Monday, November 28, 2011

स्वप्नपूर्ती ….


    काही गोष्टी विसरायच्या आहेत म्हणून लक्षात ठेवल्या जातात...आणि मग त्या कायमच्याच अविस्मरणीय होऊन जातात...

       कदाचित वर लिहिलेली ओळ याक्षणी मला किंचित खटकत असेलही..आणि खटकत आहेच..कारण मी ज्या विषयी पुढे लिहिणार आहे ती गोष्ट मला विसारावीशी का वाटत होती याचे आत्ता माझ्याकडे उत्तर नाही...
      एखादी गोष्ट करायची प्रचंड इच्छा असते.आणि त्या गोष्टीची इच्छापूर्ती होणे यासारखे समाधान नाही.
टीव्ही,इंटरनेट,रेडीओ,मासिके,पुस्तके,वर्तमानपत्र या माध्यमातून क्रिकेट अक्षरशः मनगटापासून चाटून पुसून घेतले आहे.
      पण आज पर्यंत एकही टेस्ट match याची देही याची डोळा पाहण्याची संधी कधी मिळाली नव्हती.India-WI च्या तिसर्या आणि शेवटच्या सामन्यात तो योग होता असे म्हणायला हरकत नाही.सामना मुंबईच्या वानखेडे stadium वर होता.
      उद्या आपली batting येईल या हिशोबाने आदल्या दिवशी मुंबईला गेलो.रात्री ९ ला निघाल्याने पोहोचायला साधारण ११.३० झाले.मुंबईत कमी गर्दीच्या वेळा दाखवणारे घड्याळाच तयार झालेले नाही.त्यामुळे express-way संपल्यावर मुंबई चालू झाली हे सांगण्यासाठी "Navi Mumbai Welcomes you" या सारखे वेगळे बोर्ड लावायची काय गरज आहे असे मला नेहमी राहून राहून वाटते..समुद्राचा खरा वासच खुद्द प्रवेशाला सुवास शिंपडायला आहे.

     तर सांगायचा मुद्दा एवढाच कि आम्ही रात्री ११ .३० ला मुंबई ला पोहोचलो.अर्थात मुक्कामाचे ठिकाण अंधेरी असल्यामुळे तिथे पोहोचण्यासाठी एक वेगळा प्रवास करावा लागतो हे हि तितकेच खरे आहे.पण उद्या आपल्याला match पहायची आहे या उत्साहातच मी इतका गुरफटून गेलो होतो कि प्रवासाचा शीण आला आहे हे जाणवायला  माझ्याकडे वेळच नव्हता.
      सकाळी उठणे हा माझ्यासाठी थोडा कठीण प्रकार आहे मात्र कठीणतेची व्याख्या उठून काय करायचे आहे या गोष्टीनुरूप बदलत राहते.आणि उद्या तर साक्षात देवाच्या दर्शनाला जायचे होते आणि तेही देवाच्या सर्वोच व प्रार्थनीय रुपात.त्यामुळे  उठण्याचा कंटाळा,किव्वा लवकर जाग न येणे यांसारखे शुल्लक अडथळे उद्भावायचा संबंधाच नव्हता.
     सकाळी सुमारे ६ वाजता एक अनामिक ओढ आणि कमालीचे औत्सुक्य या दोन गोष्टी sack मध्ये भरून वानखेडे गाठले.तिकीट मिळविण्यापासून सुरुवात होती.डोक्यात फक्त एकाच विचार होता कि तिकीट मिळवणे आणि stadium मध्ये जाऊन बसणे.Marin drive ला असलेल्या गेट no ३  वर बसलेल्या security गार्ड  ला तिकीटा बद्दल विचारले.तर तो म्हणाला कि चर्चगेट च्या पलीकडे incom tax ऑफिस समोर तिकीट मिळतील..तुम्हाला स्टेशन मधून जाता येणार नाही.फिरून जावे लागेल.आम्ही शेवटचे वाक्य पूर्ण होईपर्यंत गाडीत बसून पुढे पण गेलो होतो.२ किमी च्या प्रवासात ६ जणांना विचारून सरतेशेवटी आम्ही तिकीट काउंटर ला पोहोचलो.आमच्या आधी ३०/४० लोक आधीपासून रांगेत उभी होती.आणि काउंटर बंद होते.आम्ही पण गाडी लाऊन रांगेत उभे राहिलो.७ वाजले होते.रस्त्यावरची गर्दी वाढत होती आणि रांगेतली देखील.

