Thursday, April 29, 2021

माझ्या डायरीचे पान...

 कालच्या पावसात गारांच्या तडाख्यात निखळलेले माझ्या डायरीचे पान...

----

मोदी,शहा,महाविकास,डावे,उजवे,राजकारण,समाजकारण,अर्थकारण आणि मीडिया यांच्या पालिकडला करोना..

सध्या सकाळ होते ती झोप पूर्ण झाल्यामुळे कारण उठून घाईने करण्याची काम सद्ध्या थंड झालीयेत. ग्राउंडला चालायला,व्यायामाला किव्वा टाळ्या देऊन नुसत्याच गप्पा मारणाऱ्यांची वर्दळ नसते ना. डबा, दात घासणे आणि चहा झाल्यावर घरून ऑफिसचे काम याखेरीज दिवसातले काही शिल्लक नसते.

पेपर वाचायचा छंद चिंटू आणि शेवटचे खेळाचे पान इतकाच मर्यादित होता. सचिन रिटायर्ड आणि चिंटू मोबाईल वर आल्यावर रद्दी विकणे यापलीकडे पेपर हाताला लागला नाही. त्यामुळे चहा घेत घेत छान पेपर वाचणे वगरे शौक कधीच नव्हते.

दिवसभरात फेसबुक,इन्स्टाग्रामवर, ट्विटर, व्हाट्सएप आणि इथून तिथून येणाऱ्या करोनाच्या बातम्या हे समांतर आयुष्यासारखं चालू आहे. कदाचित करोना हा विषय अजूनच अंगावर यायचं कारण म्हणजे या बेंबीच्या देठापासून ओरडत सुरू असलेल्या, बऱ्याच वेळा असंबद्ध आणि सतत नकारात्मक गोष्टी वाजवून सांगणाऱ्या बातम्या. एखादी गोष्ट माहीत होण्यापेक्षा मनस्ताप व्हायची शक्यता अधिक..असो हे पाहणं टाळतोय..तुम्ही सुद्धा प्रयत्न करा.

प्लास्मा, रक्तदान, ऑक्सिजन, बेड ची व्यवस्था, रिपोर्ट, आर टी पी सी आर, आयसोलेशन, मास्क, सॅनिटायझर, वॅक्सिन, डोस यापैकी एखादा शब्द स्क्रीन वर सहज वावरतोय. लोकांच्या जुन्या सहलींचे फोटो 'टेक मी देअर', सी यु सून' या ओळी पांघरून पुन्हा पुन्हा येतायत. घरपोच डबे, घरपोच भाज्या, घरपोच औषधे सेवेला तत्पर आहेत. कोणी स्वच्छ मनाने आणि काळजीपोटी सेवा देतंय काही तिथंही खिसा भरत आहेत.

केंद्राचं चुकलं, राज्याचं चुकलं, कोणी कसं लुटलं, कोणाचं कसं पटलं, कोण कसं सुटलं, कोणाचं बिंग फुटलं, सरकारने असंच का रेटलं याचे हिशोब जमवता जमवता सामान्य मतदारांच्या माथ्यावरच आभाळ तेवढं फाटलं.

गेल्या वर्षी रुग्णांच्या बातम्या लांबून यायच्या आज जवळचेच रुग्ण होतायत. प्रश्न जवळ लांबच्यांचा नव्हताच कधी पण विस्तव जवळ आल्याखेरीज त्याची धग जाणवत नाही हा त्यातला भाग. आता आपलेच होरपळत आहेत त्यांच्यावर पाणी टाकावं की बाकीची आग विझवावी.

कुंभमेळा कशासाठी, निवडणूका का, लॉकडाउन हवा की नको यावर चाललेल्या चर्चा आता बेड कुठे उपलब्ध आहेत, औषध कुठे मिळतील,लस कधी कुठे कशी मिळेल, जेवणाचा डबा तेवढा कसा पोहोचेल आणि मित्र,नातलग आणि आप्तेष्टांच्या तब्येतीच्या काळजीत बदलल्या. जवळचा गेल्याची हुरहूर आणि स्वतःच्या जीवाची काळजी अशा दुहेरी कात्रीत दिवस सरतोय इतकं नक्की.

काही पोष्टि सामुदायिक अंत्यविधी दाखवतात, काही पोष्टि ऑक्सिजनविना आणि औषधावीना हवालदील रुग्ण आणि त्याचे सोबती दाखवतात. काही पोष्टि हिम्मत ठेऊन लढायला सांगत आहेत. हेही दिवस जातील याची खात्री देतायत. काही पोष्टि आपल्यातील कलाकार व्यक्त करतायेत.काही पोष्टि लोकांनी कशी आणि किती मदत केली याचे आकडे फिरवत आहेत. काही पोष्टि प्रामाणिकपणे किती रुग्ण वाढले किती बरे झाले याचे धावते समालोचन करीत आहेत. यातच सुरू झाला लसीचा खेळ. वयाची बंधन लावून लसीकरण सुरू झाले. पहिला डोस दुसरा डोस, त्यातलं अंतर , त्याचा परिणाम याचा पण उहापोह वाचायला मिळतोय. ऍलोपॅथी, आयुर्वेदिक की होमिओपॅथी याचा जो तो आपापल्या परीनं समजवायचा प्रयत्न करतोय. आमचंच कसं चांगलं यापेक्षा उपयुक्त कोणतं आणि कसं हेही सांगणाऱ्या पोष्टि वाचल्या की हुरूप येतोय.

