Tuesday, August 28, 2012

..( भाग - २ )


             
  आता वेळ होती दुसर्या कॅम्पवर जाण्याची..हे सांगायच्या आधीच त्याने जाहीर केले कि हेलीकॉप्टर पोहोचू शकेल असा हा शेवटचा टप्पा आहे.इथून पुढे हेलीकॉप्टर जात नाही.आणि कॅम्प २ च्या वर समजा मृत्य झाला तर मृतदेह मिळण्याची शक्यता नगण्य असते...म्हणजे नसतेच..हा कॅम्प २ चा ट्रेलर ऐकून आम्ही बरे आणि आमचे पुणे त्याहून बरे. असा एक संकुचित विचार मनाला चाटून गेला.२१३०० फुटांवर कॅम्प २ आहे.अर्थात कॅम्प आहे म्हणजे तिथे जाऊन आपापले तंबू ठोकावे लागतात हा भाग वेगळा.पण ती एक सर्वसाधारणपणे ठरविली गेलेली जागा आहे. म्हणजे तुम्ही कल्पना करू शकत असाल तर बघा...भुसभुशीत आणि कठीण बर्फ ओळखून त्यावर योग्यरीत्या आपले तंबू ठोकणे आणि त्यात राहणे... 
 त्यापेक्षा मी प्रभात रस्त्यावर २ 'Duplex Flats ' घेऊन राहीन ना.अर्थात त्या प्रभात रस्त्यावरून त्याने वर्णन केलेली सकाळ मला दिसली नसती हा मुद्दा वेगळा.कारण सकाळी ९ वाजता लक्ख सूर्यप्रकाशाने चकाकणारा प्रदेश डोळे वर करायची संधी देत नव्हता.पांढराशुभ्र ताजा बर्फ आणि त्यावर परावर्तीत होणारा लक्ख सूर्यप्रकाश हे दृश्य ऐकायला जरी प्रचंड विलोभनीय वाटत असले तरीही परावर्तीत होणारे किरण हे धोकादायक असतात.UV किरणांचा सर्वात जास्त त्रास होण्याचा धोका या वेळी सर्वात जास्त असतो.आणि या वेळी असणारी तापमानाची पातळी कमाल ४५C इतकी असते.( म्हणजे आपल्या भाषेत सांगायचे तर मे महिन्यामधील जळगावातील दुपार ). या वरून तुम्ही साधारण अंदाज लाऊ शकता कि बर्फातील उकाडा काय लेव्हलचा असू शकतो.मात्र खरी गम्मत तर या पुढे होती कारण ९ वाजता असणारे ४५C तापमान ११.३० वाजेपर्यंत -४५C ला जाऊन पोहोचते.४५C te -४५C हा प्रवास सुमारे २.३०  तासात पार पडतो.म्हणजे तो इतके देखील म्हणाला कि सकाळचे २ तास कपडे काढून बसण्याइतपत उकाडा असह्य होतो आणि एखादा ढग जरी सूर्यासमोर आला तरी तापमानात प्रकर्षाने घट होऊन थंडी वाजण्याइतपत तापमान घसरते.आपल्याला इथे बसून याचा अंदाज येणे शक्य नाहीये मात्र AC रूम मधून बाहेर उन्हात आल्यावर किव्वा उन्हातून लगेच AC खोलीत गेल्यावर आपल्याला जसे वाटते त्याच्या कित्येक पट जास्त विरोधाभास इथे घडत असावा.




                एवढा सगळ्या दिव्यातून गेल्यावर पुन्हा बेस कॅम्प ला येणे हे आव्हान कायम होतेच.म्हणजे पुन्हा कॅम्प १, खुंबू आईस फॉल आणि मग बेस कॅम्प.आणि हे अडथळे पार करून आम्ही बेस कॅम्प ला उतरलो.
               
हे झाल्यावर मी त्याला सहज खाण्यापिण्याचे विचारले.कारण परदेशातल्या लोकांपैकी कोणाचा फोन आला तर माझी आई सर्वप्रथम "तिथे आत्ता किती वाजले आहेत हे विचारते", त्याप्रमाणे मी पण अतिशय सर्वसामान्य प्रश्न विचारून चर्चेला थोडा विसावा दिला.अर्थात त्याने दिलेल्या उत्तरावरून लक्षात आले कि त्या वातावरणातील 'जेवण' हा काही 'खाण्याचा' विषय नव्हता.कारण अतिप्रचंड कमी तापमानामुळे भूक अजिबात लागत नाही. त्यामुळे ज्यूस किव्वा energy drink या पेक्षा जास्त खाणे शक्य होत नाही.पण शरीराची प्रतिकार क्षमता आणि ताकद कायम ठेवण्यासाठी किमान नाश्ता करणे अत्यावश्यक असते.आणि भूक नसताना पोटात अन्न ढकलणे हा मोठा अडथळा होता.कारण त्याने हे सांगितले कि 'उद्या सकाळी नाश्ता पोटात ढकलणे आणि मग चालायला सुरुवात करणे यातील 'नाश्ता पोटात ढकलणे' याचे टेन्शन त्यांना जास्त होते.ऐकायलाच विचित्र वाटत होते.प्रत्यक्षतेची तर कल्पनाच नको. 
              