        रांगेत उभे राहण्याच्या वयातील विविधता पाहून मुंबई आणि क्रिकेट या दोघांचे नाते इतके जुने आणि
घट्ट का आहे यावर पुन्हा एकदा मानसिक शिक्कामोर्तब करून तिकीट खिडकी कडे मी पाहत होतो.हातात हात घालून आलेल्या प्रेमी युगुलांपासून नातवाच्या हातात हात घालून आलेले आजोबा मी आमच्या रांगेत पहिले.प्रत्येकाच्या चर्चेला एकाच विषय कि..आज batting येईल आणि सचिन century करेल...
       शक्यतो वाट पाहण्यात घालवलेला वेळ नेहमीच जास्त  आणि कंटाळवाणा वाटतो असे म्हणतात पण आज रांगेत उभे राहून वाट पाहण्यात घालवलेला वेळ समोर  दिसणाऱ्या वानखेडेच्या ओढीने कसा गेला काहीच समजले देखील नाही.आम्ही रांगेत उभे होतो तिथून वानखडे चे २  floodlights दिसत होते.आणि क्षणार्धात तो  क्षण आठवला जेव्हा धोनी ने WC '११
फायनल ला सिक्स मारून आमचं आणि सबंध देशाचं स्वप्न पूर्ण केला होतं.
       १० ते १५  मिनिटात ३०/४० लोकांची संख्या ३००/४०० पर्यंत गेली होती.सुमारे अर्ध्या तासांनी MCA चे volunteers आणि security गार्ड तिथे आले.आणि आता तिकीट खिडकी उघडणार या शक्यतेने माझ्या  उत्साहाची पातळी अजून वाढली.पण तरीदेखी माझ्या उत्साहाचा अंत पाहत सुमारे अर्ध्या तासानी खिडकी उघडली आणि तिकीट विक्री चालू झाली.एव्हाना गर्दी प्रचंड वाढली होती.रस्त्यावरची आणि रांगेतली देखील.रांगेबाहेर झेंडे,सिक्स आणि फोर चे बोर्ड्स  विकणार्यांचा वेगळाच गोंधळ चालू होता.बाहेरून जाणार्या taxi आणि बस मधून जाणारे कुतूहलाने आमच्याकडे पाहत होते.मात्र आश्चर्य कोणालाच नव्हते कारण मुंबईकरांच्या रक्तात क्रिकेट आहे हेच खरे.बरोबर ८.१५ वाजता आम्ही तिकिटे मिळवून युद्ध जिंकल्याच्या आनंदात तिथून बाहेर आलो.आता पुढची पायरी होती कि गेट no ५ शोधणे.मात्र या वेळी वेळेने आमची परीक्षा घेतली नाही ..थोडे चालत गेल्यावर अजून एक रांग आम्हाला दिसली जेथून आम्हाला आत जायचे होते.पटकन रांगेत जाऊन उभे राहिलो.लोकांच्या उत्साह आणि तिकीट मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून वाहत होता.

        ५ ठिकाणी पोलिसांच्या चेकिंग नंतर आम्ही आत आलो होतो समोर 'North Stand' असे लिहिलेला मोठा बोर्ड झळकत होता.आणि तिथून चढून गेल्यावर जे दृश्य डोळ्यासमोर दिसणार होते त्याची वाट मी गेली २० वर्ष पहात होतो. पायर्या चढून आत गेलो.आणि समोर संपूर्ण वानखेडे दिसत होते.क्षणभर स्तब्ध झालो आणि करोडो वेळा पाहिलेली धोनीची ती सिक्स आणि पळत आलेला सचिन डोळ्यासमोरून जायलाच तयार नव्हता.हीच ती जागा जिथे २२  वर्ष वाट पाहिल्यावर  मिळालेल्या विजयाचा आनंद सचिन ला लपवता आला नव्हता.हीच ती जागा होती जिथे ११ लोकांनी १०० करोड लोकांना स्तब्ध केले होते.हीच ती जागा जिथे भारतचे नाव विश्वकरंडकावर कोरले गेले होते.२ मिनिटे अंगावर कट आला.आणि हातावरून हात फिरवतोय तोच कानावर सचिन च्या नावाचा आवाज येऊन आदळला.संपूर्ण stadium एकाच नावाने ओरडत होते.आम्ही आमच्या व्यवस्थित सावलीची जागा घेऊन बसलो.शेवटी पुणेकर..त्यामुळे दुपारी येणारे उन, संध्याकाळी येणारे उन यांचा भौगोलिक अभ्यास करून खुर्च्या निवडल्या आणि पटकन बसून घेतले.

          एव्हाना stadium भरू लागले होते.WI ची टीम ग्राउंडवर practise करत होती.लोक दिसतील त्याच्या नावाने ओरडत होती.थोडा वेळ ग्राउंड,साईट स्क्रीन ,pavilion,commentary box,सचिन तेंडूलकर stand,गावस्कर stand,गरवारे pavillion या टीव्ही वर दिसणाऱ्या गोष्टी समक्ष पाहण्यात निघून गेला.आणि मग
समोरून एक उंच आणि त्याच्या शेजारी बुटकी अशा दोन व्यक्ती चालत येताना दिसल्या.आणि Natwest Final,सचिन च्या ODI मधील २०० रन्स,Champions Trophy Final,T-20 WC Winning final,WC final अश्या वेळी ऐन क्षणाला commentry करणारा रवी शास्त्री आणि त्याच्या खांद्याला डोकं ( खांद्याला खांदा नाही म्हणता येणार ) लावून चालणारा little master सुनील गावस्कर यांना जवळून बघण्याचा योग आला.टीव्ही मध्ये बघणे किती वेगळे असते हे पदोपदी पटत होते.
       शेजारी असलेल्या A/c रूम मधील टीव्ही मध्ये जाहिराती चालू होत्या.तेव्हा अचानक घरी match सुरु होण्याआधी लागणाऱ्या जाहिरातींची आठवण झाली आणि आणि आज आपल्याला एकही जाहिरात पहावी लागणार नाही याचे समाधान चेहेर्यावर झळकले.समोर नजर टाकतो न टाकतो तोच भारताची भिंत म्हणून
ओळखला जाणारा द्रविड ड्रेसिंग रूम मधून उतरत होता.आणि त्या मागून तलवारी सारखी bat चालवणारा सेहवाग आणि संकट मोचक लक्ष्मण हे तिघेही सरावासाठी येत होते.लोकांनी तिघांच्या नावानी stadium डोक्यावर घेतले होते.
वेगवेगळ्या नेट मध्ये तिघेही batting practise करत होते.आजू बाजूचे लोक बोट दाखवून इतरांना सांगत होते कि त्यांना कोण दिसतंय आणि कोण काय करतंय.

