Friday, March 27, 2020

lockdown

 

आज मला कळले भारताची रत्न आणि भारतरत्न यात कमालीची तफावत असते..

कला, क्रीडा, संगीत, सिनेमा,नाटक आणि राजकारण यांच्यावरही कोणी तरी नक्की असते..

आज मला कळले की बाईनी 'गपचूप वर्गात बसायचे' सांगितल्यावर वर्गात बसणारी फक्त लहान मुलचं नाहीयेत..

'कल से आगे के इक्कीस दिन के लिये कोई घर से बाहर नही निकलेगा' असं पंतप्रधानांनी सांगितल्यावर संबंध देशवासीय सुद्धा घरीच बसलेत..

आज मला कळले की ट्रिप,पार्टी,हॅन्ग-आउट,नाईट-आऊट याविना काहीच घंटा अडत नसते..

जुने फोटो,फोन वर गप्पा,जोपासलेले छंद आणि घरचे जेवण या गोष्टींचे आचरण त्याहीपेक्षा जास्त समर्थ असते..

आज मला कळले पोटाच्या खळगी समोर जिभेचा चोचला अधिक उथळ असतो..

चार गुलाबजामांपुढे चार पोळ्यांचा पगडा हातभार खाली असतो..

आज मला कळले क्रोसीन,डिस्प्रिन,कॉम्बीफ्लाम आणि पॅरासिटामोल हे निव्वळ भ्रम असतात..

गरम पाणी,हळद-दूध,मिठाचे पाणी,ओवा,गूळ आणि साधी वामकुक्षी या गोष्टी देखील सहज किल्ला लढवतात..

आज मला कळले अर्जंट पोहोच,अर्जंट भेटू,अर्जंट पाहिजे,अर्जंट निघा यात अर्जंट असं काहीच नसत..

तुम्हाला उशीर झाला,तुम्ही नाही गेला म्हणून कोणीच,काहीच आणि कधीच थांबत नसत..

आज मला कळले की गॅलरी मधून दिसणारी गाड्यांची वर्दळ,माणसांची ये-जा,फेरीवाले,स्टॅन्ड वरच्या रिक्षा आणि कट्यावरची आजोबा मंडळी यांच्या पलीकडे सुद्धा काही दृश्य लपलेली असतात..

हळूच तरंगत येऊन रिकाम्या रस्त्यावर घरंगणारी झाडाची पानं,आपल्या घरट्यासाठी अविरत काड्या गोळा करणारे पक्षी आणि सूर्याच्या प्रवासानुसार जागा बदलणाऱ्या झाडांच्या सावल्या या गोष्टी काचेवरची धूळ झटकून स्वच्छ दिसाव्या अशा नजरेला येतात..

आज मला कळले की इमारत बांधणारा कामगार वर्ग निव्वळ मुंडासं बांधून विटा वाहणे आणि सिमेंट वाळू एकत्र करून भिंती लिंपत नसतो..

बिडीचे झुरके घेत क्रिकेट खेळणे आणि तान्ह्या बाळाला प्रेमाने न्हाऊ घालणे हा पण त्यांचा विरंगुळा असतो..

आज मला कळले व्हेंटिलेटर,बायोप्सी,ECG,डायलेसिस,स्कॅन,टेस्ट,एक्सरे,MRI यांचा वापर हा तर उपचाराचा दुय्यम मार्ग असतो..

'गप गुमान मुकाट्याने घरात बसणे' याच उपायाने शेवटी गुण येणार असतो..

आज मला कळले गुळगुळीत फरशांचे मॉल,थंडगार AC मध्ये मांडलेल्या हिरव्यागार भाज्या आणि पॉपकॉर्न घेऊन रिक्लायनर वर पडून भव्य पडद्यावर पाहिलेले सिनेमे हे जीवनाचे अविभाज्य घटक कधीच नसतात..

खालचा किराणावाला,शेजारचा चार टोपल्यांचा भाजीवाला आणि घरचा ३८ इंची पडदा यासाठी कायमच सक्षम असतात..

आज मला कळले की निर्विकार चेहरा,अरसिक व्यक्तिमत्व,अबोल स्वभाव यांच्यामागे देखील अविश्वसनीय प्रतिभा दडलेली असते..

एरवी केवळ नावाला असलेली आणि दखलाही न घेतलेली जाणारी मंडळी सुप्त कलेने आणि लपलेल्या गुणांनी अचंबित करत असते..

आज मला कळले की प्रत्येक वेळी देशासाठी लढणे म्हणजे सीमेवर जाऊन बंदूक हातात घेणे नसते ..

घरात बसून स्वतःची आणि पर्यायाने सर्वांची काळजी घेणे देखील देशसेवेपेक्षा तसूभरही कमी नसते..

आज मला कळले की जिंकलेला सामना,जिंकलेली लढाई,एखादा सण किव्वा तत्सम गोष्टीच फक्त देशाला एकत्र आणत नसतात..

शिंकल्यावर सुद्धा पसरणारा आणि डोळ्याला सुद्धा न दिसणारा सूक्ष्म जीव देखील या १०० करोड लोकांना लढण्याचे सामर्थ्य आणि एकी देऊन जात असतात..

आज मला कळले की कमळ,पंजा,घड्याळ,हत्ती आणि इंजिन यांच्यातली लढाई हि शेवटी लुटुपुटुचीच ठरते..

जेव्हा देशावरचेच आभाळ फाटायला सुरुवात होते तेव्हा झेंडयावर अशोकचक्रच लावावे लागते...

आज मला कळले की देशाच्या लोकशाहीचा गाडा वाहणारे चार स्तंभ म्हणजे न्यायपालिका,अधिकारी वर्ग,प्रशासन आणि प्रसार माध्यमे हे जरी असले तरी..

खऱ्या अर्थाने आणि अविरतपणे देश जिवंत ठेवणाऱ्या चार स्तंभांनी म्हणजे वैद्यकीय अधिकारी,स्वच्छता अधिकारी,सरकारी अधिकारी आणि सर्व गोष्टींच्या अंमलबजावणीवर डोळ्यात तेल घालून निगराणी ठेवणारे पोलीस आणि लष्करी अधिकाऱ्यांनी खऱ्या अर्थाने आज देश पेलतो..

#lockdown #fightagainstcorona

हृषिकेश पांडकर

२७.०३.२०२०