आता पुन्हा नव्या तयारीने आम्ही तिसर्या कॅम्प च्या ओढीने सावरून बसलो.तो तर काय सांगू आणि काय नको या उत्साहात सांगत होता.चढाईचा उत्तरार्ध इथे खर्या अर्थाने सुरु होतो असे म्हणायला हरकत नाही.कॅम्प ३ वर बर्फ म्हणल्यावर डोळ्यासमोर जे येते त्यासारखा बर्फ इथे नसतो.म्हणजे खूप काळ साठलेला आणि प्रचंड कठीण झालेला निळसर रंगाचा बर्फ इथे असतो.ज्यावर चालणे अवघड असते.अर्थात पायात जरी खिळ्यांचे बूट असतील तरीही कठीण असते.शिवाय चढताना हातातील 'Ice Axe 'बर्फात घुसवून त्या आधाराने पुढे सरकणे भयंकर कष्टप्रद असावे.कारण बर्फाचा थर प्रचंड कठीण झालेला असतो.
                आधी सांगितल्याप्रमाणे कॅम्प २ च्या  पुढे  हेलिकॉप्टर येऊ शकत नाही त्यामुळे वार्याचा वेग आणि हवामानाची क्रूर खेळी याचा किमान भौगोलिक अंदाज तुम्ही लाऊ शकता.तो सांगत होता, ताशी काही मैलाच्या वेगाने वाहणारे वारे चालताना इतके आव्हान निर्माण करतात कि वार्याच्या वेगापुढे पाऊल टाकणे देखील अशक्य आस्ते.यावर त्याने एक अनुभव सांगितला.तो आणि त्याचे दोन साथीदार आणि त्यांच्याबरोबर असलेला एक एक शेरपा असे सहाजण एका रेषेत चालत होते.आणि अशक्य वेगाने एक वार्याचा झोत आला तेव्हा आणि क्षणार्धात आम्ही सहाजण त्या दोरी सहित किमान १५ फुट लांब उडून पडलो...आणि मग वारा थांबल्यावर आम्ही पुन्हा उठून आमच्या मूळ मार्गावर आलो आणि पुन्हा चढाई सुरु केली.वार्याच्या झोताबरोबर १५ फुट उडणे हि क्रिया पचनी पडायलाच मला काहीसा वेळ गेला.म्हणजे एक तर चालताना लागणारा दम वेगळाच.त्यात १५ फुट फेकून दिल्यासारखे दूर कुठेतरी जाऊन पडायचे.परत तिथून उठून योग्य वाटेवर येऊन चढायला नव्यानी सुरुवात करायची.आणि त्यात समजा तुम्ही कुठल्या कड्यावरून चालत असाल तर काय ??...मरायचे ??...मी फार काही विचारायच्या फंदात न पडता ऐकणे चालू ठेवले..     




              तिसर्या कॅम्पची उंची २४,००० फुट इतकी आहे म्हणजे सुमारे २७०० फूट चढून तुम्हाला कॅम्प ३ वर यावे लागते.ऑक्सिजन चे कमी होणारे प्रमाण,सतत बदलणारे तापमान आणि बर्फाचे कडे कोसळण्याची वाढलेली शक्यता या गोष्टीना समर्थपणे तोंड देऊन चढायचे...हे वाचताना देखील कदाचित दमायला होऊ शकेल.मला ऐकताना झाले म्हणून सांगतोय.
               
