Friday, December 13, 2013

धन्यवाघ !!!



        सौरव गांगुलीला बंगाल ‘टायगर’ म्हणतात,मन्सूर आली खान पतौडीला ‘टायगर’ पतौडी म्हणतात अगदी हेच नाही तर बाळासाहेब ठाकर्यांना महाराष्ट्राचा ‘वाघ’ म्हणतात या गोष्टी आता सर्वश्रुत आहेतच.वरील संदर्भामध्ये प्रत्येकाला वाघाची उपमा दिली आहे.वाघाला इतके श्रेष्ठत्व का आहे. किव्वा असंख्य प्राण्यांमध्ये वाघालाच अग्रस्थान का मिळाले याचे तुटपुंजे आणि पुस्तकी उत्तर मला शाळेत असतानाच मिळाले होते.सुनीताबाई देशपांड्यांनी लिहिलेला 'दर्शनमात्रे' हा प्रसंग आम्हाला माध्यमिक शाळेत अभ्यासाला होता.अभ्यासाला असलेले लेखन हौशीने वाचायची वेळ आली नाही तो भाग वेगळा.पण त्यावेळी व्याघ्रदर्शनाचे वेगळेपण कायमचे स्मरणात कोरले गेले. 

        तर वाघाचा दर्जा काय आणि कसा ठरवला गेला हे कुतूहल उलगडण्याच्या प्रयत्नाला अखेरीस यश आले.पेशवेबाग,हैदराबाद प्राणीसंग्रहालय,म्हैसूर प्राणीसंग्रहालय  या ठिकाणी एखाद्या ठराविक जागी घुटमळणारा वाघ अनेकवेळा पहिला.पण या बंदिस्त जागेत येरझार्या घालणाऱ्या प्राण्याला पाहून वरच्या उपमा नक्कीच देण्यात आलेल्या नाहीत हे आता पदोपदी पटते.
        जगात आपल्या मनाचा राजा असलेला वाघ पाहणे या एका इच्छेवर याआधी चार पाच वेळा जंगलात जावून आलो.एकदा वाघाचे बछडे ओझरते दर्शन देवून मनाची चुटपूट वाढवून निघून गेले.बाकीच्या वेळी तर रेतीत उमटलेल्या पंजांचे ठसे पाठीमागे सोडून हूल देवून गेला.राजाच तो शेवटीकोणाच्या पुढे पुढे का करेल आणि का करावे ? बर बापाचे राज्य असल्या सारखे डौलाने फिरणारा प्राणी तो,कशाला आपल्यासामोरून फिरेल.आपण पाहायला गेलो आहोत.दिसला तर आपले भाग्य,नाही दिसला तर आपलेच दुर्दैव.

        अशाच आशेवर जंगलात जाण्याची संधी मिळाली.जंगल हे जंगल म्हणूनच बघयला जावे.फक्त वाघ बघायला गेल्यास हिरमोड होण्याचा संभव असतो.असे मत व्यक्त करणाऱ्या लोकांनी आधी वाघ बघितलेला असतो.कारण जोपर्यंत साक्षात वाघ दिसत नाही तोपर्यंत जंगलाची ओढ हि वाघाचीच ओढ असते असे किमान माझे तरी प्रामाणिक मत आहे.अर्थात वाघ दिसल्यावर जंगलाची आस तसूभर देखील कमी होत नाही हि काळ्या दगडावरची रेष आहे.

        थंडीच्या डिसेंबर मध्ये,अकाली पावसाच्या भीतीखाली आणि नागपूरच्या उन्हाळ्यात भारताच्या 'व्याघ्र राजधानीत' अर्थात ताडोबात प्रवेश केला.चार तासाच्या चार सफारींचे बुकिंग करून सोळा तासाच्या 'व्याघ्र जुगाराचा' खेळ सुरु झाला.पहिल्या बारा तासातील वाघाच्या बाबतीतले अपयश यावेळीदेखील हाती धुपाटणे देणार असेच वाटत होते.शेवटच्या चार तासात जंगल काय दाखवते या ओढीने सुमारे २ डिग्रीच्या थंडीत आशेची ऊब पांघरून साखर झोपेला फाटा देवून जंगलात निघालो.  
        पहाटेची वेळ म्हणजे जाणकारांच्या मते वाघाच्या 'Movement' ची वेळ आणि अर्थातच वाघ दिसण्याची सर्वोत्तम वेळ.हरीण,माकड,सांबर आणि असे असंख्य प्राणी आणि पक्षी नजरेस पडत असताना देखील कुठेतरी काहीतरी अपूर्ण पडत असल्याची भावना क्षणोक्षणी बळावत होती.त्या कित्त्येक किलोमीटरवर पसरलेल्या जंगलात फिरत असताना वाघ कुठे फिरत असेल याची पुसटशी देखील कल्पना नसते.बर नुकताच पाऊस ओसरल्यामुळे दुतर्फा असलेली गर्द झाडी नजरेच्या क्षमतेला नैसर्गिक बांध घालत होती.


        त्या चार तासातील पहिला तास कडाक्याची थंडी आणि धुके यांचे चोचले पुरविण्यातच गेला.गळ्यात लावलेला कॅमेरा फक्त मानेवर ओझे बनून वावरत होता.सूर्यकिरणांची पहिली तिरीप झाडातून जंगलाच्या पृष्ठभागावर स्थिरावली.आणि आशेचा किरण प्रकाशमान झाला.हळुवार चालणार्या जिप्सीच्या डाव्या बाजूला वाघाच्या पंजांचे ठसे स्पष्ट दिसत होते.ठशाच्या खोलीवरून आज पहाटेचेच असणार यावर शिक्कामोर्तब झाले आणि त्याचा पाठलाग सुरु झाला.काही अंतर गेल्यावर डाव्या बाजूचे ठसे नाहीसे होवून उजव्या बाजूला उमटलेले दिसले.गाडीने मार्ग बदलला.पण ठशांनी मार्ग सोडला आणि नशिबाने साथ

