Thursday, November 17, 2016

' न अनुभवलेले ' गोवा


         समुद्राचा खारेपणा,घाटामुळे अडून पडलेल्या पावसाचा ओलावा,परसबाग आणि स्वयंपाकघर या मध्ये जसे अंतर असते त्याप्रमाणे पुणे,मुंबई कोल्हापूर सारख्या औद्योगिक आणि तांत्रिक विश्वापासून काहीसं अंतर राखल्याने स्वच्छ आणि निर्भेळ वातावरणाचा गाभा असलेला पश्चिम घाट आणि अरबी महासागर यांच्यामध्ये विसावलेला चिंचोळा पट्टा म्हणजे मलबार.पानझडी,सदाहरित आणि पर्जन्य अशा तीनही वनांना आपलंसं करून किडे,मुंग्या सापांपासून वाघ हत्ती आणि घरी,गरुड,घुबडांना आश्रयाला ठेवणारा असा हा निसर्गाचा वरदहस्त लाभलेला मलबार भाग.आणि याच मलबार मध्ये परदेशी पाहुणे आणि भारतीय पर्यटकांची सर्वतोपरी हौस भागवणारे पोर्तुगीजांनी वसवलेले गोमंतक राज्य.

दिवाळीचा कौटुंबिक सोहळा उरकल्यानंतर हा वेगळाच फराळ चाखण्याची संधी मिळाली.गोव्यात काय पहावे,काय करावे,काय खावे आणि काय प्यावे हे सांगण्यास मी अजिबात पात्र नाहीये.पण त्याव्यतिरिक्तही गोव्यात 'निसर्ग' नावाची एक अशी संपत्ती दडलेली आहे जी कदाचित खाण्यापिण्याच्या नशेत अनुभवायची राहून गेली असं वाटायची वेळ येऊ देऊ नका इतकंच सांगण्यासाठी हे लिहिण्याचा केलेला खटाटोप.

मडगाव आणि पणजीपासून पन्नास किलोमीटरवर असलेल्या निबिड अरण्यात वसलेले हे तांबडी-सुरला गाव.भगवान महावीर आणि बोन्डला अभयारण्याच्या छायेत वसलेले.आणि याच जंगलात राहण्याची संधी मिळाली.यथायोग्य पाऊस झाल्यामुळे आणि थंडीची चाहूल लागायला सुरुवात झाल्याने पक्ष्यांची रेलचेल होती.स्थलांतरित होणारे पक्षी काही प्रमाणात निघाले होते आणि स्थलांतर होऊन येणारे पक्षी यायला सुरुवात झाली होती.त्यामुळे स्थित आणि स्थलांतरित असे दोन्ही पक्षी पाहण्याचा योग आला.

भगवान महावीर
अभयारण्य
 जंगलातून पायी फिरण्याचा अनुभव वेगळाच होता.सूर्यास्तापर्यंत कधीही न थांबणारा पक्षांचा आवाज.आणि समजा क्षणभर विश्रांती घेतलीच तरी वाळलेल्या पानावर पाय पडून भंग होणारी शांतता या गोष्टी अनुभवायला विलक्षण वाटतात.असंख्य माहित नसलेले पक्षी,माहित असलेल्या पक्षांचे विविध प्रकार हे प्रत्यक्ष पाहणे यासारखा आनंद नाही.बऱ्याच वेळा तर केवळ आवाजावरून पक्षी असल्याची चाहूल लागते,साधारण पक्षांचे वास्तव्य तसे उंचीवरच असते आणि झाडांच्या जाळीमुळे पक्षी पटकन नजरेस येणे कर्मकठीण.फक्त इथेच पहायला मिळू शकणाऱ्या पक्षांच्या नावापुढे मलबार हा शब्द जोडला गेलेला आहे.विविध रंग,शारीरिक बदलानुसार पिसे आणि रंगांमध्ये होणार बदल,लिंगातील फरकामुळे येणारे वैशिष्ट्यपूर्ण वेगळेपण हे पाहणे आनंददायी आहे.(प्रत्यक्ष दिसणारा पक्षी आणि इंटरनेट किव्वा पुस्तकात पाहिलेला पक्षी यात कमालीची तफावत असते हे मला डोळ्यासमोर बसलेल्या पक्षाला पहिले कि हमखास जाणवते.)