      हे पहात असतानाचा अचानक मोठ्ठा शंखनाद झाला, आम्ही सहज वर पहिले तर वरच्या Stand मध्ये सचिन Fan सुधीर हातात मोठ्ठा शंख डोक्यावर भारताचा नकाशा आणि चेहऱ्यावर तिरंगा रंगवलेला अशा नेहमीच्या वेशात मोठ्ठा तिरंगा घेऊन शंखनाद  करत होता.आता सचिनचा fan शंखनाद करतोय हे लक्षात येताच  मी थेट ड्रेसिंग रूम मधून उतरणाऱ्या पायर्यानाकडे पहिले आणि ज्या साठी केला होता हा अट्टाहास ती गोष्ट डोळ्यासमोर होती अगदी काही फुटांवर.संपूर्ण stadium मध्ये एकाच आवाज होता.सचिन...सचिन ... ती वामन मूर्ती bat आपल्या काखेत ठेऊन पायर्या उतरत मैदानात सरावाला आली.२ मिनिटे WI चे खेळाडू देखील थांबले असतील.
      लोह्चुम्बकाला लोखंडाचे कण जसे चिकटतात त्या प्रमाणे सगळ्यांचे कॅमेरे सचिनच्या  दिशेने रोखले गेले होते.मात्र मोजून १० मिनिटे सराव करून सचिन परत ड्रेसिंग रूम मध्ये परतला.एव्हाना द्रविड,लक्ष्मण  पण गेले होते.ग्राउंड च्या कर्मचाऱ्यांनी सगळी नेट्स काढून नेली.WI चे खेलाडूपण परत वर गेले होते.आता वेळ होती पीच रिपोर्ट ची गावस्कर यांनी नेहमीच्या शैलीत पीच रिपोर्ट दिला.अर्थात आम्हाला तो कळणे शक्यच नव्हता.कारण आज आम्ही मैदानावर होतो.मधला वेळ अत्ता कसा वाटतंय हे घरी आणि मित्रांना फोन करून सांगण्यात उडून गेला.
      आणि एवढ्यात २ अम्पायर stadium मध्ये आले.आणि त्या पाठोपाठ WI चे शेवटचे दोन batsman पण...आणि मग ड्रेसिंग रूम मधून संपूर्ण भारतीय टीम खाली आली आणि T-20 आणि ODI असे दोनही WC उचलून विजयाची सवय लावणारा धोनी आपल्या सहकाऱ्यांना घेऊन मैदानात आला.Stadium आता भरू लागले होते .Match सुरु झाली आणि १०  मिनिटात त्यांची शेवटची विकेट पडली आणि आता आपली batting सुरु होणार या विचारानेच मुंबईकर वेडे झाले.आपली batting आणि सेहवागची तोडफोड सुरु झाली.टीव्ही वरील match आणि Stadium मधली match या दोन भिन्न गोष्टी आहेत याची आता खात्री पटली होती.

        सेहवाग आउट झाला ,आणि राहुल द्रविड मैदानात आला .आपसूकच जागेवर उठून उभे राहिलो आणि फक्त आम्ही नाही तर stadium वरचा प्रत्येकजण उभा होता आणि boundry लाईन ते पीच या चालण्यात संपूर्ण टाळ्यांची सलामी देत त्याचे स्वागत केले..गंभीर  आणि द्रविड ची चांगली जोडी जमली होती. लंच झाला..आम्ही पण खाऊन घेतले..उन डोळ्यावर आले होते.match सुरु झाली ..लोकांची चलबिचल सुरु झाली होती ज्या साठी आपण आलोय ते अजून होत नाही या विचाराने लोकांचा मूड थोडा बदललेला स्पष्ट जाणवत होता.
      आणि तेवढ्यात गंभीर आउट झाला ..आता गंभीर आउट झाला हि बाब भारतीय टीम साठी असेलही कदाचित गंभीर पण लोकांच्या आनंदाला पारावार राहिला नव्हता.गंभीर मान खाली घालून चालत होता बिचारा ,पण stadium मधला प्रत्येक जण सचिन च्या नावाने ओरडत होता....कदाचित या गोष्टीची देखील इतर batsman ला सवयच लागली असेल.गंभीर आत गेला आणि साक्षात देवाने आपल्या संपूर्ण आयुधासाहित दर्शन द्यावे त्याप्रमाणे ती साडेपाच फुटी वामन मूर्ती आपले हेल्मेट सरळ करीत आणि आकाशाकडे पहात मैदानात आली.आणि एकच गजर ग्राउंड वर चालू झाला .लोकांच्या आनंदाला सीमा उरल्या नव्हता.आज Century कर एवढं एकच मागणं प्रत्येक जण करत होता..." तुझ मागतो मी आता ... " अशा अविर्भावात प्रत्येक  भक्त सचिन ला एकच विनंती करत होता.सचिन क्रीज वर पोहोचला आणि ज्या साठी इतक्या लांब आलो ती वेळ आणि व्यक्ती साक्षात समोर उभी होती.