        अस्वलाने दर्शन दिले, गव्याने मार्ग अडवला,दुर्मिळ प्राणी डोळ्यासमोरून गेले.प्रतीक्षेचा धनी असलेला जंगलाचा राजा मात्र अंत बघत होता.निसर्गाच्या नियमांचे पालन करणारा भास्कर दिवसाच्या प्रवासाला केव्हाच निघाला होता.चारतील पहिले दोन तास वाघ सोडून सगळ्या गोष्टी दाखवत होते.आता थंडीची जागा उन्हाने घेतली.लपत छपत येणारी सूर्यकिरणे न घाबरता थेट अंगावर येवू लागली.सकाळच्या लगबगीनंतर जंगल स्थिरस्थावर होत होते.माकड,हरीण यांचे आशादायी 'Alarm Calls' थंड पडत चालले होते.उरल्या सुरल्या अशा देखील संपल्याच्या खुणा स्पष्ट होत होत्या.सुंदर सूर्योदय,हिरवीगार कुरणे,उंच उड्या मारणारी हरणे,गरुडाचा लांबून येणारा लयबद्ध आवाज,प्रदर्शनाला आपला stall मांडावा त्याप्रमाणे रस्त्यालगत कोळ्याने विणलेले नक्षीदार जाळे,दुसरी जिप्सी गेल्यामुळे उडालेला धुराळा सुर्याकिरणात मिसळून तयार झालेली सोनेरी झालर. तळ्यावर आच्छादलेली धुक्याची रजई आणि कापसाचे बोळे तरंगावेत त्याप्रमाणे पाण्याच्या पृष्ठभागावर संथपणे तरंगणारी बदके.मधूनच वेड लागल्यासारखे जमिनीलगत उडणारा वेडा राघू आणि थव्याने घिरट्या घालणारे जलपक्षी.केवळ वातावरणाने भुरळ घातली जाईल असा तो नयनरम्य निसर्ग.पण काहीसे चुकल्यासारखे भासवणारी ती मनस्थिती यावर भारी पडत होती.



        चार तासाच्या सफारीचा उत्तरार्ध येवून ठेपला होता.तीन तास  फिरल्यानंतर मनाची तयारी करून बाहेर पडणे याखेरीज फारसे काही हातात नव्हते.तीन दिवसाच्या जंगल सफारीचा शेवटचा तास हळू हळू उलगडत होता.नियमांची अंमलबजावणी करण्याच्या प्रामाणिक हेतूने आणि काहीश्या नाईलाजास्तव आम्ही परत फिरलो.मगाशी असलेला उत्साह आता नशिबाला वाकुल्या दाखवत होता.इतकावेळ वाघाला शोधत असलेली नजर देखील आता  थंडावलेली होती.चार दिवसाचा निसर्गाच्या सान्निध्यातील मुक्काम आता संपला होता.आणि पुन्हा तेच घिसेपिटे आयुष्य ज्याला रुटीन हे गोंडस नाव दिले जाते त्याच्या स्वाधीन करायची मानसिक तयारी सुरु झाली होती.मगाशी थंडीने गारठलेले रस्ते आता उन्हाने न्हाऊन निघत होते.जंगलातून बाहेर पडणाऱ्या रस्त्यावर आम्ही मार्गस्थ झालो.
        तीनचार दिवस चालू असलेली वन्यजीवनावरील चर्चा उद्यापासून असलेल्या रहाटगाडग्याच्या गप्पांमध्ये रुपांतरीत झाली.जंगलातील वेगाच्या मर्यादा तंतोतंत पाळत आम्ही बेतानेच पुढे सरकत होतो. दुतर्फा असलेली घनदाट झाडी रस्त्याचे वेगळेपण अधोरेखित करत होती.
       हे चालू असताना आधीच कमी असलेल्या आमच्या गाडीचा वेग अचानक अजून कमी झाला आणि क्षणार्धात गाडी स्तब्ध झाली.पुढच्या सीटवर बसलेला आमचा गाईड शांत राहा अशी खूण करून जागच्या जागी उभा राहिला.आम्ही सहाही जण आहे त्या जागी उभे राहिलो.गाईडने फक्त डाव्या बाजूच्या झुडपात बोटाने खुण केली.आणि ज्याच्यासाठी केला होता अट्टाहास ती साक्षात जंगलाची राणी डाव्याबाजुने डौलात चालत रस्त्यावर आली.
  


        आमच्या मागे किव्वा पुढे एकही गाडी नसल्याने त्या रस्त्यावर फक्त आमची गाडी आणि समोर दहा फुटावर सुमारे सात फुट लांबीची ती वाघीण असा तो नजारा होता.संपूर्ण वाढ झालेली ती चट्टेरी पट्टेरी आपणच या जंगलाची सर्वेसर्वा आहोत या थाटात रस्ता ओलांडत होती.आपल्यासमोर एखादी गाडी उभी आहे किव्वा मनुष्यप्राणी आहे याला यत्किंचितही न जुमानता आपले मार्गक्रमण करीत होती.प्राणी पक्षांचे आवाज किव्वा पानांची सळसळ या गोष्टींनीही आता मौन धारण केले होते. कॅमेर्याचा क्लिक आणि दीर्घ श्वासोश्वास सोडला तर शांततेचा भंग करणारा एकही आवाज नव्हता.आपण वन्यजीवन साखळीत सर्वोच्च स्थानी का आहोत आणि पर्यायाने आपल्याला जंगलाचा राजा होण्याचा मान का मिळाला आहे याचे संदर्भासहित स्पष्टीकरण याची देही याची डोळा मी अनुभवत होतो.आपल्या शिकारीची सहज चिरफाड करणारे ते पंजे वाळलेल्या पानावर मात्र इतके अलगद पडत होते कि पानाखाली असलेल्या किड्याला देखील त्याची कल्पना येणार नाही. ते पिवळे धमक शरीर आणि त्यावर असलेले पट्टे यामुळे तयार झालेला रेखीव आणि आगळा आकृतिबंध नजरेचे पारणे फेडत होता.तब्बल पस्तीस सेकंदाच्या कालावधीनंतर ती पलीकडच्या गर्द झाडीत नाहीशी झाली.
        कॅमेर्याने आपले काम चोख बजावले होते.वाघीण नजरेआड झाली आणि आयुष्यातील 'ते' मिनिट सोनेरी करून गेली.इतका वेळ असलेले नैराश्य किव्वा सल आता त्या मिनिटाने स्वच्छ धुवून काढली होती.चार दिवसाची जंगलभेट शेवटच्या मिनिटाला फलद्रूप झाल्याची गोड भावना पाठीशी घेवून मी कॅमेरा आनंदाने बंद केला.इतकावेळ चालू असलेले गप्पांचे विषय सरड्याच्या रंगाप्रमाणे क्षणार्धात बदलले.मगाशी रुसलेले नशीब एका मिनिटात फळफळले होते.जंगलही मगाचचेच होते,लोकही मगाचचेच होते. मात्र उत्साहाच्या पातळीत अमुलाग्र बदल जाणवत होता.वाघ दिसल्या नंतरची सर्वात पहिली प्रतिक्रिया काय होती हे सांगण्यात सगळ्यांनी मनसोक्त वेळ घेतला.आनंद आणि समाधान यांची मिश्रित भावना इतरांसमोर व्यक्त करायची आता घाई झाली होती.काय जादू भरली आहे त्या चटयापट्ट्यात हे नक्की सांगता येत नाही पण आज प्रत्यक्ष अनुभवायची संधी मिळाली.
        गाडी जंगलाच्या बाहेर आली.आता विदर्भाचे उन देखील सुसह्य वाटत होते.नाश्त्याची वेळ टळूनसुद्धा भुकेने गाऱ्हाणे मांडले नाही.मिनिटभराच्या प्रसंगाने संपूर्ण सफारीचा कायापालट केला होता.त्या वाघिणीला या प्रकारची कल्पना नसेलच,ती तिच्या दिनचर्येत मग्न असेल.पण या प्राण्याचा प्रभाव किती आहे हे जाणून घेण्यासाठी तरी किमान एकदा जंगल बघाच.मुळातच विविधरंगी असलेले जंगल या चटयापट्ट्यांनी सौंदर्याची परम सीमा गाठते. 


