Monday, February 5, 2018

'सूर्य' वाहून नेणारा रथ - कोणार्कचे 'सूर्यमंदिर'



दोन जंगलांच्या भेटीमध्ये मिळालेली उसंत सत्कारणी लावण्याच्या हेतूने आणि वाट वाकडी न करता नवीन गोष्टी पाहण्याची संधी मिळाल्याने पुन्हा एकदा या सुजलाम सुफलाम भूमीचे अंतरंग अनुभवायचा योग आला.भीतरकनिका हे जंगल पाहून झाल्यानंतर पुढली निसर्गभेट हि थेट 'चिलिका' सरोवरामध्ये होणार होती.पण या दरम्यान असलेल्या चोवीस तासांना योग्य न्याय देण्यासाठी वाटेत लागणारे 'कोणार्क' आणि त्याच्या बाजूला वसलेले 'पुरी' या दोन्ही ठिकाणांना दिलेली भेट अविस्मरणीय ठरली.

'भितरकनिका' साधारण १७५ किलोमीटर अंतरावर 'कोणार्क' हे ठिकाण आहे.'कोणार्क' चे सूर्यमंदिर हि इयत्ता पाचवीच्या सहामाही परीक्षेत भरलेली गाळालेली जागा सोडली तर त्यापलीकडे काहीच कल्पना नव्हती.पण प्राचीन भारतीय स्थापत्य कला पाहण्याची इतकी सहज मिळालेली संधी सोडण्यात कोणतेच शहाणपण नव्हते.आम्ही सकाळी भितरकनिका सोडले.दुपारी कोणार्कला पोहोचलो तेव्हा सूर्य माथ्यावरून पुढे सरकला होता.जिथे गाडी थांबली तिथेच जेवून घेतले.साधारण भारतातील कुठल्याही मंदिर बाहेर किव्वा प्रेक्षणीय स्थळाबाहेर मांडलेली दुतर्फा दुकाने आणि तेथे मिळणाऱ्या नेहमीच्या वस्तू यांची मांदियाळी होती.साधारण पाचशे मीटर अंतरावर कोणार्कचे सूर्यमंदिर उभे होते.मंदिराच्या पाठीमागे निळाशार समुद्र पसरला होता.जितकी लोक पाहायला आली होती साधारण तितकेच गाईड म्हणून वावरणारे लोक देखील पहायला मिळत होते.तो पाचशे मीटरचा रस्ता ओलांडून मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत पोहोचण्यात देखील एक मजा होती.

दुपारी दोन वाजता गरम भजी,आईसक्रीम,वाफाळता चहा किव्वा तिखट मीठ लावलेली थंडगार काकडी या सर्व ठिकाणी तितकीच गर्दी होती.आपल्या लोकांचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे.सूर्य मंदिर म्हणल्यावर डोळ्यासमोर येणाऱ्या रथाच्या चाकाच्या असंख्य प्रतिकृती विक्रीस होत्या.पण डोळ्यासमोर असलेले साक्षात सूर्यमंदिर सोडून दुकानांमध्ये घुटमळण्याचा मोह मी आवरला.आणि सूर्य देवतेला समर्पित असलेल्या आणि १३व्या  शतकात उभारलेल्या सूर्य मंदिराच्या मुख्य कमानीतून प्रवेश केला.

सूर्यमंदिर डोळ्यासमोर उभे होते.उजव्या बाजूला लावलेल्या माहिती फलकावरील माहिती वाचण्यात पहिली दहा मिनिटे घालवली.आणि मंदिर पाहण्यास सुरुवात केली.शंभर फुटी रथावर विराजमान झालेले सूर्यमंदिर पाहताक्षणी कळून येत नाही.मात्र एकेकाळी सुमारे दोनशे फुटाचे असलेले बांधकाम आता तितकेसे शिल्लक नाहीये.