      सगळे रेकॉर्ड्स,प्रसद्धि,मान,पैसा या गोष्टी बाजूला सारून शांतपणे अम्पायर कडे लेग स्टंप मागणारा सचिन टीव्ही वर अनंत वेळा पहिला होता पण आज समक्ष पहिला आणि 'गंगेत घोडा न्हायलं' .....
पहिली ५ मिनिटे त्याला पाहण्यातच गेली,गार्ड मार्क करणे,फिल्डिंग पाहणे,साईट स्क्रीन adjust करणे या गोष्टी होऊन खेळ सुरु होईपर्यंत प्रेक्षकांना उसंत नव्हती .उन्हाचे चटके सोयीस्कर दुर्लक्षित होऊ लागले होते.द्रविड आणि सचिन यांना एकत्रित खेळताना पाहण्याचे स्वप्न डोळ्यासमोर पूर्ण होत होते.बघता बघता दोघांचे अर्धशतक पूर्ण झाले.सचिन ला bat दाखवताना पाहण्याची इच्छा पण एव्हाना पूर्ण झाली होती.एका बाजूला सचिन आणि दुसर्या बाजूला द्रविड हे म्हणजे सिंहगडावर  उभे राहून तोरणा आणि राजगड बघण्यासारखे होते.

     आणि सगळं व्यवस्थित चालू आहे असे वाटत असतानाच द्रविड आउट झाला.८२ रन्स ची ती खेळी बर्याच गोष्टी दाखवून गेली.उभे राहून द्रविड चे अभिनंदन करे  पर्यंत लक्ष्मण मैदानात हजर होता.ऑस्ट्रेलिया ला आपल्या मनगटावर नाचवणारा लक्ष्मण आज पहिल्यांदाच प्रत्यक्ष पाहिला.आणि हाच तो माणूस ज्याने follow-on घेऊन ऑस्ट्रेलिया ला चीतपट केले.आणि दिवसभर खेळून ऑस्ट्रेलियन bowlers ची पिसे काढली होती. दोघेही व्यवस्थित खेळत होते.आणि बघता  बघता दिवस संपला.सचिन ६७  वर नाबाद होता या आनंदातच मी खुर्चीवरून उठलो.सचिन परत ड्रेसिंग रूम कडे जात असताना फक्त हेल्मेट आणि bat एवढाच नाहीतर १००  करोड लोकांच्या शतकी अपेक्षांचा ओझंच जणू घेऊन चालला होता.

      सचिन ड्रेसिंग रूम मध्ये पोहोचेपर्यंत कोणीही आपापली जागा सोडली नव्हती.दोघे आत गेले आणि लोकांच्या चर्चेला आता उत आला होता.तेवढ्यात उद्याच्या तिकिटांची जाणीव होऊन आम्ही त्वरित उद्याची सोय करण्यासाठी रांगेत जाऊन उभे राहिलो.......रांगेतला पर्त्येक जण एकच विषयावर बोलत होता.दीड तासानंतर आम्हाला तिकीट मिळवण्यात यश आले.उद्या शतक पाहायला मिळणार या आनंदात पुढचा वेळ कसा गेला हे वेगळे सांगणे आणि लिहिणे न लागो.

दुसर्या दिवाशीचा सूर्य देखील सचिन चे शतक पाहण्यासाठीच उगवला होता...

      आम्ही जमेल तसे आवरून सकाळी ९ ला stadium मध्ये हजर झालो...तिकीट कालच मिळाल्याने आजचे काम त्यामानाने खूपच सोपे होते.आता एकच गोष्टीचा  ध्यास होता आणि ते म्हणजे महाशतक.खेळ सुरु झाला.सचिन ची प्रत्येक धाव लोकांच्या टाळ्यांची धनी होती.२ चौकार आणि एक सिक्स या प्रकाराने ६७ ते ९४ हा 
प्रवास इतका लगेच झाला कि शतकासाठी फार प्रतीक्षा नाही हे निश्चित झाले होते.आपल्याला शतक पाहायला मिळणार हे आता नक्की झाले होते. लोकांना खुर्चीवर बसायची इच्छाच नसावी कदाचित.
आणि rampaul चा खांद्यापर्यंत उडालेला चेंडू backfoot वर येऊन खेळण्याच्या नादात सचिन च्या bat ची कड घेऊन गेला आणि थेट सामी च्या हातात येऊन विसावला ....