        'अपनी गली मे तो कुत्ता भी शेर होता हैयहा तो खुद शेर हि था गली का तो कोई मतलब हि नाही बनता…'
                  
                                                                                       हृषिकेश पांडकर
                                                                                       १३/१३/२०१३        

Wednesday, November 27, 2013

विमानतळ आणि मी



        काही गोष्टी आधीपासूनच येत असतील तर त्या करण्यात फारशी मजा नाही असे म्हणतात.पण एखादी गोष्ट आपल्याला जमू शकेल असे वाटत असताना तीच गोष्ट आपल्याला करायला मिळाली तर त्याचा आनंद वेगळाच असतो. या गोष्टीची प्रचिती मला परवाच आली. अशा छोट्या छोट्या गोष्टींची प्रचिती यायला कोणते मोठे अनुभव यायची गरज नसते,ती आपल्याला साध्या दिनचर्येत सुधा येतेच.

        तर हे सांगण्याचा हेतू हा होता की,IT,ऑफिस,पगार,मिटींग्स या बेचव गोष्टीत अडकल्यापासून दिवाळी म्हणजे फक्त सुट्टी हे एकच समीकरण आम्ही जुळवतो.पंधरा वर्षापूर्वी दिवाळीची समीकरणे सहामाही परीक्षेपासून सुरु व्हायची आणि सुट्टीनंतरच्या शाळेच्या पहिल्या दिवसावर संपायची. भाषेचा पेपर पहिला असल्यामुळे मराठीचा पेपर पहिला हे गणितच होते.आणि शंभर गुणांचा पेपर म्हणजे पंधरा मार्कांचा निबंधाचा प्रश्न हे अगदीच अलिखित होते.काही गोष्टी भूतकाळ झाल्याशिवाय आठवणी बनत नाहीत हेच खरे.पण सगळाच भूतकाळ आठवणींच्या नावाखाली समोर येत नाही.

       याच आठवणींना उजाळा मिळाला जेव्हा आमच्या बिल्डींग मधल्या मुलांचा सहामाही परीक्षेचा भाषेचा पेपर झाला तेव्हा.पार्किंगमध्ये गाडी लावत असताना त्या काकू मुलाला विचारात होत्या, " कुठला निबंध लिहिलास ?,निबंध शेवट लिहायच्या नादात विसरला नाहीस ना ? पेपरमध्ये टिकमार्क केला नाहीये म्हणून विचारतीये."…वर्तमानाचे आवरण गळून पडले आणि भूतकाळाच्या आठवणींनी दाटी केली.त्या काकूंचा प्रश्न अगदीच सरळ होता.त्या मुलाचे उत्तर देखील त्या प्रश्नाला साजेसे असेलही,पण ते उत्तर ऐकण्याच्या मनस्थितीत मी नव्हतो.या प्रश्नाला मी सुद्धा सरावलेला होतो.निबंध म्हटल्यावर भीतीपेक्षा कंटाळा जास्त वाटायचा,त्यात वेळ कमी पडेल असे नेहमी वाटायचे. आणि त्या नादात शेवट कायमच गुंडाळला जायचा.…आणि याच मुद्द्यावर मी भूतकाळ सोडून वर्तमानात आलो.गाडी लावली आणि थेट त्या मुलाचा पेपर हातात घेतला.पेपरच्या उजव्या बाजुला किती मार्क मिळतील हे गोल करून लिहिले होते.जमलेल्या प्रश्नावर बरोबरची खूण केली होती.’रिकाम्या जागा भरा’ या प्रश्नाची उत्तर पेन्सिलने लिहिलेली होती.मी पटकन निबंधाचे विषय पाहून घेतले.त्या मुलाने तिसऱ्या पर्यायावर बोट ठेवून 'हा निबंध लिहिला' असे हसत उत्तर दिले.तो निबंधाचा विषय होता 'रेल्वे स्थानकावरील एक तास'.तो मुलगा नंतर पेपर घेवून वर गेला आणि माझ्या डोक्यात विचारांची मिटिंग सुरु झाली. मला समजा निबंध लिहायची वेळ आली आणि हाच विषय फक्त 'रेल्वे स्टेशन' ऐवजी 'विमानतळ' असा आला तर काय होईल..? आणि म्हणूनच आपल्याला तेव्हा जमले नसते पण आता कदाचित निट जमू शकेल आणि लिहायला वेळ देखील पुरू शकेल या आशेने मी हा निबंध लिहायला घेतला.