 
डोक्यावर धारण केलेल्या काळ्या रंगाच्या मनोऱ्यामुळे 'काळा पॅगोडा' अशी ओळख असलेले सूर्यमंदिर स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना आहे.मंदिरा जवळ जाताच रथाच्या चाकावरील सुंदर कलाकुसर खिळवून ठेवते.रथाच्या समोरील बाजूस रथाला ओढणारे अश्व पाहायला मिळतात.गायत्री,ब्रिहती,उष्णीह,जगती,त्रिष्टुभ,अनुष्टुभ आणि पंक्ती या सात अश्वांनी ओढला जाणारा रथ इथून स्पष्ट दिसतो.रथाला बारा फुटी व्यासाची एकूण चोवीस चाके आहेत.प्रत्येक चाकावर असलेली कोरीव कलाकुसर हि थांबून पाहणे वेळेअभावी शक्य नव्हते पण जमेल तितके आणि जमेल त्या सर्व प्रतिमा डोळ्यात साठवून आम्ही प्रदक्षिणा पूर्ण करत होतो.

रथावर असलेल्या सूर्यमंदिराचे डागडुजीचे काम चालू आहे.त्यामुळे जागोजागी लोखंडी खांब आणि सुतळ्या पहायला मिळतात.मंदिराच्या आवारात इतर छोटी मंदिरे देखील पहायला मिळतात.मंदिराच्या आवारात दोन विहिरी देखील बांधलेल्या आहेत.याच बरोबर दक्षिणेला 'भोगमंडंप' अर्थात जेवायची जागा बांधलेली आहे.याखेरीज मायादेवी मंदिर आणि वैष्णव मंदिर या वास्तू फिरताना नजरेस पडतात.अर्थात या गोष्टी आत जाऊन पाहण्याइतपत वेळ नसल्याने फोटो काढून आम्ही पुढे निघालो.




मंदिराच्या मागील बाजूने मंदिर पाहताना जवळ जवळ संपूर्ण भाग डागडुजीत लपेटला गेलेला दिसतो.मात्र मंदिराचा वरील भागाचे काम चालू असल्याने खाली असलेल्या रथाचे व्यवस्थित निरीक्षण करता येते.आमची प्रदक्षिणा पूर्ण झाली आणि आम्ही पुन्हा रथासमोर येऊन ठेपलो.सूर्य म्हणल्यावर आपल्या डोळ्यासमोर येणारी प्रतिमा म्हणजे पूर्वेकडून उगवणारा गोळा जो दिवसभर पश्चिमेकडे धावत असतो.अगदी त्याचप्रमाणे हे सूर्यदेवतेचे रथरुपी मंदिर पूर्वेकडील बंगालच्या उपसागरातून वेगात बाहेर पडते आणि पश्चिमेकडे प्रयाण करते अशा आशयाचे दृश्य पहाटे सूर्योदयाला किव्वा सूर्यास्तासमयी पाहता येऊ शकते.कारण रथाच्या पाठीमागे अथांग उपसागर पसरलेला आहे.



शक्य तितके कॅमेऱ्यात टिपून आम्ही महाद्वार ओलांडून बाहेर आलो.दुपारचे तीन वाजून गेले होते.युनेस्को ने 'जागतिक वारसा' म्हणून मान्यता दिलेले भारतातील हे अजून एक ठिकाण.मंदिराचा बऱ्यापैकी भाग दुरुस्तीखाली आहे पण भव्यता आणि नाजूकपणा याचा पूर्णपणे अनुभव आपल्याला घेता येतो.त्या काळ्या पॅगोडाचा निरोप घेऊन आम्ही पुरीकडे प्रयाण केले.

पूर्वेच्या किनाऱ्याला संलग्न असलेल्या रस्त्यावरून आम्ही पुरी मध्ये दाखल झालो.यावेळी सूर्य समुद्रात मावळात नव्हता याचेच जास्त अप्रूप होते.कारण लहानपणापासून समुद्र म्हणजे कोकण या समीकरणात मोठे झालेलो आम्ही कायम सूर्यास्त हा समुद्रातच पाहिलेला.पश्चिम किनारपट्टी हीच कायम अंगवळणी पडलेली.इथे सूर्योदय समुद्रातून होतो याचे आकर्षण जास्त.

