणामुळे चहा उतू गेला तर gas शेगडी स्वच्छ करणे,ओटा स्वच्छ करणे,काळे ठिक्कर पडलेले भांडे घासणे हि त्या धांदरटपणामुळे complimentary म्हणून मिळणारी कामे पण मलाच करावी लागणार होती.म्हणून किमान हे नक्की टाळता येईल या विश्वासाने का होईना मी ते व्यवस्थित टाळले.
              चहाची चव कशी होती हे मी इथे नमूद करणे प्रकर्षाने टाळतो.कारण कालचे फ्रीज मध्ये ठेवलेले दुध direct गरम चहात टाकले कि चव बिघडते हे माहित असूनही दुधाचे भांडे फ्रीज मधून आधी बाहेर न काढल्याने चहाची चव हा वेगळाच मुद्दा होता. पण गरम चहा तयार झाला या खुशीत मी बाकीच्या गोष्टींना दुय्यम लेखात कप  बशी आणि बिस्किट्स घेऊन hall मध्ये येऊन निवांत बसलो.पण ह्या निवांतपणा चा आनंद चहाच्या चोठ्याची विल्हेवाट आणि 'दुधाचे काम झाल्यवर झाकून परत फ्रीज मध्ये ठेव' अशी आईची बजावणी या दोन गोष्टींनी फार काळ टिकू दिला नाही.
              पेपर वाचून झाल्यावर म्हणण्यापेक्षा चहा घेऊन झाल्यावर ओटा आवरून घेतला कारण चहा ओतताना किमान २ थेंब तरी आम्ही ओट्यावर सांडतोच.आई असताना कप बशी फक्त dining table पर्यंत पोहोचवणे एवढी एकाच जबाबदारी असते.मात्र आज ओटा स्वच्छ करणे हे देखील काम होतेच. चहा हा विषय संपल्यावर बराचसा काम झाल्याच्या अविर्भावात अंघोळीला गेलो.कपडे काढले आणि अचानक डोक्यात आले कि कचर्याचा डबा बाहेर ठेवायचा राहिला आहे.आता हे काम करणे must होते कारण आत्ता जर केर बाहेर ठेवला नाही तर एकदम उद्याच द्यायचा.नाईलाजाने कपडे घातले डबा बाहेर ठेऊन आलो.
अंघोळ उरकली आणि बाहेर आलो.घड्याळाने सगळ्या सीमा ओलांडल्या होत्या.ऑफिस ला होणारा उशीर अटळ होता.कपडे घालावेच लागतात म्हणून चढवले.घरातील दरवाजे तपासून घराबाहेर पडलो.ऑफिस मध्ये उशीर झालाच होता.आणि दुष्काळात १३ वा महिना म्हणजे दुपारी घरचा डबा नसून बाहेर खावे
लागणार होते या दु:खात ऑफिस चा पूर्वार्ध उरकला.संध्याकळी बरोब्बर  ७ ला पोहोचलो.कुलूप उघडायच्या आधी रिकामा कचर्याचा डबा पण बरोबर घेतला आणि आत गेलो.७ वाजल्यामुळे घरातला अंधार बाहेरच्या अंधाराशी स्पर्धा करत होता.आधी दिवे लावले.आणि बूट काढताना पुढे करायच्या कामाची कल्पना येऊ लागली.आता फक्त माझे आवरून झाल्यावर चहा मिळणार नव्हता किव्वा खायला पण मिळणार नव्हते.एक वेळ चहा मिळाला नाही तरी चालेल पण चहा करायला लागणार हि कल्पनाच सहन होत नाही.पण पुन्हा एकदा इलाज नव्हता.पुन्हा एकदा सकाळ प्रमाणे चहा केला.Rack वर जे डबे हाताला लागतील ते तपासून पहिले आणि ज्या गोष्टी खाता येऊ शकतील अशा खाल्ल्या.शक्यतो असे पदार्थ  घेतले जे खाल्ल्याने नंतरची कामे फार करावी लागणार नाहीत.डिंकाचे लाडू घरात आहेत यावर मी ठाम होतो पण डबा न सापडल्याने डिंकाच्या लाडूची तहान मारी बिस्किटांवर भागवावी लागली.पण खरचं आहे दुध मिळत नसेल आणि टाकणे तहान भागणार असेल तर ताक प्यायला हरकत काय आहे ....
"जाऊदे तसाही बाहेरच जेवायचे आहे" असे मनात म्हणून डिंकाचा लाडू न मिळाल्याचे अपयश लपवून घराबाहेर पडलो.
            रात्री जेऊनच घरी आलो कारण घरी नेऊन खाणे  आणि नंतर आवरणे या गोष्टी कल्पनेच्या बाहेरच्या होत्या.आता घरी जाऊन फक्त झोपायचे एवढेच काम होते.मात्र हे क्षणिक समाधान कुलूप उघडताच मावळले.
रात्री ११.३० वाजता बाल्कनी मध्ये वाळत टाकलेले सगळे कपडे घडी घालून आत आणणे या विचाराने मला उगीचच झोप जरा जास्तच आली आहे असे वाटू लागली .ते काम पूर्ण केले. ज्या गोष्टी बंद करायच्या त्या गोष्टी बंद केल्या.(नळ,बटन्स,खिडक्या,दार).सरतेशेवटी उशी पांघरून घेऊन बेड वर झोपलो...आणि अशा वेळी टी.व्ही  लाऊन पाहावा याची पुसटशी देखील  इच्छा झाली नाही.
       गादीला पाठ लागली आणि दिवसाचे संपूर्ण पान डोळ्यासमोरून गेले.
दिवस नेहमीचाच होता,दिनचर्या नेहमीचीच होती फरक फक्त इतकाच होता कि आज आई बाबा घरी नव्हते. 
      आता नोकरी,शिक्षण किव्वा अन्य कुठल्याही कारणास्तव तुम्ही वेगळे रहात असाल तर अशा लोकांना या गोष्टी अतिशय बाळबोध आणि नेहमीच्या वाटत असतीलही आणि मी त्यांच्याशी संपूर्ण सहमत आहे.आणि मला त्यांचे विशेष कौतुक पण आहे.मात्र असा अनुभव कधीतरीच घेणार्यांना मात्र माझे म्हणणे पटले असावे .कदाचित कामाचे स्वरूप थोडे इकडे तिकडे होईल पण माझ्या भावना पोहोचण्यास काही तडजोड नसावी.
प्रत्येक गोष्टी बरोबर फायदे आणि काही तोटे पण येतातच पण यावेळी मात्र तोट्याचे पारडे सहज खाली जाते यात तिळमात्र शंका नाही.

         मुद्दा फक्त सवयीचा आहे...पण तो इतका प्रकर्षाने  जाणवतो  कि  नेहमचा दिवस पण नेहमीचा रहात नाही एवढे मात्र नक्की.

                                                                                                                                    हृषीकेश पांडकर
                                                                                                                                    ०१/०२/२०१२