       इतक्यावेळ बेभान होऊन नाचणारे वानखेडे stadium क्षणार्धात गलितगात्र होऊन पडले.२ सेकंदापूर्वी टाळ्या शिट्या वाजवणारे हजारो प्रेक्षक डोक्याला हात लावून स्तब्ध झाले.Stadium वर स्मशान शांतता पसरली होती.महाशाताकाची प्रतीक्षा अजून लांबणीवर पडली होती.एवढ्या जवळ पोहोचून देखील यश न आल्याचे दुख  मात्र सचिन च्या चेहेर्यावर तसूभर देखील नव्हते.तो आपली बात काखेत आणि मन खाली घालून ड्रेसिंग रूम कडे परतत होता.लोकांचा या गोष्टीवर विश्वासच बसत  नव्हता.इतिहास रचताना पाहण्याचे स्वप्न उध्वस्त झाले होते .निराशा लपवण्याचे सगळे प्रयत्न फोल ठरत होते.सचिन सीमेरेषेजवळ जवळ पोहोचला तेव्हा त्याने  प्रेक्षकांना bat उंचावून दाखवली आणि इतक्या वेळ असलेली स्मशान शांतता भंग पावली...कर्णकर्कश  आवाजाने पुन्हा एकदा सचिन च्या खेळला सलाम करण्यात  येत होता.सचिन च्या नावाचा गजर झाला.संपूर्ण भारत कदाचित हेच सांगत असावा कि "हरकत नाही..अरे ९९ वेळा जे तू केले तीच गोष्ट अजून एकदा करायला तुला जमणार नाही हे केवळ अशक्य...आज नाही तर पुढल्यावेळी...आम्ही असेच तुझ्या पाठीशी आहोत."सुमारे ५ मिनिटे लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला..

      सचिन आत परतला आणि धोनी मैदानात आला.पण आता match मधला गाभाच संपल्याची जाणीव लोकांना झाली होती.सचिन गेल्यावर stadium मधील लोक परतू लागले.आणि आम्ही देखील काढता पाय घेतला..
बाहेर आल्यावर सगळी कडे एकच हळहळ होती कि इतक्या जवळ जावून होम ग्राउंड वर ते शतक पूर्ण करता आले नाही..आम्ही एव्हाना stadium पासून लांब आलो होतो.मेसेजस मधून येणारे निराशेचे सुर अजूनच त्रासदायक वाटत होते......

खरच आहे .आम्ही पहायला
 गेलो आणि शतक झाले नाही याचे वाईट वाटणे साहजिक आहे.पण याचा अर्थ शतक होणारच नाही असा नक्की नाही..कदाचित हा योग  कांगारूंच्या देशातच असेल.
हरकत नाही आम्ही तयार आहोत .२६ डिसेंबर ..Boxing Day Test..Border Gavaskar Trophy...MCG..
याची खुणगाठ बांधूनच आणि सकाळची मुंबई अंगावर घेत आम्ही कार पर्यंत पोहोचलो...

आणि या दोन दिवसांनी मला काय दिले याचा हिशोब करतानाच कार चे दार बंद केले...
खिडकीतून बघितले तर समोर डौलाने उभे असलेले गेट वे ऑफ  इंडिया होते आणि मागे क्षणिक दुखाने झुकलेले वानखेडे...

हृषीकेश पांडकर
२८/११ /२०११

Tuesday, November 22, 2011

साखरपुडा.....तो.. आणि.. तो...



    मागच्याच आठवड्यातील तो दिवस....सकाळी उठलो तेव्हा ध्यानीमनी देखील नव्हते कि आज रात्री झोपायच्या आधी मला असे दोन एकाच  बांधणीचे पण टोकाचे अनुभव येतील.म्हणजे एखादी व्यक्ती एकाच दिवसात एकाच पद्धतीचे पण प्रचंड विरोधाभास असलेले अनुभव कसे घेऊ शकते या विचारानेच माझी झोप लांबवली..

           अगदी दैनंदिनी लिहायच्या फंदात पडत नाही पण दिवसाचा घटनाक्रम सांगायचा हा खटाटोप.तारीख, वार लिहिण्याचे  सोपस्कार पाडायची फारशी गरज वाटत नाही.पण दिवस चांगलाच असावा...मित्राच्या साखरपुड्याचा मुहूर्त होता.आता खरं  सांगायचे तर अगदी जवळचा मित्र आहे असे म्हणण्याइतपत  जवळचा मित्र नाहीये..पण ऑफिस हि जागाच अशी आहे कि रोज भेटून  भेटून ओळखीला मैत्री म्हणायची वेळ येते.हरकत नाही..आमची ओळख  ४/५ महिन्याच्या पलीकडे जाणारी नव्हती.पण जन्म कोल्हापूर चा असल्याकारणाने साखरपुड्याला नक्की या असे बजावून सांगितले होते.आणि मी पण गेलो होतो.अर्थात साखरपुड्याला पुणे सोडून जाणे, एवढा उत्साह माझ्यात नाही.पण ऑफिस ला सुट्टी आणि तेवढंच फिरण्याचा आनंद या दोन सोयीस्कर गोष्टीनमुळे मी पण जाणार होतो.