संध्याकाळी बरोबरचे सामान खोलीवर टाकून फिरायला बाहेर पडलो.पुरी म्हणल्यावर जगन्नाथ मंदिर पहायचे निश्चित होते.सूर्यमंदिराप्रमाणेच 'जगन्नाथ रथ ओढत नेऊ' हि कवितेची ओळ फक्त आठवत होती.याचा अर्थ असा होता कि एखादे अवघड काम सगळे मिळून एकत्र करूयात.पण हे जगन्नाथाचे मंदिर प्रत्यक्ष पहायला मिळेल याची तेव्हा कल्पना सुद्धा नव्हती.अगदी दर्शनाला मुद्दाम पुण्यातून उठून मी नक्कीच इथे आलो नसतो पण चालून आलेली संधी दवडू नये.आणि याच मुद्द्यावर आम्ही मंदिराकडे निघालो.

भारतातील चारधामांपैकी एक म्हणजे जगन्नाथ मंदिर.कृष्ण,बलराम आणि सुभद्रा या तीनही देवतांचे देवालय.एका अरुंद गल्लीतून आम्ही चालत होतो.समोर मंदिराचा कळस आणि झेंडा व्यवस्थित दिसत होता.गल्ली संपवून आम्ही मुख्य रस्त्यावर आलो आणि मंदिराची भव्यता डोळयासमोर आली.



ज्या रस्त्यावरून जगन्नाथ रथ ओढत नेला जातो तोच हा रास्ता.जो आजही भक्तांनी ओसंडून वहात होता.दुतर्फा शेकडो दुकाने आणि पथारीवाले दृष्टिक्षेपास येत होते.साधारण मंदिराबाहेर असलेला देखावा इथेही तसाच होता पण याचे प्रमाण थोडे जास्तच होते.स्थापत्य,सांस्कृतिक भव्यता आणि त्याबरोबर आलेले मांगल्य अनुभवण्याकरिता मोबाइल आणि चपलांचा तात्पुरता त्याग करून आम्ही पद्धतशीर रांगेने आत निघालो.

पूर्वेच्या मुख्य प्रवेशद्वार समोर अतिशय सुरेख सूर्य खांब अर्थातच 'अरुण स्तंभ' उभारलेला आहे.हा स्तंभ मुळतः कोणार्कच्या सूर्यमंदिराबाहेर स्थित होता मात्र नंतर याचे स्थलांतर येथे करण्यात आले.खांबाची उंची सुमारे तेहेतीस फूट असून त्याचा परीघ साधारण सव्वा सहा फूट इतका आहे.मंदिरात प्रवेश करण्याअगोदर भावी याचे दर्शन घेऊन मग पुढे मार्गस्थ होतात.



तुपात असलेल्या वाती,जळत असलेले कपूर,प्रसाद म्हणून देवाण घेवाण होत असलेले साखर फुटाणे,धूप,अगरबत्ती,वाहिलेले हार आणि तत्सम सर्व घटकांच्या मिश्रित गंधाने मंदिराचे आवार दरवळले होते.भाविकांची गर्दी बऱ्यापैकी होती.पण मुख्य देवतांची प्रतिमा दिसायला कष्ट पडले नाहीत.मंदिराचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इतर मंदिराच्या गाभाऱ्यात असलेल्या धातूच्या किव्वा पाषाणातील मूर्तींप्रमाणे इथली मूर्ती नाहीये.इथली कृष्ण,बलराम आणि सुभद्रेची प्रतिमा लाकडात कोरली गेलेली आहे.