माझ्यातला सामान्य माणूस भीती,काळजी,राग,जबादारी,हतबलता,उसन अवसान, निःश्वास, आशा आणि विश्वास या भावना ओळीने गिरवत दिवस उलटतोय.

सुखाच्या व्याख्या जशा सारख्या नसतात तशाच व्यथा देखील एकाच तराजूत तोलता येत नाहीत. विस्कटलेली घडी कधी सरळ बसेल याचे उत्तर मात्र कोणाकडेच नाही.

दिवस असाच सरून जातो. असेही काही सल्ले येतात या करोनाच्या बातम्या किव्वा पोष्टि वाचू नका म्हणतात. व्यायाम करा, आहार नीट ठेवा आनंदी रहा वगरे वगरे.

आपली काळजी आणि पर्यायाने सर्वांची काळजी या खेरीज आता फारसं काही शिल्लक नाहीये आपल्याकडे. गेलेल्या व्यक्तीला शेवटचं पहायची सोय शिल्लक नाहीये. राजकारण, आरोप, प्रत्यारोप, दिखाऊ काम आणि जनहितापेक्षा वैयक्तिक तिजोऱ्या भरण्याकडे कदाचित खुर्चीधारी मन लावून प्रयत्न करतील. संबंध भारत देश यापेक्षा देखील आखून दिलेल्या राज्याच्या सीमा मदतीला वेसण घालतील पण आपला धीर सुटता कामा नये.

या सगळ्या चढ उतारात दिवस कसा मावळतो कळत नाही. शनिवार रविवार आणि इतर दिवस यामध्ये नावापेक्षा जास्त असा काही फरक जाणवत नाही. इच्छाशक्ती आणि मन मात्र नक्की सांगतं उसळलेली लाट नक्की शमेल. सय्यमची आणि धीराची कसोटीच की ही.काही परीक्षा अवघड असतात पण पास होण्याला पर्याय नसतो. त्यातलाच हा भाग.

काहीशी स्वयंशिस्त, पुरेशी खबरदारी,काळजी आणि बेफिकीर,फाजीलआत्मविश्वासाला आळा या गोष्टी आचरणात आणल्या तर कदाचित यंदाच्या दिवाळीची खरेदी जोरात होईल. प्रत्यक्ष फराळाला जायचा योग येईल. बाप्पा वाजत गाजत येईल. सगळं तसंच अलबेल असेल जसं आधी होतं. कदाचित तेव्हा जरा जाण आली असेल आपल्याला...सर्वात चाणाक्ष म्हणून मिरवत असलेली मनुष्यप्राणी ही जमात प्रत्यक्षात मात्र किती असुरक्षित, हतबल आणि केविलवाणी आहे..नाही का ?

माझा दिवस असाच संपतो..निजतो ..

हृषिकेश पांडकर

२९.०४.२०२१

 

Sunday, April 25, 2021

इंडियन ग्रेट हॉर्नबिल

 खळखळ वाहणारे आणि रसायने किव्वा जलपर्णी नसलेले स्वच्छ पाणी ही आदर्श नदीची ओळख किव्वा सूचक आहेत. एखाद्या गोष्टीची पारख करण्याची प्रमाणे ठरलेली असतात. प्रत्येक गोष्टीची पडताळणी करण्याचा एक स्वतंत्र लिटमस पेपर असतो ज्यावरून त्या गोष्टीची प्रत ठरवली जाते.


 

वरील गोष्ट सांगण्याचा अट्टाहास या करिता की जशी शहराची,नदीची,वस्तूची किव्वा अगदी एखाद्या व्यक्तीची गुणवत्ता ठरविण्यासाठी काही निकष असतात, त्याच प्रमाणे एखाद्या जंगलाची गुणवत्ता ठरविण्यासाठी तेथे असलेले जैव घटक पडताळले जातात. अशा जैव घटकांना 'इंडिकेटर स्पेसिस' असे म्हटले जाते. याच इंडिकेटर स्पेसिस मध्ये वरील फोटोतील इंडियन ग्रेट हॉर्नबिल हा सकारात्मक निकष समजला जातो.

ज्या जंगलात ही प्रजाती सापडते ते जंगल सर्वदृष्ट्या संपन्न आणि श्रीमंत जंगल समजले जाते. अर्थात याला तशी शास्त्रीय कारणे देखील आहेतच. या पक्षाचे राहणीमान, त्याला लागणारा निवारा, अन्न पुरवठ्याच्या सोयी या गोष्टी पुरवू शकणारे जंगल असल्याने तो पक्षी तिथे टिकाव धरू शकतो.