          सकाळची थंडी झटकायला उन्हाचा आडोसा शोधणे कठीण होते जेव्हा एकमेकात गुंतून तयार झालेले झाडांचे छत उन्हाची एकही तिरीप जमिनीवर येऊ देत नाही.गोव्यासारख्या ठिकाणी या गोष्टी कमालीच्या मजेदार वाटतात.पुस्तकात दिसणारे पक्षी रिसॉर्टच्या आवारात पहायला मिळाले.
कोकणाप्रमाणेच अरुंद आणि नागमोडी रस्ते.दुतर्फा असलेल्या घनदाट करण्याची पहिली ओळ जेमतेम दिसेल इतके दाटीवाटीने वाढलेले जंगल.पानांमधून आलेला सूर्यकिरण कोळ्याच्या जाळ्यावर पडून चमकणारा तो  जाळ्याचा भाग.मधूनच येणारी सुतारपक्षाची ठोकाठोकी या गोष्टी विलक्षण आणि गूढ वाटतात.इतर जंगलांप्रमाणे जिप्सीने फिरायचे नसल्याने चालत फिरणे बऱ्याचवेळा अपरिहार्य आहे त्यामुळे जंगल निरीक्षणाचा वेगळाच भाग अनुभवायला मिळतो.वस्ती कमी असल्यामुळे रस्त्यावरची वर्दळ तशी तुरळकच.एखाद्या ठिकाणी रस्त्यात आपली गाडी लावावी आणि शेजारी असलेल्या पायवाटेने जंगलात जावे इतके साधे सोपे समीकरण.चालत जंगलात शिरताना असंख्य प्रजातीचे जीव जंतू नजरेस येतात.मान वर काढलेला सरडा,विविध प्रकारच्या मुंग्या,अगणित रंगांची आणि आकारांची फुलपाखरे,सरलेल्या पावसाच्या आठवणी जपणारे गांडूळसदृश्य अळ्या,काही ठिकाणी शेणावर ताव मारणारे बारीक किडे,नशिबाची साथ असेल तर फांदीवर लटकलेला एखादा साप आणि तत्सम.

Racquet Tailed Drongo


इथल्या जंगलांचा साचाच काहिसा भिन्न आहे.साधारणतः इथे गर्द झाडी आहे,माळरान आहे,दलदलीचा भाग आहे,खाडीचा भाग असल्याने झुवारी नदी जवळ खारफुटीचे जंगल आहे.आपल्याला काय बघायचे ते आपण ठरवायचे.कान्हा,बांधवगड,ताडोबा,पेंच या मध्यभारतातील जंगलातील अनुभव आणि कॉर्बेट मधील उत्तर भारतीय जंगलाचा अनुभव यातील काहिसा मिश्रा अनुभव इथे येतो.अगदी टिक किव्वा सालाची झाडे नजरेस येत  नाहीत पण विविध प्रकारच्या साम्यतेमुळे बरेचदा या जंगलांची आठवण होते.अर्थात तरीदेखील या सर्व जंगलांनी आपापले वेगळेपण अबाधित ठेवले आहे.दक्षिण भारतातातील काबिनी,बांदीपूर,नागरहोळे किव्वा अगदी दंडेली,आणशी यासारखी जंगले देखील याच पठडीतली असून ती सुद्धा प्रमाणात मलबार भागातच येतात.
  जंगलाची घडण वेगळी असल्याने साहजिकच जंगलात वाढणाऱ्या प्राण्यापक्षांमध्येही भिन्नता आढळते.सस्तन प्राणी तितकेसे नजरेस येत नाहीत.पण पक्षी,सरपटणारे प्राणी आणि कीटकांनी जंगल श्रीमंत बनवले आहे.