आता आम्ही सकाळी ८.३० वाजता गाडीत बसलो आणि ११ .३० वाजता कराड ला पोहोचलो.मजा बघा..तिथे गेल्यावर मित्राला  पुन्हा पत्ता विचारला कि बाबा रे  आम्ही इथे आलोय पुढे कसे जायचे...यावर तो म्हणाला कि कराड पासून थोडे पुढे म्हणजे साधारण ४० km अंतरावर तासगाव नावाचा तालुका आहे तिथे या....आम्ही मुकाट तिथे गेलो...गाडीचा पत्रा आणि डांबर या दोन्ही गोष्टी सहज वितळतील असे छान उन पडले होते...निसर्ग म्हणल्यावर जे डोळ्यासमोर येते अशी कोणतीही गोष्ट खिडकीतून दिसत नव्हती.सुमारे तासाभरानंतर आम्ही तिथे पोहोचलो.मग पुन्हा तिथून त्याला फोन केला तर तो म्हणाला कि आता तासगाव पासून अजून १० km अंतरावर शिरगाव नावाचे एक गाव आहे तिथे या आणि फोन करा...आमच्याकडे आता पर्याय नव्हता ..आम्ही तिथे गेलो आणि फोन केला...दुपारचा १ वाजून गेला होता  कुठून इथे आलो मरायला असे वाटण्याइतपत  कंटाळा आला होता...मित्राला फोन केला कि आम्ही आलोय आता कुठे ? तर तो म्हणाला कि ******* हे नाव विचार त्यांच्या घरासमोरच  मांडव  आहे.
         आता घरासमोर मांडव हि कल्पना पटायलाच माझा थोडा वेळ गेला.कारण याआधी अशा ठिकाणी जायची वेळच आली नव्हती.जिथपर्यंत गाडी जाईल तिथपर्यंत गाडी नेली.आणि केवळ आमचे भाग्य कि मांडव दिसू शकेल अशा ठिकाणापर्यंत आम्ही पोहोचू शकलो...


आम्ही गाडीतून उतरलो आणि थेट मांडवात गेलो...दुपारचे १.३० वाजून गेले होते..भुकेने आपल्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या...साखरपुडा म्हणल्यावर जे पदार्थ डोळ्यासमोर येतात त्यातील एकही पदार्थ असू शकेल याची शक्यता देखील नव्हती.आम्ही मांडवा पाठीमागे असलेल्या हपाश्यावर हात,पाय,तोंड धुतले..पाण्याची चव या विचायावर लोकांनी आपापली मत मांडली.काहींनी एका शिवीमध्ये विषय हाताबाहेर काढला.नंतर शेजारी असलेल्या पिंपळाच्या पारावर येऊन बसलो आमच्या बरोबरीने गावातील काही वृद्ध मंडळी गप्पा मारत बसले होते...काही जण केवळ जेवणाच्या वेळेची वाट पहात पहुडले होते.मांडवातील दृश्य अतिशय स्पष्ट दिसत होते.विधी जिथे चालू होते त्या चौथर्यावर जितकी लोक होती तितकीच लोक चौथर्याच्या खाली होती.मोजून  ११ खुर्च्या समोर टाकल्या होत्या त्यातल्या ९ रिकाम्या होत्या..एकावर कुत्रे बसले होते...जे नंतर एका आजोबांनी  हटकल्यामुळे पळून गेले....

        कुठेही गोंधळ नव्हता...शांतपणे सगळे चालू होते...रिंग exchange ज्याला आम्ही म्हणतो तो विधी कधी झाला हे सांगण्या इतपत लक्षात नाही...पण मित्रांनी हात वर करून रिंग दाखवली खरी.मांडवाला लागुनच मुलीचे घर असावे.कारण २/३ ठराविक बायका घरातून मांडवाकडे आणि मांडवातून घराकडे अक्षरशः पळत होत्या .विधी झाल्यावर पेढ्याला लागलेल्या मुंग्या पेढ्याला धक्का लागल्यावर जश्या पसरतात त्याप्रमाणे चौथार्यावरची गर्दी पांगली...काही लोक थेट घरी गेले...आता थेट म्हणण्यात मजा नाही कारण ४ पावलांवर घरे होती.त्यानंतर जेवणाची वेळ आली..अर्थात आम्ही पोहोचलो ती सुद्धा जेवणाचीच वेळ होती..पण आता जेवण पण होते.पहिली पंगत बसली जी तब्बल २२ लोकांची .मगाशी पहुडलेले आजोबा, काका सगळे पंगतीत होते...त्यांचे जेवण चालू असताना आम्ही एका tractor वर बसून फोटो काढत होतो.