          उगीचच समोर पेपर आहे आणि समोर निबंधाला 'विमानतळावरील दोन तास' हा विषय आहे अशा थाटात मी लिहायचे ठरवले.

प्रश्न १ ला.  खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर सुमारे २५० ते ३०० शब्दात निबंध लिहा.    ( १५ )

          १. ……….
          २ ……….
            'विमानतळावरील दोन तास'
          ४ ……….
          ५ ……….   
 
उत्तर : 

        एयरपोर्टवर जायचे म्हणजे विमानात बसलेच पाहिजे असे काहीही नसते.हल्ली घरटी एक व्यक्ती शिक्षण किव्वा नोकरी निमित्त परदेशात असते.त्यामुळे कोणाला आणायला किव्वा सोडायला एयरपोर्टवर जाण्याचा योग येतोच.तर त्याच कारणामुळे परवाच मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाण्याची संधी मिळाली.
     एयरपोर्ट ते हि आंतरराष्ट्रीय आणि तेही मुंबईत या सगळ्या गोष्टी जुळून आल्या कि डोळ्यासमोर एक वेगळीच  प्रतिमा तयार होते.काहीतरी भव्य दिव्य असेल असे उगीच वाटते आणि आपल्या अपेक्षा उंचावतात.

       का कोण जाणे पण मला एक कोडे कायमचेच पडलेले आहे.सकाळी छान अंघोळ वगरे करून,नाश्ता करून दहा वाजता विमान आहे असे कधी ऐकले आहे का ? सगळ्यांची विमानं रात्री दहा नंतरच कशी उडतात ? सकाळी विमान चालवण अवघड आहे का ? प्रश्न अतिशय बाळबोध असला तरी मला कायम पडतो.रात्री बाराला सिक्युरिटी चेक,रात्री एक वाजता आत सोडतात.बर आता आम्ही निघणार पुण्यावरून त्यामुळे आधी मुंबईचा प्रवास आणि मग एयरपोर्टची वाट.अर्थात पुण्यात एयरपोर्ट होईपर्यंत याला पर्याय नाही.
      तर विषय भरकटण्याआधीच मुद्द्याचं बोललेला अर्थात लिहिलेला बरं.हा तर मुंबईच्या देखण्या एयरपोर्टवर पोहोचल्यावर लक्षात येते ती मुंबईची भव्यता.’छत्रपति शिवाजी आंतरराष्ट्रीय हवाई अड्डा’ हा मोठा बोर्ड पाहिल्यावर मला उगीचच दडपण आल्यासारखे वाटते.

      दुतर्फा लावलेले आगमन आणि प्रस्थानचे मोठे फलक,विविध आंतरराष्ट्रीय विमानसेवा पुरविणार्यांची ओळीने लिहिलेली नावे,अखाती देश,गोऱ्यांची विमाने,अमेरिकेचा थाट आणि इतर बरीच नावे एका मागून एक डोळ्यासमोरून जात असतानाच आपण तिथे पोहोचतो. 
 
      एखाद्याला घ्यायला जायचे असेल तर साहजिकच खालच्या बाजूला 'आगमन' लिहिलेल्या कमानीखालून गाडी थेट आगमन दारात येवून थांबते.आणि मग या एयरपोर्ट वरील विविध गोष्टींचे कुतूहल आणि नाविन्य उलगडत जाते. 

          आप्तेष्टांची वाट पाहत आशाळभूत नजरेने समोरच्या काचेच्या दारावर डोळे लावून बसलेले आपल्यासारखे असंख्य चेहेरे दृष्टीक्षेपात येतात.परदेशी नागरिकांना घ्यायला आलेले 'Pick Up & Drop' चे ड्रायव्हर त्यांच्या नावाचे फलक घेवून उभे राहिलेले दिसतात.कोण कसा काळा कि गोरा किवा काळी का गोरी आपल्या वाटेला येईल याचा शहानिशा करीत असलेले ते ड्रायव्हर निवांत गप्पा मारत बसलेले असतात.काही लोक त्या सामानाच्या ट्रोली शोधत फिरत असतात.कामानिमित्त एकटे फिरणारे आपल्या कामात व्यग्र असतात.त्यांना तर सदैव घाईच असते.एखादीच Bag असल्यामुळे ते ट्रोलीच्या फंदात पडत नाहीत.
        आमच्यासारखे घ्यायला आलेले लोक एक डोळा त्या बाहेरच्या लावलेल्या टीव्हीच्या पडद्यावर आणि दुसरा डोळा त्या समोरच्या काचेच्या दाराकडे लावून बसलेले असतात. अर्थात वयानुसार भिरभिरणारी दृष्टी बदलत असते.एका ठराविक वेळानंतर चक्कर मारून पुन्हा त्याच जागी आल्यावर असे लक्षात येते कि जशी आपली परिस्थिती असते तशीच बाकीच्यांची. 

      एखाद्या विमानाच्या नावासमोर 'Arrived' असे लिहून आले कि लोकांमधील उत्सुकता वाढत असते.मधूनच मोठ्या जत्थ्यानी लोकं बाहेर पडत असतात.बाहेर येवून मोठ्याने हाक मारून घ्यायला आलेल्यांना मिठ्या मारण्याचे प्रकार सर्रास् पहायला मिळतात. मधूनच येणारा पायलट आणि हवाई सुंदर्यांचा समूह लक्ष वेधून घेतो.पाण्यात बराच वेळ राहून बाहेर आल्यावर आपण जसा दीर्घ श्वास घेतो त्याप्रमाणे ते लॉबी मधून बाहेर आले कि सिगारेट पेटवतात.त्यांची वेशभूषा आणि रुबाब बघितला कि आपण दिवसातले आठ तास एकाच खोलीत बसून काय करतो असा प्रश्न मला साहजिकच पडतो.
विविध रंगाचे लोक आणि त्यांनी लावलेले नानाविध रंगाचे परफ्युम नाकाचे पारणे फेडत असतात.लोकं विमानातून प्रवास करतात कि मिरवायला जातात हा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही.परदेशी नागरिकांचे सोडाच पण भारतीय वंशाचे प्रवासी देखील विमान प्रवासात समारंभातील पाहुणे वाटतात.उगीचच एखाद्या पार्टीला आलोय कि काय असा भास होतो.  

