Friday, May 18, 2018

एक भोजन समारंभ

 निसर्गाचे चक्र किती अजब आहे ना ? एक जण आपली तहान भागवतोय आणि एक जण आपला जठराग्नी विझवायला उभा आहे.आपण पाणी पिऊन तृप्त झाल्यावर दुसऱ्याचा घास बनणार आहोत हे कदाचित त्याच्या ध्यानी मनी देखील नसावे.एखाद्याला पोटभर पाणी पिण्यास वेळ द्यावा आणि ते झाल्यावर त्याचाच जीव घ्यावा इतके निर्दयी हे निसर्गचक्र खरंच आहे का ?


 

नक्कीच नाही,कारण हीच तर अन्नसाखळीची मजा आहे.आज जर हे रानडुक्कर इथून निसटले तर त्या जंगली कुत्र्यांच्या पोटावर पाय येईल.त्यामुळे आपापल्या पद्धतीने या साखळीतील कड्यांची भूमिका बजावणारे हे जीव दुपारच्या टळटळीत उन्हात पाहणे हा आनंददायी नाही पण कुतूहल जागवणारा अनुभव होता.

नेहमीच समूहाने हल्ला करणारी हि जंगली कुत्री कधी आपल्या भोवती येऊन ठेपली याचा थांगपत्ता देखील त्या रानडुकराला लागला नाही.एक,दोन नाही तर तब्बल ११ कुत्र्यांनी त्याला घेराव दिला होता.जिप्सीच्या आडव्या दांडयावर गुडघा रोवून शक्य तितकी उंची गाठून मी तो उलगडत जाणारा भोजन समारंभ न्याहाळत होतो.

व्याघ्र प्रकल्पात वाघा व्यतिरिक्तही अनेक अशा गोष्टी घडतात आणि पहायला मिळतात कि वाघ मिळाला नाही याची सल कुठल्याकुठे विरून जाते.नाव जरी 'टायगर रिसर्व' असले तरी बाकीचे प्राणीही तितक्याच गुण्यागोविन्दाने नांदत असतात या पुनःप्रत्यय आला.

नागझिरा अभयारण्यातील अशाच एका दुपारी टिपलेला हा प्रसंग.

हृषिकेश पांडकर

 

No comments:

Post a Comment