झुआरी नदीतील फेरीचा अनुभव खूप वेगळा होता.गंगेतून बोटीने फिरणे,नर्मदेतून बोटीने फिरणे आणि हुगळी नदीतून बोटीने फिरणे या अनुभवापेक्षा खूप वेगळा निसर्ग पहायला मिळतो.गंगेचे घाट,नर्मदेचे खडक आणि हुगळीचा हावडा पूल या गोष्टींसमोर झुआरी नदीतून दिसणारे खारफुटीचे जंगल खूप वेगळे होते.विस्तीर्ण पात्र समुद्राकडे अरुंद होत गेले असून दुतर्फा खारफुटीचे जंगल आढळून येते.दलदल सदृश्य प्रदेश असल्याने काठावर बसलेले बगळे,करकोचे आणि भरपूर शिकारी पक्षी लक्ष वेधून घेतात.भरती ओहोटीच्या समीकरणावर आणि चंद्राच्या मार्गक्रमणावर पक्षांच्या हालचाली बदलतात हि नवीन माहिती मिळाली.झुआरीच्या चार तासाच्या त्या भेटीत सहा वेग वेगळे किंगफिशरचे प्रकार पहायला मिळाले.दलदलीच्या त्या काट्याकुट्यात पंजा एवढा तो पक्षी चोरासारखा लपतो आणि पनीर मध्ये काटा चमचा घुसवावा तास तो नदीतून शिकार करतो हे दृश्य पाहण्यासारखे असते.

          
झुआरी नदीतील फेरी


 साधारण तीन-चार दिवसाची सुट्टी असेल आणि हा वेगळा निसर्ग बघायची इच्छा असेल तर नक्की विचार करा.कारण गोवा म्हणल्यावर जे डोळ्यासमोर येते त्यापेक्षा अगदी वेगळा हा सगळा प्रकार आहे.खेटून समुद्र असूनही इतका थंडावा अनुभवण्याची कदाचित हि माझी पहिलीच वेळ. राहण्याची जागा देखील भर जंगलात असल्याने सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना उगीचच शहरी जीवनाचा देखावा बघावा लागण्याची शक्यताच नव्हती.

बोन्डला अभयारण्यात प्राणी संग्रहालय आहे.पण जंगलात असलेले मोकळे प्राणी पक्षी पहात असताना पिंजऱ्यातले वन्यजीव पाहणे कष्टप्रद वाटू शकते.मात्र या बोन्डला अभयारण्यात पोहोचत असतानाच वाटेत असंख्य पक्षी नजरेस पडत असतात त्यानंतर तिथे जाऊन संग्रहालय बघायची इच्छा देखील झाली नाही.पर्णहीन फांदीवर बसलेले मलबार ट्रोगॉन किव्वा थव्याने उडणारे हॉर्नबिल बघणे स्वर्गीय आनंद देतात.एकाच झाडावर बसलेले ड्रॉन्गो पक्षाचे तीन प्रकार,विविध प्रकारचे फ्लायकॅचर्स आणि नकळत दिसणारे पक्षी खऱ्या अर्थाने जंगलात असल्याची साक्ष देतात.

या खेरीज तामडीसुरला मध्ये असलेले प्राचीन शिव मंदिर नक्कीच पाहण्याजोगे आहे.उन्ह उतरल्यावर पक्षी कॅमेऱ्यात बसणार नाहीत असा निर्णय घेऊन आम्ही हे मंदिर पाहण्यास गेलो.अतिशय रम्य परिसरात हे मंदिर वसलेले आहे.आस्तिक नास्तिक किव्वा इतर कुठलाही भेदभाव ( समजा असेल तर ) बाजूला ठेऊन एक कलाकृती आणि ऐतिहासिक साक्ष म्हणून या वस्तूला नक्की भेट द्या.