          मात्र याचाच विरोधाभास पाहायला मिळतो जेव्हा युरोप वरून येणाऱ्या प्रवासी दारावरून पुढे जावून आपण अरब देशातील विमानाच्या 'Arrival' पाशी येतो.दौंड जंक्शन च्या 'Platform' ची आठवण झाल्यावाचून राहत नाही.अक्षरशः बोचकी आणि ट्रंका यांनी व्यापलेले प्रवासी पाहायला मिळतात. पाचशे मीटरच्या अंतरात एवढी तफावत कमालीची विचित्र वाटते.
          पुणे स्टेशनच्या कॅन्टीन मध्ये आठ रुपयाला मिळणारे Sandwitch इथे पन्नास रुपयाला विकत घेवून Aluminium च्या कागदात गुंडाळून खाणारे प्रवासी पहिले कि आंतरराष्ट्रीय विमानप्रवासाच्या भव्यतेची प्रचीती येते.

          साधारणतः प्रवास करणार्यांपेक्षा निरोप देणारे आणि स्वागत करणारे यांची संख्या इथे जास्त असते.राहणीमानानुसार या लोकांची स्वागत करण्याची किव्वा निरोप देण्याची पद्धत बदलते.काहींचे अश्रू स्वागत करतात.काहींची मिठी तर काहींचे ओठ…काही नुसतेच हस्तांदोलन करून स्वागताचा आनंद घेतात.भावनांची खोली मोजण्यासाठी पट्टी अजूनतरी आलेली नाही पण लोक आपापल्या परीने भावना व्यक्त करीत असतात.आणि याच गोष्टी निरोपाला देखील नक्की होत असणार.   

        सरावलेल्या प्रवाशांच्या वावर्ण्यातील आत्मविश्वास आणि नवशिक्यांच्या कृतीतील अडखळणे स्पष्ट दिसत असते.सामानाची ट्रोली ढकलण्यापासून ते पासपोर्ट जपून ठेवण्यापर्यंत सगळ्या हालचालीत अनुभवानुसार फरक आढळतो.चोवीस तासांचे घड्याळ बघताना होणारी तारांबळ देखील काहीवेळा मजेशीर ठरते.आपले विमान दुसऱ्या देशात कधी पोहोचेल या चर्चेमध्ये होणारी वेळेची गम्मत ऐकणे हा अनुभव नक्की घ्यावा.

         हे सगळे अनुभव घेताना दोन अडीच तास कसे जातात याचा अंदाज पण येत नाही. एव्हाना आपले पार्सल पोहोचलेले असते.वर लिहिल्याप्रमाणे आपण देखील त्यांचे स्वागत करतो.आणि मार्गस्थ होण्यासाठी बाहेर पडतो.गाडीपर्यंत पोहोचून त्या परिसरातून बाहेर पडतानाचा वेळ वेगळाच असतो.कदाचित त्या वातावरणातून मानसिकदृष्ट्या बाहेर येण्यासाठी तो वेळ असतो असे मला प्रत्येक वेळी वाटते.कारण मुंबई एयरपोर्टच्या बाहेर आल्यावर अंधेरीची गर्दी आ करून उभी असते.कदाचित सगळी कडे हीच परिस्थिती असेल असे नाही पण किमान माझा अनुभव तरी हेच सांगतो.

         माझे दोन तास चुटकीसरशी संपतात.आणि प्रत्येक वेळी नवीन अनुभवाची भर पडत जाते.

     या निबंधाला कदाचित गुण मिळणार नाहीत पण निबंध लिहायला वेळ कमी पडला नाही हे समाधान नक्की आहे.





                                                                                  हृषिकेश पांडकर
                                                                                  २७/११/२०१३

Thursday, November 21, 2013

स्वप्नवत नाश्ता ...

सचिनचा शेवटचा सामना अपेक्षेनुसार तीन दिवसात संपला.उरलेले दोन दिवस प्रसिद्धीमाध्यमांनी आणि वृत्तपत्रांनी सचिनची कुंडली आपल्यासमोर व्यवस्थित मांडली.
एका पर्वाचा अंत झाला… 

त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजे परवा मुंबई ला जाण्याचा योग आला.एक दिवसाचा मुक्काम असल्याने साहजिकच एक दिवस फिरण्यात घालविण्याची इच्छा होती.रविवार सकाळी लिओपोल्ड कॅफेत ब्रेकफास्टला जावे असे ठरले. मी अंधेरीला असल्यामुळे मी एकटा जाणार होतो आणि बाकीचे दोन मित्र चर्चगेट वरून डायरेक्ट येणार होते. 

     लोकलनी प्रवास म्हणजे पहाटेच निघावे या विचाराने मी लवकरच घराबाहेर पडलो. रविवार सकाळ असल्याने खूपच लवकर मी लिओपोल्डला पोहोचलो.मित्रांना यायला वेळ लागणार होता.मी शांतपणे कॅफेत जावून बसलो.

पुढे घडलेला प्रसंग माझ्या समोरील पाच लोकांच्या टेबल वर घडलेला असून त्याचा वास्तवाशी संबंध असू शकतो

इथून पुढे थेट लिओपोल्ड मधून…. 

