Tuesday, March 19, 2019

रेवदंडा

 भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर पोर्तुगीजांच्या अस्तित्वाची स्थापत्यरूपी साक्ष देणारा हा 'रेवदंडा' किल्ला. किल्ला कसला... कालानुरूप दुभंगलेले फक्त अवशेष.अथांग अरबी सागराच्या लाटांना थोपवून धरणारी अभेद्य तटबंदी आणि किल्ला असण्याची खात्री पटविणारा हा चार मजली मनोरा.या खेरीज अस्ताव्यस्त पडलेल्या मोजून तीन तोफा आणि पोफळीच्या झाडांना जणू टेकून उभे राहण्यास शिल्लक राहिलेल्या भग्न भिंती.


 

हमरस्त्यालगतच्या लाल मातीच्या पायवाटेने आत गेल्यावर दिसणारी हि बांधणी.पोर्तुगीज कॅप्टन 'सूज' याने १५२४ मध्ये बांधून पूर्ण केलेला हा 'रेवदंडा' किल्ला.कालांतराने मराठ्यांनी काबीज केला आणि सरतेशेवटी इंग्रजांनी यावर युनियन जॅक फडकावला तो १८१८ साली.रेवदंड्याची अजून एक ओळख म्हणजे पहिला रशियन प्रवासी भारतात याच किनाऱ्यावरून आत आला.

किल्ल्यातून इतिहास उलगडावा वगरे असे इथे काहीच शिल्लक नाही.या उंच मनोऱ्याच्या मध्ये असलेले उघडे झरोके दिवसभर उन्हाच्या तिरप्या किरणांची रांगोळी बनवत असतात.मनोऱ्याच्या मधोमध उभे राहिल्यावर सध्या तिथे वास्तव्यास असलेल्या कबुतरांच्या गळ्यातून निघणारा आवाज घुमत असतो.मधेच एखादे कबुतर उडते त्याची फडफड आणि भरतीच्या वेळी येणार लाटांचा आवाज. हे दोन आवाज सोडले तर बाकी सगळे निपचित.

किल्ल्याचा परिसर मोठा असला तरी आता लोकांच्या पोफळीच्या वाड्या या आवारात बेमालूम मिसळल्या आहेत.किल्ल्याच्या आवारात प्रवेश केल्यावर किनाऱ्याची तटबंदी आणि हा मनोरा याच्या मध्ये एक प्री-वेडिंग फोटो शूट चालू होते.पंधरा मिनिटे तिथे रेंगाळून मी निघालो.'किल्ला' हि संकल्पना मनात ठेवून पहायला जाणार असाल तर इथे निराशा पदरी येण्याची दाट शक्यता आहे.पण तटबंदीवर उभे राहून एका बाजूला समुद्र आणि एका बाजूला हे भग्नावशेष पहायला मजा येते.सूर्यास्ताच्या किव्वा सूर्योदयाच्या वेळेला हा मनोरा आणि इतर भग्नावशेष ज्यांना कॅमेऱ्यात टिपायचे असतील त्यांनी मात्र नक्की ती वेळ साधून जा.

एखाद्या मराठी भयपटासाठी हि वास्तू कधीच कशी चित्रित झाली नाही याचे आश्चर्य व्यक्त करत मी किल्ल्याची वेस ओलांडली.कधी नागाव,अलिबाग किव्वा काशीद या ठिकाणी आलात तर अर्धा तास काढून इथे येऊन जा माझं म्हणणं पटेल कदाचित…

हृषिकेश पांडकर

१९.०३.२०१९

 

Monday, March 4, 2019

रामेश्वर मंदिर

 कोकण म्हटल्यावर डोळ्यसमोर येते ती पोफळीची रांगेने असणारी आणि आभाळाशी स्पर्धा करणारी उंच झाडे,घरामागची टुमदार वाडी,ती पार करून गेल्यावर अंगावर येणार सिंधुसागर आणि लाल मातीचे रस्ते. पांढरेशुभ्र उकडीचे मोदक आणि खोबऱ्याच्या तुकड्यांसारखा खाऱ्या पाण्याचा मासा, दमट हवेत घशाखाली अलगद सरकणारी किंचितशी आंबट सोलकढी आणि आंबा फणसापासून ते काजू कोकम पर्यंत जिभेचे चोचले झेलणारी अनेकविध फळे.


 

वर नमूद केलेला कोकणाचा अनुभव कोणालाच नवीन नसावा.हे आणि यापेक्षा वेगळं कोकण पाहण्याचा प्रयत्न या वेळी केला.नागाव किनाऱ्यापासून साधारण २० मिनिटांच्या अंतरावर चौल हे गाव आहे.या गावात असलेले रामेश्वर मंदिर हे कदाचित तितकेसे प्रसिद्ध नाही मात्र ऐतिहासिक महत्व असलेले आहे. चौल गावात एकूण ३६५ मंदिरे बांधली गेली. वर्षाचे ३६५ दिवस म्हणून ३६५ मंदिरे असे काहीसे हे गणित आहे अशी माहिती कानावर येते. त्या ३६५ मधील शिल्लक आणि प्रार्थनीय अवस्थेत असलेले हे शिवालय.

आवार भव्य नसले तर शांत आणि नेटके आहे.नेहमीप्रमाणे मुख्य प्रवेशापाशी नंदी विराजमान आहे.मंदिराला एकूण ३ कुंड आहेत.पर्जन्य कुंड,अग्नी कुंड आणि वायू कुंड.हेमाडपंथी धाटणीची बांधणी येथे पहायला मिळते.

नागाव किव्वा अलिबाग ला कधी गेलात तर हे छोटेसे मंदिर नक्की बघा.खूप भव्य किव्वा प्रसिद्ध यापैकी एकही गोष्ट यात नाही पण एक ऐतिहासिक आणि रमणीय वास्तू म्हणून नक्कीच प्रेक्षणीय आहे.त्यातही जर सूर्यास्तानंतर जाण्याची संधी मिळाली तर अजिबात सोडू नका कारण लोहगोलाच्या अनुपस्थितीत तेलाच्या दिव्यांनी नटलेली दीपमाळ डोळ्याचे पारणे फेडेल एवढे मात्र नक्की.मी गेलो ती वेळ टळटळीत दुपारची होती त्यामुळे दीपमाळेकडे डोळे वर करून बघायची माझी हिम्मत झाली नाही.पण साधारण सकाळी उन्ह चढायच्या आधी किव्वा संध्याकाळच्या सावल्या लांबल्यानंतर मंदिराला भेट द्या नक्कीच आनंददायी अनुभव असेल.बाकी 'येवा कोकण अपलोच असा' हे आहेच.

महाशिवरात्रीच्या मनापासून शुभेच्छा !!!

हृषिकेश पांडकर

०४.०३.२०१९

महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !!!

Rameshwar Temple | Chaul-Revdanda | Kokan 2019