लहानपणी दिवाळीत घराच्या बाल्कनी मध्ये किल्ला बनवायचो.'लहानपणी' हा शब्द मुद्दाम वेगळा नमूद करावा लागतोय याचे कारण एकतर मी (वयाने) मोठा झालोय किव्वा मी आता किल्ला बनवत नाही.अर्थात दोन्ही गोष्टी तितक्याच क्लेशदायक आहेत.असो तर या दिवाळीच्या आमच्या किल्ल्यावर कायमच वाघाला अभेद्य स्थान असायचे.वर्षानुवर्षे त्याच आवेशात बसलेला वाघ किल्ल्याची शान असायचा.
अळीव किव्वा मोहरीच्या बनात आणि विहिरीला खेटून असलेल्या गुहेत गवतात चरत असलेल्या गाई आणि हरणांना न्याहाळणारा तो जंगलचा राजाची तेव्हाही तसूभर हालचाल नसायची आणि आजही तो यत्किंचित हलला नाही.त्याच विहिरीवर पाणी भरायला आलेल्या बायका शांतपणे बसून तो तेव्हाही पहायचा आणि आज आमची संबंध जिप्सी असूनही तो जरासाही वळला नाही.
तशीच मुद्रा,तोच आवेश,तसाच रुबाब आणि तेच सौन्दर्य.अंगाभोवती गवत असूनही आपले वेगळे पण जपणारा तो वाघ आज पुन्हा आठवला
नाही म्हणायला मधले काही क्षण पाठीवर लोळला देखील पण फोटो काढायला त्याची परवानगी नसावी.काही वेळ तर पलीकडे तोंड करून झोपला होता; हाक मारायची देखील सोय नाही.नंतर कदाचित आमची कीव येऊन त्याने आमच्याकडे मान फिरवली असावी.
तोच हा क्षण,टीव्हीवरच्या दोन कार्यक्रमात जाहीरात लागावी त्याप्रमाणे सूर्यास्त आणि रात्र या मध्ये केवळ रंग दाखवून जाणारा संधिप्रकाश पसरला होता.आमची सफारी संपण्याची वेळ झाली होती आणि याच्या रात्र सफारीचा तो प्रारंभ होता.
पुढ्यात बसलेला वाघ सोडून निघून जाणे इतका माज करण्याची संधी सुदैवाने कधीच मिळाली नव्हती.पण एखाद्याच्या घरी न सांगता भेटीला जायचे म्हणल्यावर त्याच्या 'रुटीन' ला अडथळा येणार नाही याचे भान ठेवणे यासारखे सामंज्यस्य नाही हेच खरे..नाही का ?
- हृषिकेश
 
No comments:
Post a Comment