( दादा डोक्यामागे हात ठेवून निवांत बसला आहे,डोळ्याला गॉगल आणि अंगात स्लीवलेस त्याच्या समोरच्या खुर्चीत VVS बसला आहे )
दादा : अरे कधी यायची ही लोकं ??…किती वेळ लावलाय. आणि या छोट्या हॉटेल मध्ये ए. सी. पण नाहीये.  
VVS : येतील येतील दादाएवढा पण पेशन्स नाहीये का तुझ्याकडेअत्ता कुठे सुटले आहेत एकदाचे,येतीलच इतक्यात.
(तेवढ्यात हातात कॅमेरा आणि दोन पुस्तक घेवून जंबो आत येताना दिसतो)
दादा : ये ये बसझाले मनासारखे फोटो काढून बस
जंबो : अरे बाकीचे दोघं कुठे आहेत ? आज पण उशीर केलाय का ?… आता कसली कामं आहेत यांना ?
VVS : अरे जंबो,तू तर असा वैतागला आहेस कि तुझ्या बोलिंग वर कोणी कॅच सोडलाय
( दादा आणि VVS जोरात टाळी देवून हसतात )
तेवढ्यात Jammy आणि SRT येतात
( Jammy टी शर्ट आणि जीन्स मधे, टी शर्ट व्यवस्थित खोचलेला आणि हातात मोबाईल,SRT थ्री फोर्थ आणि "I LOVE MUMBAI" असा लिहिलेला आणि गेट वे ऑफ इंडियाचा फोटो असलेला टी शर्ट.)
VVS : याआले आलेझाल एकदाच खेळून ?… आत्ता थांबतील मग थांबतील,पण नाहीच शेवटी थांबले एकदाचे.
दादा : जाऊदे VVS मोठी लोक आहेत.
Jammy :  अरे कसली मोठी लोक दादा, आपण एकत्रच सुरुवात केलीये खेळायलाअर्थात तू ९२ साली आला होतास त्यानंतर काही दिसला नाहीस टीम मध्ये हाहाहाहा….
SRT : हो खरयआणि तुम्ही लोक येईपर्यंत मी तसा जुनियर असल्यासारखाच होतो.
जंबो : बर ते जाऊदे रेअरे बाबांनो ते PF च्या पैशांचे विचारले का कोणी ? नंतर परत पेन्शन ची वगरे लफडी असतात.
VVS : हो ना यारमला तर फक्त टेस्टचाच PF आलाय.वनडे चा अजून मिळायचा आहे.  
दादा : अरे VVS तू वनडे पण खेळला आहेस का ? तुला बघितलच नाहीये रंगीत कपड्यात
Jammy : नाही नाही दादा असा नको म्हणूस ऑस्ट्रेलियाला वनडे सिरीजला तो एकटाच खेळलाय
SRT : तसही ऑस्ट्रेलिया मध्ये आपण टीम म्हणून फार कमी वेळा खेळलोयएखादाच प्लेयर खेळायचा आपला.
दादा : Jammy आणि SRT मुळे किमान तीन दिवस तरी टेस्ट चालायची.
SRT : अरे माझ्यापेक्षा पण VVS चांगला खेळायचाऑस्ट्रेलिया आणि तो हे समीकरण उगीच नव्हते.
जंबो : अरे पण तरी शेवटच्या सिरीज मध्ये आपण खर्या अर्थाने टीम म्हणून खेळलोच की . नाहीतर या आधीची सिरीज भांडण्यात घालवली.
Jammy : जाउद्याआता भज्जी आणि सायमंड सारख्या लोकांच्या नादी लागण्यात काहीच अर्थ नाहीये.एकतर भज्जी कसा आहे हे माहितीये तुम्हाला.तरी SRT मध्ये पडला म्हणून आटोक्यात आलं.
VVS : आपल्याकडे भांडायला लोक कमी नव्हतीकाय दादाहाहाहा
दादा : काय म्हणायचं काय तुलाअरे मी कायम टीमच्या हितासाठी भांडायचो.तुमच्यासारखा स्लीप मध्ये नखं खात बसलो नाही कधी.
जंबो : अरे मला तुम्ही तीस यार्डमध्ये उभं पण राहून दिलं नाही.
SRT : जंबो अरे तीस यार्डमध्ये चेंडू खूप जोरात येतो. उगीच लागला वगरे तर काय घ्यात्यात तू पळणार नाहीस.
Jammy : SRT पण जंबो लागलं असून देखील खेळायला आला होता.आठवतंय नालारा ची विकेट घेतली होती.
 VVS : हो ते मात्र मानलच पाहीजे.अगदी सरदार सारखी पगडी बांधून आला होता खेळायला.
दादा : नाही खरच कमिटेड प्लेयर होता आपल्यातलाइनिंग मध्ये दहा विकेट म्हणजे चेष्टा नाही.
जंबो : अरे त्या दहा विकेट मुळे आठवलंतीन निर्णय माझ्याबाजुने गले नसते तर ते कधीच शक्य नव्हतं.बिचारा सकलेननशीब रेत्यात श्रीनाथ नि मुद्दाम वाईड टाकून मदत केली ती वेगळीच…(सगळेच हसतात).  


SRT : अरे खोट आउट देणे या बद्दल तर मी न बोललेलंच बरअरे काय तो बकनर काय तो अलीम दारअरे अंगाला चेंडू लागला तर LBW आणि नाही लागला तर 'Caught Behind' देतात रेशेवटची सिरीज पण सोडली नाही यांनीतिथे काही प्रतिक्रिया दिली नाही पण डोक्याला शॉट होतो.  
दादा : खरयत्या पोंटिंग नि तर एक टप्पा कॅच घेतल्याचा अपील केला होता रे
VVS : …अरे अम्पायरलाच आउट द्यायला सांगणारे हे लोकआणि म्हणे 'Gentelmens Game'.
Jammy : अरे  'Gentelmens Game''Gentelmens Game' म्हणून मी दोनदा आउट नसताना परत आलोय.आता बोल
VVS : अरे त्या कोलकाता टेस्ट मध्ये मी आणि Jammy दिवसभर खेळलो खरे,पण पोंटिंगचा एका चेंडूवर 'LBW ' वाचलो होतो.बर झाल दिला नाही.पोंटिंगनी बोलिंग करण्याची वेळ यावी यासारखे दुर्दैव नाही ऑस्ट्रेलियाचंआणि त्याला विकेट द्यावी यासारखा पाहुणचार नाहीहाहाहाहा   
जंबो : अरे एका 'LBW'च काय घेवून बसलायमाझ्या फ्लिपरवर असंख्य 'LBW' दिले नाहीयेत,त्याचा काहीच नाहीये तुम्हाला
VVS : हाहाअरे जंबो फ्लिपर पेक्षा पेस आणि सरळ चेंडूनवरच जास्त विकेट्स मिळाल्या आहेत तुलातूच आमचा खरा 'Pace Attack' होतास.( सगळे मोठ्याने हसतात जंबोसहीत)
जंबो : अरे काही का असेनापण बोलर होतो,आणि बोलर असून देखील लॉर्डस वर टेस्ट शतक आहेतुझी देखील असेल कदाचित…( जीभ चावत )किमान इंग्लंड बरोबर एकतरी
( सगळे परत हसतात …VVS इकडे तिकडे बघतो.)
SRT : जाऊदेलॉर्डस आणि शतक याचा विषय नको रे
दादा  : ( गालातल्या गालात हसतो )
जंबो : बर जाऊदे खायला मागवातसही लंच टाईम झालाय
Jammy : संपूर्ण कारकिर्दीत दिवसाची हि वेळ मी मैदानावरच काढलीये…'Batting' असो किव्वा 'Bowling'. त्यामुळे या वेळेची किंमत जास्त आहे मला.सांगूयात काहीतरी खायला.
दादा : अरे निम्मे चेंडू तर तू सोडूनच दिले आहेत तुझ्या करियर मध्ये…( SRT ला डोळा मारत)
SRT : जाऊदे दादातू पण 'Short Balls' सोडू शकला असतास.
(SRT आणि Jammy टाळ्या देतात.)
VVS : Jammy जाऊदे तू जॅम आणि ब्रेड सांग तुला खरच भूक लागलीये
Jammy : मग त्या हिशोबानी दादाला चावनप्राश खावे लागेलम्हणजे पोट फक्त माझा आणि SRT च भरेलतू आणि जम्बो तर अगदीच उपाशी राहणारहाहाहाहाहाहा
दादा : हाहाहा दरवेळी 'कांगारू करी' खावून याचा आयुष्यभराच पोट भरलंय.
(SRT खायची ऑर्डर देतो.)



