Friday, August 2, 2013

थेंबभर कंटाळा …



      वेडी लोकं प्रेमात पडतात कि प्रेमात पडल्यावर लोकं वेडी होतात,हा एक प्रश्नच आहे.पण प्रेम आणि पावसाळा यांचा संबंध जोडून,पावसाळा हा Romantic ऋतू आहे असे ज्यांचे मत आहे ती माणसे नक्कीच वेडी आहेत अशी माझी खात्री झाली आहे.कदाचित या वर्षीचा पाऊस हे त्याचे एकमेव कारण असू शकेल.

     
जून हा पावसाळ्याचा पहिला महिना आहे असे आमचे कॅलेंडर सांगते.आणि या हिशोबाने बरोबर एक जूनला पावसाने आपले अस्तित्व दाखवून दिले.आणि त्या दिवसापासून नळ चालू राहिल्यासारखा सलग टपकतोय.पावसाचे चार महिने आहेत पण म्हणून चार महिन्याचा पाऊस महिन्याभरातच ओतून दिल्यासारखा पडतोय.आज जुलै संपला पण या दिवसात एक दिवस पाउसाविना गेलाय असं नाही.  

      बर पाऊस पडतोय तर सलग तीन तास तुडवल्यासारखा पडतोय असेही नाही.१५-१५ मिनिटांचे हफ्ते भरल्यासारखे थांबून येतोय. म्हणजे माणसाला संपूर्ण भिजवायचं,त्याला वाळायला वेळ द्यायचा आणि कोरडे झाल्यावर परत भिजवायचा असा काहीसा प्रकार चालू आहे.म्हणजे प्रेमात भावनांशी खेळतात तसा हा रंगपंचमी खेळतो. 
     
उत्तर ध्रुवावर सहा सहा महिने सुर्य दिसत नाही म्हणतात, आमच्या पुण्याची पण तीच अवस्था झाली आहे.अगदी सहा महिने नाही पण साधारण दोन महिने आम्ही सुर्य किरणांशिवाय जगत आहोत.आणि यामुळेच घराला धोबीघाटाचे स्वरूप आलेले आहे.कपडे वाळणे तर सोडाच पण  पिळलेले कपडे पुन्हा येणाऱ्या पावसाने भिजायची भीती जास्त आहे.कुठे तो पहिल्या पावसातील मातीचा वास आणि कुठे तो अर्धवट वाळलेल्या जीन्सचा वासकसल डोंबल्याच Romantism.   

      पहिल्या चार पावसातच रस्त्यांनी कात टाकलीये.साठलेल्या पाण्यात गेलेले गाडीचे चाक किती खोल जाईल याची खात्री नाही.आधीच पुण्यातल्या गाड्यांची संख्या जास्त त्यात शिस्तप्रिय वाहनचालक आणि पावसाने ठेवलेला वरदहस्त हे म्हणजे (ओल्या) दुष्काळात तेरावा महिना असल्यासारखेच आहे.रस्त्याची झालेली चाळणी आणि महानगर पालिकेचा ठिगळे लावायचा तोकडा प्रयत्न हि सर्कस बघताना आपली होणारी कसरत कसली Romantic हो ?

     
भिजायचे नाही असे खूप ठरवले जाते,पण आपण बाहेर पडायची आणि पाऊस यायची वेळ एकच कशी येते हा योगायोगच माझ्या पचनी पडत नाही.मग भले तासभर आपण एका कामाच्या ठिकाणी असू,बाहेर थेंबभर पाऊस नाही.आणि काम संपवून बाहेर पडलो कि दत्त म्हणून हजर. नखशिखांत भिजलो तर फार त्रास होत नाही पण तेच फक्त जीन्स चा थोडा भाग किव्वा शर्टच्या बाही मधून आत गेलेले पाणी या गोष्टी सहनशीलतेचा अंत बघतात.म्हणजे आता या पावसाने परिस्थिती इतकी वाईट आणून ठेवलीये कि भिजवणार असशील तर पूर्ण भिजव उगीच शिंतोडे उडविल्यासारखे करू नको त्याचा त्रास जास्त होतो.  