शिव मंदिर


सूर्यास्तानंतरच्या जंगलाचा पायी अनुभव घेण्याची हि माझी पहिलीच वेळ.किर्रर्र अंधारात हे घनदाट अरण्य तुडवण्यासारखी मजा नाही.घुबड आणि नाईटजार यांसारखे निशाचर शोधण्यासाठी केलेला अट्टाहास मजेदार होता.चांदण्या रात्रीच्या वेळी दिसणारे जंगल कदाचित टळटळीत सूर्यप्रकाशातील जंगलापेक्षा आल्हाददायक भासते.बॅटरीच्या प्रकाशात समोर काय चमकेल याचा नेम नसताना केलेली पायपीट अविस्मरणीय होती.या रात्री फार गोष्टी पहायला मिळाल्या नसल्या तरी सरतेशेवटी ४-५ प्रकारची घुबडे आणि नाईटजारचे दोन प्रकार पदरी पाडूनच आम्ही जंगल सोडले.फक्त वन्यजीवनच नाही तर आकाश दर्शन करण्यासाठी देखील हि जागा तितकीच योग्य आहे.निरभ्र आकाश आणि मानवनिर्मित एकही दिव्याचा झोत न येणारे अथांग क्षितिज संपूर्ण तारकांचे दुकान समोर मांडून ठेवते.सप्तर्षी आणि काही ठराविक ग्रह तारे सोडले तर मी या बाबतीत ''च.पण ज्यांना याची माहिती आहे किव्वा माहिती करून घ्यायची आहे अशा लोकांसाठी नंदनवनच.

सस्तन प्राण्यांचे आकर्षण असल्यामुळे मध्य,उत्तर आणि दक्षिण भारतातील जंगले पाहण्याचे प्रमाण थोडे जास्त आहे.पण इतके वैविध्यपूर्ण जंगल बघायचा अनुभव घ्यायचा असेल तर अशा जंगलांना पर्याय नाही.कदाचित सुंदरबनचे जंगल खारफुटीच्या बाबतीत यापेक्षाही प्रगल्भ असेल पण त्या खेरीज असलेली संपत्ती तिथे नाही.थोडक्यात काय तर आपल्याच चारही दिशांना भौगोलिक परिस्थिती आणि पर्जन्यमानानुसार तयार झालेले वनवैभव आणि पर्यायाने वन्यवैभव किमान एकदा तरी अनुभविण्यास काहीच हरकत नाहीये एवढे निश्चित.

Yellow-browd Bulbul


ऐन थंडीचा मोसम चालू आहे.क्रिसमस,नववर्षच्या सुट्ट्यांच्या चर्चा सुरु होतीलच,अशाच एखाद दोन सुट्ट्यांचा आधार घेऊन एकदा 'हे' गोवा देखील पाहून घ्या.कारण 'गोवा' असं गूगलवर टाकल्यावर जे फोटोस समोर येतात त्या व्यतिरिक्तही अजून खूप गोष्टी या गोव्यात दडलेल्या आहेत...चला तर मग समुद्र,दारू,मासे या पलीकडले गोवा पाहुयात :)

हृषिकेश पांडकर
१७/११/२०१६


Friday, November 11, 2016

द होल थिंग इस दॅट के भय्या ' सबसे बडा रुपय्या '