तिसरा कॅम्प हेच मुळात एक आश्चर्य आहे, कारण हा ७५ अंशाचा चढ आहे आणि संपूर्ण बर्फ पसरलेला आहे.आणि या ठिकाणी मध्यभागी उतारावर तंबू ठोकावे लागतात.आता हा जो उतारावर असलेला बर्फ असतो तो खाच मारून अक्षरश: कापला जातो आणि त्या खाचेत तंबू ठोकावा लागतो. म्हणजे जी रात्र तेथे घालवावी लागते ती त्या उतारावर तयार केलेल्या खाचेत काढावी लागते.आता या कल्पनेनेच झोप येणे हि दूरची गोष्ट आहे.यानंतर तो म्हणाला कि मी जेव्हा सकाळी माझ्या तंबूतून बाहेर डोकावले तेव्हा उजव्या हाताला थेट अडीच हजार फुट खाली लावलेला दुसरा कॅम्प दिसत होता.आता हे दृश्य किती विलोभनीय असू शकेल.म्हणजे आपण स्वतः २४००० फुटांवर बसलेले आहोत.चहुबाजूला बर्फ पसरलेला आहे.समोर एव्हरेस्ट आणि मागे खोल दिसत असलेला कॅम्प २....



      एव्हाना माझी अशी कल्पना झाली होती कि त्या ठिकाणी या ६/८ लोकांखेरीज कोणी नसेल.आणि मी विचारले कि "रात्रीचा अंधार आणि एकांत याची तुम्हाला भीती वाटली  नाही का ?" या वर तो थोडेसे हसून म्हणाला कि, "शरीराची शक्ती टिकवणे,शिखराची असलेली ओढ आणि विचार करण्याची मेलेली इच्छा या गोष्टींपुढे भीती आणि एकाकीपणा फार दुय्यम ठरतात" आणि तो म्हणाला कि इथे एकच ग्रुप आहे असे कधीच होत नाही, कारण कॅम्प ३ वरून कॅम्प ४ ला जाण्याच्या वाटेत असलेली लोकांची गर्दी हि गणपती मिरवणुकीत असलेल्या लक्ष्मी रोड ची गर्दी झक मारेल अशी असते.यावर अचंबित होणे या पलीकडे कुठलेही expression माझ्याकडे उरलेले नव्हते.कारण अश्या आडवळणी वाटेवर पण इतकी गर्दी असू शकते हे मला पहिल्यांदाच समजले होते.

     आता आम्ही एव्हाना तिसरा कॅम्प सोडला होता.कॅम्प ३ ते कॅम्प ४ या टप्प्यात सुमारे २००० फूट एवढी उंची सर करावी लागते.चढत असताना समोरच्या व्यक्तीला 'overtake 'करणे हि अतिशय अवघड आणि जीवघेणी गोष्ट आहे.म्हणजे तुम्हाला समोरच्या व्यक्तीच्या पुढे जायचे असेल तर सर्वप्रथम स्वत:चा हूक दोरीतून काढायचा,समोरच्याच्या पुढे चालत जायचे आणि मग तो पुन्हा दोरीत अडकवायचा.या मधल्या काळात वार्याचा झोत जरी आला किव्वा काहीही झाले तरी  जीवनाची दोर तुटायची.अश्या वेळी समोरचा समजा दम लागून थांबला असेल तर आपल्यालाही थांबावे लागते.आणि हे सर्वात कष्टप्रद काम असते.कारण थांबल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होण्याची शक्यता असते आणि चालण्याची लय जाते हा वेगळाच भाग असतो.
              
मी एक सहज विचार केला कि या स्थितीला त्यांची मानसिकता काय असू शकेल.कारण एवढ्या अवघड परिस्थितीत मानसिक आणि शारीरिक संतुलन ढळू न देता स्वतःला सावरायचं.भूक लागण्याचा तर संबंधाच नसतो.आणि अतीव थकवा असून देखील तापमानामुळे निद्रानाश झालेला असतो त्यामुळे झोपेचा तर आनंदच असतो.आणि पुरेशी झोप न मिळूनही दुसर्या दिवशी आपले मार्गक्रमण चालू ठेवणे अपरिहार्य असते.मात्र एव्हरेस्ट सर करण्याची जबरदस्त इच्छाशक्ती हि एकचं जमेची बाजू बाकीच्या अडचणींवर सहज मात करीत असावी.    

              
समुद्रसपाटीपासून २६००० फुट उंचीवर असलेला हा चौथा कॅम्प.ऑक्सिजन मास्क खेरीज वावरणे केवळ अशक्य.हवेचा अतिशय कमी दाब.त्यामुळे  २/३ पाऊले टाकल्यावर छातीचा भाता होतो.वातावरणामुळे होणारी शरीराची प्रचंड झीज .भूक अजिबात लागत नसल्यामुळे उर्जा मिळण्याची शक्यता कमीच.अर्थात हाच निसर्गाचा नियम आहे.नियम पळून खेळलात तरच खेळण्यात अर्थ आहे.नाहीतर त्याला फाउल असे म्हणाले जाते.दुसर्या खेळातील फाउल मध्ये point जातो...इथे जीव...

 

                                                                                             - क्रमश:

                                                                                            

No comments:

Post a Comment