दर्शन घेऊन मंदिराच्या आवारात आलो आणि प्रदक्षिणा मारण्यास सुरुवात केली.मुख्य मंदिराच्या बाजूला विविध देवदेवतांची छोटी मंदिरे आहेत.कृष्णाच्या लीला भिंतींवर रंगवण्यात आलेल्या आहेत ठिकाणी कोरलेल्या देखील पहायला मिळतात.मुख्य मंदिराच्या कळसाचा मोठा भाग पांढऱ्या रंगाचा असल्यामुळे मंदिराला 'पांढरा पॅगोडा' असेही म्हटले जाते.मुख्यतः चढत्या क्रमाने असणारी चार मंदिरे सर्वप्रथम दृष्टीक्षेपात पडतात.मात्र प्रत्यक्षात आत गेल्यावर आजूबाजूला असलेली बाकीची छोटी मंदिरे देखील त्यावर असलेल्या कलाकुसरीने लक्षात राहतात.

त्या अर्ध्या तासात स्थापत्य अविष्कार आणि भक्ती साठवून आम्ही बाहेर पडलो.सुमारे आठ वाजून गेले होते.पण भाविकांची रांग तशीच अविरत वहात होती.दुपार प्रमाणेच एक वेगळे ठिकाण पहिल्याच आनंद होता.तंगडतोड बऱ्यापैकी झाल्यामुळे भुकेने मर्यादा सोडल्या होत्या.मगाशी आलेल्या निमुळत्या गल्लीत असलेल्या एका छोटेखानी खानावळीत पोटाचे रिचार्ज केले आणि हॉटेलचा रस्ता धरला.

प्रवास आणि पायपीट यांच्या संमिश्र थकव्यावर कोणार्क आणि पुरीचे मंदिर अलगद चादर घालत होते.उद्याचा सूर्य समुद्रातून उगवताना पहायचा या कुतूहलापोटी गादीला पाठ टेकवली आणि दिवसाचा निरोप घेतला.दिवस नक्कीच सत्कारणी लागला होता.भक्ती,श्रद्धा,धर्म या गोष्टींशिवायही मंदिरात पाहण्यासारख्या भरपूर गोष्टी असतात याची प्रचिती पुन्हा एकदा नव्याने आली.कोणाची सत्ता कुठे होती किव्वा कोणत्या राजाने कुठे राज्य केले यावर तेथील स्थापत्यशैली पहायला मिळते.

तर एकाच दिवसात कृष्ण आणि धवल या दोनही पॅगोड्यान्ना  भेट दिल्यानंतर पुन्हा एकदा हरित निसर्गाकडे निघायची वेळ झाली होती.दुसऱ्या दिवशी पहाटे आम्ही पुरी सोडले.आणि 'चिलिका'च्या खाऱ्या पाण्यातील पक्षी साद घालू लागले.

नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा लिहितो,संधी मिळाल्यास दोन्ही ठिकाणांना आवर्जून भेट द्या कारण भारतीय संस्कृतीचे आणि त्यानुरुप बदलणाऱ्या अनेक गोष्टींचे वैविध्य पाहण्याची इच्छा असेल तर या दोन्ही वास्तू आपल्या यादीत बऱ्यापैकी वर येऊ शकतात.



हृषिकेश पांडकर
०५.०२.२०१८

18 comments:

  1. very nice journey, especially Jagannath Puri Dham.
    nice memories.

    ReplyDelete
  2. Kyaa Baat hain!
    Poorna Konark and Puri la firun alyacha anubhav ala vaachun.

    Apratim!!

    ReplyDelete
  3. ghar basalya Konark Puri darshan...khoop chhan!

    ReplyDelete
  4. सुरेख वर्णन !!
    एरवीच तुझे लिखाण वाचून पुनःप्रत्ययाचा आनंद मिळतो. Keep it up.

    ReplyDelete
  5. Mast ekdum... National Geographic var Jagnnath Puri chi documentary ahe ti athavli... Tula tithe vel kami milala tyacha wait vatla nhitar ajun lihila astas aso jashil parat... Favorite pharse “Potacha recharge kela”

    ReplyDelete
  6. As usual Apratim !!

    ReplyDelete