त्यानंतर आमची जेवायची वेळ आली...आम्ही जाऊन बसलो पत्रावळ्या ठेवल्या द्रोण ठेवले...पाणी मिळाले...भात वाढला आणि शिरा वाढला....दोन्ही पदार्थ अतिशय अप्रतिम झाले होते आणि त्यात भूक आ वासून उभी होती भात आणि शिरा संपला आता मी पोळी or पुरी ची वाट पहात बसलो ...पण असे समजले कि तसलं काही नाहीये.... आता साखरपुड्याच्या जेवणात पोळी किव्वा पुरी नाही हि गोष्ट माझ्यासाठी पहिल्यांदाच होती...आणि याच गोष्टीचा विचार मी हात धुवत असताना करत होतो....आणि मग सहजच विचार डोक्यात आला कि जर पोळी आणि पुरी नाहीये तर बटाट्याची भाजी फक्त भाताबरोबर खायची होती ?...तरी देखील पोटभर जेवलो...

एव्हाना उन कमी झाले होते गार वर सुटला होता...आम्ही जेवून पुन्हा पारावर येऊन बसलो.मधल्या वेळेत मित्र आणि त्याची बायको घरात जाऊन जेवून आले...पुढच्या अर्ध्या तासात सर्वांची जेवणं झाली...


३ वाजले होते. निघायची वेळ झाली होती...तेवढ्यात मित्र म्हणाला कि अरे सगळे स्टेजवर या..आम्ही मुकाट स्टेजवर जाऊन उभे राहिलो...मुलाकडले पाहुणे या नात्याने मुलीकडच्यांनी आम्हाला नारळ टॉवेल आणि टोपी दिली...आता पांढरी टोपी स्टेजवर घालून घ्यायची माझी पहिलीच वेळ.आणि हे सर्व झाल्यावर त्या काकांनी ताकीद दिली कि टोपी अज्जिबात काढायची नाही.मग तसाच स्टेज वरून उतरून आम्ही निघालो.जीन्स घातलेले बहुदा आम्हीच ४/५ जण असू.उगीचच कोणीतरी वेगळे आहोत असे पदोपदी वाटत होते.

           त्यानंतर आम्ही मित्राचे अभिनंदन करायला पुन्हा स्टेजवर गेलो.फक्त दोघेच होते .मित्राला अभिनंदन केले आणि त्याच्या बायकोला पण.कुठेही बडेजाव नव्हता,घाई नव्हती.बारीक आवाजात सनई चालू होती काही लोक मांडव स्वछ करत होते.एका कोपर्यात ओट्या भरणे चालू होते.नवरा बायको घरात hall  मध्ये बसले होते.गावकरी आपापल्या घरी निघाले होते.आणि आम्ही विदुशकासारखे मांडवातून फिरत होतो.एकूण मिळून ६०  लोक पण नसतील...निघायची वेळ आली ...३.३०  वाजले होते.मित्राचा निरोप घेऊन आणि एकूणच गावाचा निरोप घेऊन आम्ही पुण्याला परत निघालो...प्रवासातले सगळे सोपस्कार पार पाडून साधारण ७.००  ला मी घरी पोहोचलो..

         घरी पोहोचतानाच मोबाईल वाजला...आणि unknown नंबर पाहून उगीचच कपाळावर आठ्या आल्या...नाखुशीने फोन उचलला...आणि २ मिनिटानंतर समजले कि  समोरून बोलणारी व्यक्ती इयत्ता ७ वी मध्ये बेंचवर माझ्या शेजारी बसत असे...सध्या अमेरिकेत रहात असून साखरपुड्याकरिता  पुण्यात आलेली आहे आणि आजच त्याचा साखरपुडा आहे आणि मला तिथे जायचे आहे....ज्या दिवशी साखरपुडा त्याच दिवशी पाउण तास आधीचे ते आमंत्रण घेऊन मी अंघोळीच्या तयारीला सुरुवात केली...सकाळचा साखरपुडा संपतो न संपतो तोच समोरचा दत्त म्हणून समोर होता...

        पटापट आवरून बाहेर पडलो...स्थळ होते श्रुती मंगल कार्यालय..आपटे रोड..
आता आपटे रोड म्हणल्यावर साहजिकच वेशभूषा करण्यात थोडा जास्त  वेळ गेला...सकाळी समोरील व्यक्ती कशी दिसत असेल याची काळजी होती...आणि आता आपण कसे दिसत असू याची…..सौंदर्याचे गणित जमवून घाईतच बाहेर पडलो..
१५ मिनिटात कार्यालयात आलो...पहिल्या मजल्यावर कार्यक्रम आहे असे सुचविणारी मोठी इलेक्ट्रोनिक आणि साधी अशा दोन्ही पाट्या खाली लटकविलेल्या होत्या...जाताना जिन्यात असलेल्या आरशात पाहून उगीच formality पूर्ण केल्या.आणि hall मध्ये पोहोचलो...perfume चा घमघमाट पसरला होता....
समोर स्टेजवर विधी चालू होते...पत्रकार परिषदेत पत्रकार ज्या प्रमाणे कॅमेरे धरून उभे असतात त्या प्रमाणे लोकांची photography चालू होती...काही लोक सरळ लावलेल्या खुर्च्या सोयीस्कर फिरवून त्यावर बसून जेवण सुरु होण्याचा वेळेपर्यंत गप्पा मारून टाइमपास करत होते. मुलाची आई आणि नवरी मुलगी यांच्या makeup मधील चढाओढ चेहेर्यावर स्पष्ट दिसत होती...