एखाद्या गोष्टीचा संपूर्ण राष्ट्रातील जनतेवर किती मोठा परिणाम होऊ शकतो याचा प्रत्यय आपण सध्या घेतोय.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाचशे आणि हजारची नोट चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतला आणि देशातील सर्व स्तरातील लोकांना चर्चेला खाद्य मिळाले.आता भारतीय अर्थव्यवस्था किव्वा चलनातील बदलामुळे अर्थव्यवस्था आणि सामाजिक जनजीवनावर उमटणारे पडसाद वगरे विषय लिहिण्याची किव्वा बोलण्याची मला तितकी माहितीही नाही,अभ्यासही नाही आणि मुळात म्हणजे या वैचारिक चर्चेसाठी मानसिकताही नाही.थोडक्यात काय तर फारसं टेक्निकल उगाळत न बसता चालू असलेल्या परिस्थितीवर देशाचा नागरिक या नात्याने काय  गप्पा मारता येऊ शकतात याचा मी हा अंदाज मांडतोय.हेल्मेट सक्ती करणे आणि चलनातील पाचशे आणि हजारच्या नोटा बंद करणे यातील तफावत आता स्पष्ट पणे जाणवत असेल.मी मुद्दाम तफावत  लिहितोय किंबहुना 'त्रास/अडचण' हे शब्द सहज वापरता आले असते पण घेतलेला निर्णय हा मला तरी वैय्यक्तीकरित्या योग्य वाटतोय.आणि ज्यांना हि सक्ती किव्वा त्रास वाटत असेल त्या लोकांमध्येच दोष असण्याची  शक्यता जास्त आहे.नोटांचा तुटवडा आणि तोही किमान ३/४ दिवस इतकी बारीक कळ एक देशाचा नागरिक म्हणून आपल्याला सोसत येत नसेल तर ते पूर्णपणे आपल्या देशाचे दुर्दैव आहे आणि देशाच्या रक्षणार्थ प्राण  गमाविणाऱ्या त्या सैनिकांचे पण.कारण देशासाठी त्रास सहन करायची एकहाती जबाबदारी त्यांची नक्कीच नाहीये आणि त्यांच्या त्या त्यागासमोर ३-४ दिवसाचा नोटांचा तुटवडा किस झाड कि पत्ती(व्हाईट) आहे. तर म्हणणे इतकेच कि एखाद्या निर्णयामुळे जर संपूर्ण देशभराचे अर्थकारण ढवळून निघत असेल (सकारात्मक) तर तो बदल नक्कीच आमूलाग्र म्हणावा लागेल.

महीन्याखेरी पगार झाल्याचा मेसेज वाचणाऱ्या नोकरदारांना या गोष्टीचा सर्वात आनंद झाला असणार यात शंका नाही.अर्थात हे नोकरदार इतर कुठल्या ठिकाणावरून काळी कामे करत नसावेत हे अध्याहृत.तर सामान्य नागरिकांची भूमिका शक्यतो काय असावी तर जवळची रोख रक्कम बँकेत जमा करून आपले पैसे 'सुरक्षित' करून घेणे आणि सुखाने वर्तमानपत्र वाचत बसणे किव्वा पाय वर करून बातम्या पहात बसणे.कारण घामाच्या कमाईला धक्का लागेल असे चित्र कुठेच दिसत नाहीये.त्यामुळे मिळालेल्या माहितीवर मित्रांच्या घोळक्यात विषयाचे चर्वण करण्याची एकही संधी सोडू नका.कारण देशाचे राजकारण,अर्थकारण आणि समाजकारण या विषयावर बोलण्यासारखं लोकशाही मिरवण्याचा दुसरा सोपा मार्ग नाही.

निर्णयाच्या रात्री व्हाट्सअँप आणि फेसबुकवर खूप मेसेज पाहण्यात आले कि अशा या साधारण १५-२० दिवसाच्या टंचाईच्या परिस्थितीत गरीब लोक,छोटे विक्रेते यांना झळ पोहोचू शकते त्यांना मदत करा वगरे.पण माझं असा मत आहे कि जे लोक असे मेसेज टाकतात कदाचित त्यांच्यापेक्षाही हि लोक हुशार आणि सावध असतात.त्यांनी या गोष्टी जास्त जवळून पाहिलेल्या असतात.प्रश्न फक्त एक उरतो कि अशा लोकांकडे स्वतःचे बँक खाते नसेल तर ? पण अशा वेळी कुठलाही चुकीचा सल्ला किंवा गैरमार्ग न सुचवता योग्य ती माहिती करून दिली तरी ती पुरेशी ठरू शकते.