जंबो : अरे मग त्याच कांगारूनबरोबर २००३च्या फायनल का नीट 'Batting' केली असती तर आम्ही पण WC च्या 'Winning Team' मध्ये आलो असतोआणि आता VVS ला बोलतोय तू.
Jammy :  तेव्हा विरु सोडला तर कोणीच खेळले नाही.अरे आपण ३६० रन्स दिले यावरच माझा विश्वास बसत नाही. 
दादा : अरे काय करणारतो ZK बघ ना. पहिल्या ओवर पासून खुन्नस देतोयते पण गिलख्रिस्ट आणि हेडनला.अरे आपला पेस काय,आपण करतोय काय ? तरी मी त्याला तीन वेळा सांगितला पण नाहीच.
SRT : जाऊदेआता खेळ आहे .या गोष्टी व्हायच्याच
जंबो : अरे तुझा ठीक आहे रेतुझ काम झालय २०११ ला.त्यामुळे तू समाधानी आहेस.आमच्या कारकिर्दीत आम्हाला तो आनंद नाही मिळाला ना. तुझ्यावेळी तुझा कर्णधार खेळला…'Captains Knock'…हाहाहा
दादा : जंबो अरे आता तू कर्णधारावर काय घसरतोयअरे त्या दिवशी माझा खेळ चांगला नाही झाला.पण आदल्याच सामन्यात केनिया विरुद्ध माझे शतक आहे.   
VVS : कुठली टीम ??….हाहाहाहाजाऊदे ताट सरकवा इकडे…( सगळे हसतात)
SRT : हो जंबो तेवढा खरयअरे ती एकच सल राहिली असती पण पोरांनी करून दाखवल.नाहीतर तेव्हाही आपला विरु लवकरच आला होता आतमध्ये आणि ते पण 'रेफरल' वाया घालवूनमी पण काही विशेष केलं नाही पण माही आणि गौती नि करून दाखवलं.
Jammy : आईला WC म्हणलं  कि मला नकोच वाटत२००७ ला काय दिवे लावले आपण.अरे बांगलादेश कडून हरलोय.
दादा : नाहीतर कायकाय एक T-20 WC जिंकला तर सगळेच हवेत
जम्बो : चालायचंच दादा नवीन कर्णधाराचा पहिलाच WC होताआता आपले रथी महारथी वनडे WC ला नाही खेळले तर कसा जिंकणार WC …हरलेते हि बांगलादेश कडून ? हाहाहाहा
दादा : अरे तुम्ही सारखा 'Captain Captain' काय लावलाय ? ( बाकी सगळे हसतात)लोकांनी Captaincy स्वताहून सोडलीये हाहाहाहा
SRT : आईला
Jammy : अरे मला तर कधी मिळाली आणि कधी गेली समजलच नाहीहाहाहा
VVS : अरे स्लीप ला उभे राहणे आणि Ball ला शाईन करणे यापलीकडे मी काहीही केले नाहीये त्यामुळे captaincy तर माझ्यासाठी खूप दूरची गोष्ट. 
जंबो : अरे शाईन करायचा काम सुद्धा निट केल नाही तू.निम्म्या वेळा मलाच करावी लागायची.
SRT : अरे उरलेल्या निम्म्या वेळात मी केलीयेकवर्स मध्ये उभा राहून
Jammy : अरे SRT नि शाईन केलीये सुद्धा आणि घालवलीये सुद्धा आणि एकदा तर म्हणे सीम सुद्धा कुरतडलीये…( बाकीचे हसतात ) 
दादा : अरे पण तेव्हा ते तिथेच क्लियर झाला कि त्याने कुरतडली नसून त्यावरचे गवत काढले आहेखोटा आरोप होता तो च्यायला तेवढ्यासाठी आफ्रिकेतून परत यायला लागला
VVS : हममतेच म्हणणार होतो मी…SRT वर आरोप करणे योग्य नव्हते
SRT : आईला नुसतं सीम वरचं गवत काढला तर एवढी बोंब लोक हल्ली प्रातर्विधी पीचवर उरकतात हे चालता यांनाहाहाहाआणि म्हणे आम्ही क्रिकेटचे जनक
जंबो : आधी एखादा विश्वकरंडक तरी जिंकाआणि म्हणे जनकहाहाहा
Jammy : अरे जनक वरून आठवण झालीतो शोएब अख्तर चा 'बाप बाप होता है' वाला किस्सा खरा आहे का रे SRT ?
SRT : हाहाहाअरे विरु खरच म्हणाला का ते मला माहित नाही पण ती सिक्स मारलेली माझ्या लक्षात आहे.खर तर त्याला सिक्स मारणं सोप आहेहाहाहा
 VVS : हाहाहा मिडिया समोर उगीच खोटं सांगाव लागत…'Talented Player' वगरे
दादा : हाहाहाकाय गचाळ प्लेयर आहेतो काय तो मोहम्मद युसुफ कायत्याला तर मी भर मैदानावर झाडलाय
VVS  : हो ना दादाअरे तू कोणाला सोडला आहेस तेवढा सांगअरे तू 'Steve Waugh' ला पण नाही सोडलास ते हि ऑस्ट्रेलिया मध्ये त्यांच्या देशात 
Jammy : अरे आत्ताची पोर बघातो कोहली,धवनत्या 'Watson'च भर मैदानात माकड बनवलबिचारा काही बोलू पण शकला नाही.
SRT : आता त्याच जोशात खेळतायेत म्हणून प्रश्न नाहीपण शिस्त हवीच.
दादा : हा तू तेवढा शिस्तीचा सांग सगळ्यांनाइतके दिवस शांत होतो आपण म्हणून ते ऑस्ट्रेलियन बोलत होतेत्यांना तसेच दिले पाहिजे रे
जंबो :  हो आता बरोबर आहेदादाची Bat ऑस्ट्रेलिया समोर तळपली नाहीपण वागण्यातून तू व्यवस्थित समज दिलीस हाहाहा
दादा : तळपली नाही कायजेवढे फोटो तू ब्रिस्बेन मध्ये काढले नसतील तेवढ्या रन्स आहे माझ्या 'Gabba'वर 
VVS : दादा तू कुठे लगेच अशा गोष्टींवर चिडतोखावून घे
SRT : अरे खावून घ्या रेगार होतंय ते
Jammy : होवूदे रे गारआता काय घाई आहे तुलासगळ्यातून बाहेर पडला आहेस आता तूशिवाय 'Commentry' पण करशील अस वाटत नाही आता.आम्हाला ते तरी काम आहे किमान.  
SRT : हो ना रावआता खरच काम नाहीयेतुमचं तरी बरंय बडबडीच काम मिळालय.
VVS : हाहाहा आता खर्या अर्थाने दादाला 'Job Satisfaction' मिळेल.
Jammy : बिचारा जंबो IPL मधून लगेचच बाहेर पडला.
दादा : होअरे डाइव्ह मारताना दहा वेळा विचार केला कि असाच होणारहाहाहा
जम्बो : दादातुला देखील फार काही जमलय अशातला भाग नाहीयेशेवटी कोणीच घेतला नाही तुला हाहाहा   