       सनई लावली होती पण ती का लावली आहे याचे उत्तर शोधण्याचा मी प्रयत्न केला नाही...
मी आणि माझे दोन मित्र मागे बसून गप्पा मारत होतो...मध्ये एकदा उत्सवमूर्ती ला हात केला...hall मध्ये 'मला बघा' या अविर्भावात फिरणाऱ्या मुलींकडे पाहण्यात आमचा वेळ चमच्यावर ठेवलेली maggie जशी हळुवार घसरते त्या प्रमाणे अलगद जात होता.

     काही वेळानंतर 'Ring Exchange ' चा कार्यक्रम चालू झाला...दोघांनी आपापल्या ring एकमेकांना घातल्या...Congratulations चा केक कापला...लोकांनी टाळ्या वाजवल्या मोठा फुगा फुटला त्यातली चमकी नवरा बायको सोडून सगळ्यांवर व्यवस्थित पडली..पेढा भरवणे या प्रकारात नको नको म्हणताना मुलीने ५/६ पेढे सहज  रिचवले….
ज्या साठी त्यांनी मला बोलावले तो कार्यक्रम तर झाला...आता ज्या साठी आम्ही गेलो तो कार्यक्रम सुरु झाला होता...

        खाणे संपेल कि काय या भीतीने लोकांनी बुफेपाशी गर्दी केली...त्यात आम्ही पण होतोच अर्थात...मीठ आणि लिंबू धरून बरोब्बर १७ प्रकार जेवायला होते...जेवताना मधेच जावून घेणार्यानमुळे नवीन डिश घेणाऱ्यांच्या कपाळावरील अठ्यांची संख्या सुरळीच्या वडीच्या थरानपेक्षा जास्त होती.

       जेवण झाल्यावर हात धुण्यासाठी washroom मध्ये गेलो...लोकांनी हात धुतल्यावर पुन्हा एकदा आरश्यासमोर उभे राहून चेहेर्याची रंगरंगोटी सुरु केली  होती.
...' कृपया पेपर Napkins येथे टाकू नका' यातील 'कृपया' आणि 'टाकू' या दोन शब्दांवर आधीपासूनच कागद पडलेले होते.
      बाहेर आलो बडीशेप ठेवलेली होती...लहान मुलं बडीशेप मधील खडीसाखर वेचून खात होते.
एव्हाना जवळचे मित्र आणि अगदी जवळचे नातेवाईक एवढेच फक्त hall मध्ये शिल्लक होते.बाकीच्यांचा साखरपुडा केव्हाच संपला होता.आम्ही देखील निघायचे म्हणून मित्राला भेटायला गेलो.अभिनंदन केले स्टेजवर व्हिडीओ कॅमेर्यासमोर खोटे हसलो.’पुन्हा भेटू नक्की’ या विरत्या आश्वासनाने हसत त्याचा निरोप घेतला...
जवळचे नातलग आणि मित्रमैत्रिणी या मध्ये त्यातल्या त्यात उठून दिसणारे चेहरे उगीचच  मागे वळून टिपत आम्ही जिन्यापाशी आलो.मगाशी दारावर लावलेल्या तोरणा मधील फुलाच्या पाकळ्या खाली पडल्या होत्या...मगाशी भरलेला hall आता रिकामा होता.बाहेर काढलेली रांगोळी व्यवस्थित हलली होती आणि hall मधील खुर्च्यांची एक नवीनच रांगोळी तयार झाली होती.

आम्ही मात्र मस्त जेवण चेपून घराकडे परतलो……

         असे खूप कमी दिवस येतात ज्या दिवशी गादीला पाठ लागल्यावर संबंध दिवस आठवावासा वाटतो किंबहुना तो दिवस आपोआपच डोळ्यासमोरून जातो..

       एकाच दिवसातील सूर्योदय आणि सूर्यास्त असे एकाच नाण्याच्या दोन बाजू दाखवतील असे ध्यानी मनी पण नव्हते.पण एकाच प्रकारच्या दोन समारंभात इतके  भिन्न अनुभव येतील याचा आनंद मला दुसर्यादिवशी मित्रांना सांगताना लपवता आला नाही.अर्थात लिहिण्यामागे कुठेही तुलना करायची मुळीच इच्छा नाहीये.पण ज्या प्रकारे गोष्टी घडतात तश्याच इथे उतरवल्या आहेत.कुठला समारंभ चांगला वाटला असे विचारले तर माझ्याकडे ठाम मत नाही.कारण दोन्ही ठिकाणच्या मजा वेगळ्या आहेत.

       फक्त फरक इतकाच कि विकायची असते काचच...पण काही लोक
थर्मोकोल मध्ये ठेऊन विकतात तर काही लोक गवताच्या भाऱ्या मध्ये गुंडाळून.....

खरच.....अनुभव घेताना choice नसलेलाच बरा असतो.....


                                                                                                                                                                                                                                                            - हृषीकेश पांडकर
                                                                                                                                                                                                                                                             २१ नोव्हेंबर २०११