 
      बालगंधर्व किव्वा एस एम  जोशी पुलावर असलेला कणीस विकणारा माणूस जर खूप पावसामुळे कणीस विकायलाच आला नाही तर त्या पावसात प्रेमाचा ओलावा कसा असू शकतो ? आणि हीच गत आहे यंदाच्या पावसाची,पाऊसच इतका आहे की त्या पुलावरून पाणी बघायला येणारे देखील सततच्या पावसामुळे दिसेनासे झाले आहेत.मग नदीचे फोटो काय आम्ही दर वर्षीच पेपर मध्ये बघतो.मान्सून सेल मधून खरेदी करण्याचा उत्साहच या पावसामुळे वाहून गेला पण मग यात Romantism कुठले ?

      चष्म्यावर पडलेल्या पावसाच्या पाण्याने दृष्टी जितकी धुसर होते त्यापेक्षा जास्त धुसर वातावरण आहे.पावसाचा तिटकारा वाटावा इतक्या पावसाची कदाचित सवय नाहीये.पाऊस म्हटल्यावर डोळ्यासमोर येणारे चित्र आणि या वेळेच्या पावसाने रंगविलेले चित्र यात कदाचित विरोधाभास असल्याने पावसाबद्दल इतके कोरडे विचार व्यक्त करायची इच्छा झाली असावी.

   पावसाला विनंती अर्ज लिहिला तरी त्याची शाई पाण्याने पुसली जाईल इतका पाऊस आहे.पण एकच विनंती असू शकेल की श्रावणाच्या उंबरठ्यावर उभे राहूनही मागच्या वर्षी थेंबभर पाऊस नव्हता.पण आता त्याच श्रावणाच्या स्वागताला मागच्या वर्षीची उणीव भरून काढण्याच्या इर्षेने आलेला पाऊस काही काळापुरता तरी विसावलेला पाहायला आवडेल. 

      थोडक्यात काय तर श्रावणातील सणांचा उत्साह पावसाच्या पाण्यात विरघळून जायला नको … आणि ढोल ताशांचा आवाज बसायला नको….

ता. क .  - पाऊस हा अत्यंत गरजेचा असून तो पडणे अत्त्यावश्यक आहे तरी विचार मांडणे गैर नसल्याने लिहिण्याचा खटाटोप.

   


                                                                                               हृषिकेश पांडकर
                                                                                               ०२-०८-२०१३

11 comments:

  1. tujh lekha vachun romance bharlay angat...ata veda jhalo ki nahi he me nahi sangu shakat :)

    ReplyDelete
  2. तो शब्द Romanticism आहे… असो… उगाच नको ते बारकावे काढायला नकोत… लोक उडतील:-)
    बाकी लेख छान! वाचून ओला झाल्यासारखं वाटतंय … कपडे बदलून येतो ;-)

    ReplyDelete
  3. sahi...nemkya shabdat sagla mandla ahes :)

    ReplyDelete
  4. '' पाऊस'' हा पंच'' महाभूताचेच '' --- एक अंग असल्याने तो केंव्हा कसा रुसेल अन केंव्हा बरसेल हे त्याचे त्यालाच ठावूक .त्यामुळे आपणच त्याच्याशी सुत जमवून घेण्याशिवाय तरणोपाय नसतो हेच खरे नाही का …? Dr. ARWIND VAIDYA----PUNE

    ReplyDelete
  5. pratyek lekhakachi ek style aste mhantat .. tya lekhakache khup likhan vachle ki ti style kalte ase mhantat .. ti shabdat sangta yet nahi pan tya lekhakachya pratyek lekhat ti janavte .. tuzi pan ek vegli style aahe .. ti saglya lekhanmadhe janavte .. yaat pan aahe .. nicely written

    ReplyDelete
  6. Punyatlya pavasala jitka me miss kela ahe titka kadachit konich kela nasel.. Saglya 'pavasatlya' athavani taja jhalya.. ;) :) masta lihila ahes...!

    ReplyDelete
  7. apratim shbdankan re ....paus asach barsat rahu de...ani tuzya lekhanitun tasch kahitari navin baher padu de.....mast lihilaly re as usual.....he wachtana baher paus ani hatat chaha ashi situation haviye...:):):):)

    ReplyDelete
  8. Punekaranna asha pavsachi savay nahi, tyamule THEMB-BHAR Kantala ala asla tari, pavsala romance phulavinara rutu ahe he nishitt. Tula asha premachi anubhuti pavsalyat anubhavnyas milali, tar tuza Lekhank jinkala, asech mhanave lagel !!!

    ReplyDelete