Tuesday, February 14, 2012

आमच्या गावची जत्रा...


       परवा रात्रीची गोष्ट आहे.थंडीची लाट जरा कमी झाली आहे असे वाटत असतानाच अचानक पुन्हा थंडी वाढली आणि हवामानशाळेनी या मोसमातील निच्चांकी हवामानाची नोंद केली.त्याच रात्री साधारण १० च्या सुमारास डेक्कन कडून नारायण पेठेत चाललो होतो,बाबा भिडे पुलावर थंडीने सगळ्या मर्यादा सोडल्या होत्या.कारण दोन्ही बाजूने नदी आणि संपूर्ण रिकामी जागा आहे. या पुलावरून जात असताना मला कायम तेथे लागणाऱ्या जत्रेची किव्वा रॅम्बो सर्कस ची प्रकर्षाने आठवण होते.परवा जात असताना पण मी सहज डावीकडे पाहिले तर नदीपात्रात कुठले तरी स्टेज उभारण्याचे काम चालू होते एवढ्या कडाक्याच्या थंडीत लोक काम करत होते.मी तसाच पुढे गेलो तर तिथे " जाहीर महाप्रचारसभा " असे मोट्ठे होर्डिंग लागले होते.मग मला लगेच समजले कि नदीपात्रामध्ये हि सभा होणार आहे.त्यानंतर सुमारे तासाभरानंतर मी पुन्हा घराकडे निघालो होतो.पुन्हा पुलावर आल्यावर त्या तयारीकडे लक्ष गेले.स्टेज चे काम बर्यापैकी पूर्ण झाले होते.लोक अजूनही कामात मग्न होते.मी घरी आलो.आणि अंथरुणावर येऊन झोपलो.का कोणास ठाऊक पण नदीपात्रात लागणारी जत्रा आणि निवडणूक या दोनच गोष्टी माझ्या डोळ्यासमोर येत होत्या..काहीवेळानंतर झोपेने माझ्या या विचारांवर ताबा केव्हा घेतला हे समजले देखील नाही.
           मी एका मोठ्ठ्या जत्रेच्या प्रवेशद्वारापाशी कुतूहलाने पाहत उभा होतो.काही लोक आत मध्ये जात होते काही बाहेर येत होते.मी देखील आत काय आहे ते बघुयात असा विचार करून जत्रेत प्रवेश केला.आत पाहतो तर काय सगळी कडे नुसता झगमगाट होता.विविध स्टॉल्स लागले होते.स्टॉल्स वर त्या त्या स्टॉल्स ची माहिती देणारे लोक होते.आमच्या स्टॉलवर काय चांगले आहे , आमचा स्टॉल कसा भारी आहे,आमच्या इथे काय गोष्टी मिळतात.आमच्या इथे कुठले खेळ आहेत त्यात तुम्ही जिंकल्यावर तुम्हाला काय मिळेल अशा आशयाचे मजकूर लिहिलेले बोर्ड्स,फळे बाहेर टांगलेले दिसत होते.काही स्टॉलवाले तर चक्क खुर्चीवर उभे राहून मोट्ठ्याने ओरडत लोकांचे लक्ष वेधून घेत होते.
         क्षणभर 'कुठे आलो या गदारोळात' असे देखील वाटले होते.पण मागे फिरलो नाही..आलोच आहोत तर नीट पाहून तरी जाऊयात असे वाटून मी जत्रेत एकरूप  झालो.
        थोडेसे चालत पुढे गेलो तर डाव्या बाजूला कमळाच्या आकाराचा मोठ्ठा तंबू उभारला होता ,बाहेर कमळाचे गुणधर्म,महत्व आणि उपयोग काय काय आहेत हे  दर्शवणारी मोठी चित्रे टांगलेली होती.चालत चालत त्या कमळाच्या आकाराच्या तंबूत देठामधून वाकून प्रवेश केला,आत मध्ये कमळाच्या फुलापासून बनविलेल्या शोभेच्या वस्तू,कमळाच्या पानापासून बनवलेल्या औषधी गोष्टी इत्यादींची टेबल्स मांडून ठेवलेली होती.शेजारी काही लोक इतर फुलांपेक्षा आमचे कमळ कसे गुणवान आहे हे आत आलेल्या लोकांना समजावून सांगण्याच्या प्रयत्न करत होते.आणि आपल्याकडील वस्तू त्यांच्या गळी उतरविण्याचा घाट घालत होते.