चोचीचे तीन टप्पे, पंखांचा रंगीत आणि मोठा घेर, उडताना येणारा पंखांचा खणखणीत आवाज आणि मुख्य म्हणजे खूप कमी पक्षांना असलेल्या पापण्या ही या पक्षाची ठळक वैशिष्ट्य. या पक्षाला पापण्या असतात हे यंदाच्या जंगल भेटीत समजले. हा पक्षी लांबून उडत येत असेल तर सुमारे पाउण किलोमीटर पासूनच याच्या पंखांचा आवाज येण्यास सुरुवात होते अशी नोंद आहे आणि आता अनुभव देखील. धगधगत्या वाफेच्या इंजिनाचा आवाज आणि या धनेशच्या पंखांचा आवाज यात कमालीचे साम्य जाणवते.

मुख्यत्वे फळं, छोटे किडे,सरपटणारे जीव आणि काही अंशी छोटे सस्तन प्राणी हे याचे खाद्य. फोटोत पाहिले असता चोचीत पकडलेला साप या खाद्य यादीची ग्वाही देतो.

उडताना देखील पक्षी किती सुंदर दिसू शकतो हे या पक्षाला पाहताना समजते. या पक्षाचे विविध उप-प्रकार असल्याने हॉर्नबिल म्हटल्यावर लांब आणि बाकदार चोच हीच याची प्राथमिक ओळख. मात्र पंखांचा रंग,चोचीची ठेवण आणि एकूण आकार या गोष्टी याला महत्वाची ओळख देतात.

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी अर्थात BNHS चा नावाचा अविभाज्य घटक. त्यांच्या लोगोवर असलेला लक्ष वेधणारा पक्षी तो हाच. केरळ आणि अरुणाचल प्रदेश या दोन्ही राज्यांचा राज्यपक्षी म्हणून मान मिळविलेला हा पक्षी. ही दोनही राज्य अशी आहेत ज्यामधील जंगलं प्रचंड समृद्ध आहेत. निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या दोन्ही राज्यांचा राज्यपक्षी होण्याचा मान या धनेशचा.

दक्षिणेकडील संपन्न जंगले आणि उत्तर तसेच उत्तर पूर्वेकडील घनदाट आणि तितक्याच सुंदर जंगलात याचे दर्शन होते.

वरील फोटो मानस अभयारण्यात घेतलेला आहे. महाराष्ट्रात राहणारे आपण अर्थातच याला पाहण्याचा जवळचा मार्ग निवडणार. याला पाहण्यासाठी आपल्या जवळ असलेला भाग म्हणजे अरबी समुद्र किनाऱ्या लगत पसरलेला संपूर्ण पश्चिम घाट.

शहरातील मध्यवर्ती वस्तीत देखील सहज दिसणारा राखी धनेश (ग्रे हॉर्नबिल) तुम्ही अनेकवेळा पहिला असेल पण याच्याच जातकुळीतील पण प्रचंड सुंदर आणि भव्य असणारा हा ग्रेट हॉर्नबिल नक्की बघा. हा दिसायला जितका आकर्षक आहे तेवढाच उडताना येणार पंखांचा आवाज आपल्याला भुरळ घालत राहतो यात शंका नाही.

Indian Great Hornbill - Bird having a big yellow beak with a casque and striking tail feathers.

हृषिकेश पांडकर

२५.०४.२०२१

Manas National Park | India | March '21

 

Wednesday, April 14, 2021

क्या है लॉकडाऊन..

 क्या है लॉकडाऊन..

कडक संचार बंदी मै 'जीवनावश्यक सर्व सेवा अखंडित चालू राहतील' ये केहना है लॉकडाऊन..

बिना घर से बाहर निकले 'होटल से टेक-अवे' लेना है लॉकडाऊन..

कुछ भी हो घर से बाहर नही आना है फिर भी 'सार्वजनिक वाहतूक सुरळीत राहणार आहे' ये केहना है लॉकडाऊन..

कडे निर्बंध जारी करने के बाद 'सगळं सुरू राहील' ये बोलना है लॉकडाऊन..

एक बंदा जरुरी काम पे निकले तो उसका पिछवाडा लाल करना लेकीन पार्टी की रैली या मंत्री के भाषन पर सैकडो लोक साथ भी आये तो कोई चिंता न होना वो है लॉकडाऊन..

लॉकडाऊन मै क्या कर सकते है और क्या नही ये सिर्फ समझ लेना ये भी है लॉकडाऊन..

तासभर दळण दळून झाल्यावर 'याला लॉकडाऊन समजू नये' ये बोलना है लॉकडाऊन..

इस लॉकडाऊन का पालन करना मेरा वचन है..और...

मेरा वचन ही है मेरा... तुम्हाला माहितीये 

- १४.०४.२०२१