Jammy : अरे तुम्ही आपापसात भांडू नका रेतुम्हीच असा म्हणालात तर VVS  कोणाकडे पाहणार ? तो तर कसाबसा IPL खेळू शकला आहे. हाहाहा
SRT : अरेजंबो पण एकाच सिझन खेळला आहे.त्यामुळे IPL हा मुद्दा वादाचा होवू शकतो.( सगळेच मोठ्ठ्याने हसतात)
जंबो : चला निघावं
दादा : अरे थांब रेआता तुला काय घाई आहे ? इथे मुंबईत कसले फोटो काढणार आहे भर दुपारी ? आणि आम्ही 'Batting' करत असताना तसही भरपूर फोटो काढलेले आहेत.
VVS : अरे चल मी पण निघतोआता वेस्टइंडीजच्या वनडे सुरु व्हायच्या आधी घरी जावून यायच आहेपरत कॉमेंट्री आहेच.  
Jammy : खरच रेचला,एकतर या SRT च्या शेवटच्या सामन्यामुळे अशक्य दगदग झालीये.
SRT : अरे दगदग कसली ? मस्त AC खोलीत बसून गप्पा तर मारत होता तुम्ही.त्यात निम्म्यापेक्षा जास्त वेळ हर्षाच बोलत असतो.
दादा : अरे त्या बाबतीत तुझा अनुभव कमी आहेतुझा अजून त्या क्षेत्रात 'Debut' व्हायचय.हाहाहा
जंबो  :  अरे चलाअजून तिकीट काढायचंय विमानाचं. आता BCCI काढत नाही. हाहाहा
SRT : अरे रेल्वे विमानाची तिकीट कसली काढतामाझ्याकडे बघा भारतभर विमानप्रवास फुकट हाहाहा
Jammy : हाहाहाहाभारतरत्न SRT
VVS : अरे खरच किएवढी बक्षीस मिळाली पण याची मज काही वेगळीच असेल.
जंबो : त्या कार्यक्रमाला फोटो काढायला बोलाव मला तसाही काहीच करत नाही मी सध्या
दादा : अरे आफ्रिकेत टेस्ट क्रिकेटची कॉमेंट्री मला जर भीती वाटतीये.'Short Ball' हा शब्द उच्चारायला सुद्धा नको वाटतंयचला निघूया.
Jammy : अरे भेटत जा असेचतेवढ्याच जरा जुन्या आठवणी.
VVS : मी तर म्हणतो एखादी टेस्ट सिरीज एकत्र बघुयात.कळेल कशी खेळतात हि पोरं.
SRT : अरे नक्कीच चांगली खेळणारआपण एकत्रच बघुयात.
जंबो : मला तर वाटतंय कि २०१५  चा WC आपलाच असणार आहे.काय टीम आहे आपली मस्तच
Jammy : चांगली टीम झालीये आणि लिडर पण चांगला मिळालाय   
दादा : ए अरे आपल्या वेळेला लिडर चांगला नव्हता अस म्हणायचं का तुम्हाला
( पुन्हा एकदा सगळेच मोट्ठ्याने हसतात)
( सगळे निघतात SRT पैसे भरतो,Jammy TIP देतो,जंबो ग्रुप फोटो घेतोदादा गॉगल लावून बाहेर पडतो,VVS बडीशेप घेण्यासाठी काउंटर वर जातो  सगळे निरोप घेतात आणि मार्गस्थ होतात )  

-----------------------------------------------------------------------------------------------------------------

माझे मित्र येवून गेले बहुतेक पण आज मी वेगळ्याच लोकांबरोबर नाश्ता केलामी पण बाहेर पडलो

                                                                                                हृषिकेश पांडकर
                                                                                                २१/११/२०१३