मजा तर अशा लोकांची येणार आहे ज्यांनीं उशीखाली किव्वा उराशी प्रेमाने पैसे जपले,एखादी जमीन विकून एकाच रात्रीत कोट्याधीश झाले आणि सरते शेवटी टॅक्स च्या रांगेतून सुटका करून घेतली.काळा पैसे म्हणजे काय हे कळायला अशी वेळ येईल याची कल्पना नव्हती.पण आता तोंड दाबून बुक्क्यांचा मार मिळणार हे नक्की.बर फक्त असेच लोक नाही तर रोख व्यवहार करून कर चुकवून कपाटं खचाखच भरलेल्यांना पण याला सामोरे जावे लागेल.पैशाला गोरं करायची किंमत फार जास्त मोजावी लागणार हे नक्की. खऱ्या अर्थाने आज रिकामे खिसे जास्त शिकवतील का हे पाहण्याची वेळ आलीये.

          असंच चर्चा करत असताना यातून काही तोडगा आहे का असा प्रश्न आला.अर्थात तोडगा हा वाईट गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी असतो.या बाबतीत तोडगा म्हणण्या पेक्षा पळवाट म्हणणे जास्त संयुक्तिक राहील.तर याला पळवाट आहे का यावर आम्ही बोलत होतो.पण मजा अशी आहे कि पळवाट वापरूनही कोट्यधीशांची संपत्ती पांढरी होणे दुरापास्त आहे.फार फार तर दानधर्म किव्वा पैसे वाटप करून किमान पुण्य क्रेडिट करायला काही हरकत नाहीये.पण काळा पैसा दान करणे यासारखा विरोधाभास नाही.पण युद्धात आणि प्रेमात सगळं माफ असतं असं म्हणतात.इथे तर नोटांच्या निर्णयाविरुद्ध युद्ध आणि पैशाबद्दल(काळ्या) प्रेम आहे.या व्यतिरिक ज्यांच्या जवळ जुजबी २५-३० लाख रुपये आहेत ..बघा मी आता २५-३० लाख रुपयांना जुजबी म्हणायला लागलोय,असो तर ज्यांच्या जवळ २५-३० लाखांचा काळा पैसा आहे त्यांनी तातपुरते दुसऱ्याला बँकेत टाकायला सांगावे आणि काही दिवसांनी परत मागावे.फार तर तिजोरीचे भाडे या नावाखाली फी दिल्यास राखण करणारा देखील खुश आणि टॅक्स भरण्यापेक्षा राखणदारीची फी निश्चितच कमी.. कसे ? .पण हे सगळे करत असताना राखणदारानी हात वर केले तर तेल गेले..तूप तर आधीच गेले होते आणि आता तर धुपाटणेही हातात येण्याची शक्यता नाही.

कुठल्याही मार्गाने काळा पैसा स्वच्छ चलनात आणला तरी बऱ्याच अर्थी फायदाच होणार आहे कारण एवढे पैसे एकदम प्रवाहात येतील आणि कदाचित सामान्य लोकांच्या दृष्टीने डोकेदुखी असलेली महागाई कमी होण्याची दा शक्यता निर्माण होऊ शकते.त्यामुळे काळ्या नोटांच्या राशी एकतर क्रिसमस च्या कॅम्प-फायर साठी राखून ठेवा किव्वा जो काय कर बसेल तो यथासांग भरून काळा पंधरा हिशोब संपवून टाका.

          विनोदाचा भाग बघा इन्कम टॅक्स कायद्यानुसार एका दिवसात २००००/- पेक्षा जास्त रुपयाचा रोख व्यवहार करायची परवानगी नसते.याचा विसर किती लवकर पडलाय आपल्याला.आता लोक सहज लाखांचे रोख व्यवहार करतात.कदाचित याला देखील आळा बसू शकेल का ? वेळच ठरवेल.पण सध्या तरी काळ्या पैशाला चाप लागेल अशी अशा आहे.

काही देशवासीयांची या निर्णयाला धरून ओरड आहे.गरीब जनता ज्यांच्याकडे असलेले तुटपुंजे पैसे अचानक निरुपयोगी झाले आणि त्यामुळे त्यांना रोजचा खर्च भागवता येणे शक्य नाहीये.आणि म्हणून हा निर्णय त्यांना पटला नाहीये.५०० आणि १००० च्या नोटा बंद झाल्या आहेत.जे पैसे तुम्हाला ३ दिवसात बदलून मिळण्याची खात्री आहे.बार ज्या लोकांचे बँकेत खाते नसेल त्यांना देखील नोट बदलून मिळू शकेलच.पण विरोधाला विरोध  करणाऱ्यांचे कौतुक करावे तितके थोडेच.कारण या निर्णयाला सरळ सरळ विरोध करणे म्हणजे अडकण्यासारखेच आहे.

          निर्णयाच्या वाईट बाजू सामान्य नागरिक या नात्याने मला तरी काही आढळल्या नाहीत.यातून निघणाऱ्या चपखल पळवाटा मला तरी अजून ऐकण्यात किव्वा पाहण्यात आल्या नाहीयेत.एक जबाबदार नागरिक म्हणून या निर्णयाचा जर स्वीकार केला तर थोड्याफार प्रमाणात अर्थव्यवस्थेची पहिली व्यवस्थित घडी बसायला नक्कीच काही हरकत नाहीये.निर्णयाने सैरभैर झालेले काही क्लुप्त्या लढवून पैसे वाचवण्याचा प्रयत्न नक्की करीत असतीलच.पण १२० कोटीच्या देशासाठी एवढा मोठा निर्णय घेण्याआधी सत्ताधाऱ्यांनी पण याचा विचार केला असेलच कि. निर्णय आपल्याला एका रात्रीत समजला आहे पण या विषयी विचार हा नक्कीच काही महिन्यांचा असणार.आणि कोणीही कितीही काळा पैसा वाचवायचा प्रयत्न केला आणि त्यांच्या सुदैवाने तो वाचला तरी तरी पैसा पुन्हा वैध मार्गानेच बाजारात येणार आहे.त्यामुळे फार काळजीचे कारण नसावे.

तर एक सामान्य नोकरदार वर्ग या चेहेर्याखालून बोलताना इतकच सांगावस वाटत कि झालेल्या निर्णयाचा आदर करून जर वाटचाल केली तर देशाचे आर्थिक भविष्य सुधारण्यास नक्की हातभार लागू शकेल.याचे पडसाद लगेच दिसून येतील असेही नाही पण नजीकच्या भविष्यात महागाई,काळा पैसा आणि भ्रष्टाचार या तिघांनाही चाप लागण्याची आशा ठेवणे गैर नाही.

          मुद्दा इतकाच आहे कि गरिबाला गरीब आणि श्रीमंताला श्रीमंत बनवत जाणारी अर्थव्यवस्था अशी ज्याची इतके वर्ष ओळख होती त्याचा आता कायापालट होण्याची हि नांदीच म्हणावी लागेल.त्यामुळे तिऱ्हाईत असल्यासारखे नामानिराळे न राहता भोवतालच्या परिस्थितीचा अंदाज घ्या.आज पर्यंत भरला नसेल तर जाऊदे पण इथून पुढे टॅक्स वेळेवर भरा कारण भिंतीत,गादीत किव्वा जमिनीत ठेवलेल्या नोटांपेक्षा पासबुकावर दिसणारी रक्कम जास्त टिकाऊ असते...हेन्स प्रुव्हड !


             दातव्यं भोक्तव्यं धनविषये संचयो न कर्तव्य: |

             पश्येह मधुकरीनां संचितार्थं हरंत्यन्ये  ||
 

                                                                                 हृषिकेश पांडकर
                                                                                          ११.११.२०१६