         मी या कलकलाटातून हळूच निसटलो आणि पुन्हा बाहेर येऊन बाकीची जत्रा पाहणे सुरु ठेवले.
थोडा पुढे चालत गेलो तर अजून एक  मोठ्ठा स्टॉल लागला होता जिथे एक खेळ चालू होता.मोठ्ठ्या थर्मोकोल वर एक भारताचा मोठा नकाशा काढला होता आणि त्यात सर्व राज्ये विविध रंगांनी रंगवलेली होती.आणि ते थर्मोकोल चे मोट्ठे शिट समोरच्या बाजूस लटकविलेले होते.आता जो कोण हा खेळ खेळत असेल त्याने  सर्वप्रथम काउंटरवर पैसे भरायचे, पैसे भरून झाल्यावर त्याला एक धनुष्य आणि ३ बाण मिळतात,  मग तिथे उभा असलेला त्यांचा स्वयंसेवक त्याला सांगतो कि अमुक एका राज्यावर बाण मारायचा आणि समजा तो बाण अचूक लागला तर त्यांनी जी काय बक्षिसे ठरवलेली होती ती त्यांना मिळणार.मी सुमारे १५ मिनिटे हा  खेळ पहात होतो.७-८ लोक माझ्यासमोर खेळले मोठ्या हौशीने पैसे भरून खेळले पण एकाचा देखील नेम अचूक लागला नाही.नंतर निराश होऊन 'जाऊदे पुढल्या  वेळी' असे म्हणत पुढे जात होते.तिथे असलेले स्वयंसेवक मात्र आपले बक्षीस सुरक्षित आहे आणि पैसे पण मिळत आहेत या आनंदात अजून लोकांना खेळण्याचे  आमंत्रण देत होते.
        मी देखील आता तिथून काढता पाय घेतला आणि पुढल्या स्टॉलवर स्थिरावलो.पुढे काहीतरी भलताच प्रकार चालू होता.मी व्यवस्थित जागा हेरून तिथून तो  प्रकार पाहू लागलो.मोठा स्टॉल होता त्यावर विविध रंगाच्या पाण्याचे ट्रे ठेवलेले होते.आणि प्रत्येक ट्रे शेजारी एक पांढऱ्या शुभ्र कापडाचे चौकोनी तुकडे कापून ठेवलेले होते.तर हा प्रकार असा होता कि दाराजवळ पैसे भरून आत जायचे, समोरच्या बाजूला त्यांचे लोक उभे होते.आपण सर्वप्रथम आपले पंजे स्वच्छ धुवायचे आणि पुसून त्या रंगीत पाण्यात बुडवायचे.बुडवून झाल्यावर तोच पंजा शेजारी ठेवलेल्या पांढऱ्या कापडावर दाब देऊन उमटवायचा आता आपल्या पंजाची प्रतिमा त्या  कपड्यावर येते.आणि मग ते कापड त्यांचे लोक आत मधील खोलीत घेऊन जातात आणि ५ मिनिटानंतर आपले कापड आणि एक कागद पुन्हा आपल्याला परत  करतात, त्या कागदावर आपले भविष्य लिहिलेले असते.( म्हणजे काहीतरी लिहिलेले असते आणि तेच तुमचे भविष्य आहे असे ते सांगत होते.)..लोक आपापला  कागद आणि कापड घेऊन स्टॉल बाहेर येत होते.काही लोक चुकीचे वाटतंय म्हणून हसत होते.काही लोक भविष्य वाचून खुश होत होते.काही लोक पैसे भरून देखिलाही "अरे नुसता पंजा बघून काही भविष्य ठरते का ?" असे म्हणत नैराश्य व्यक्त करत होते.
           उतार वयातील मंडळी दुसर्यांचे भविष्य सांगण्यात गुंतलेली पाहून थोडेसे आश्चर्य वाटत होते.थोडक्यात काय तर स्टॉल वाले कार्यकर्ते सोडले तर बाकीच्यांना कितपत आनंद मिळत असेल अश्या संभ्रमात मी तिथून पुढे निघालो.
गर्दी भरपूर झाली होती मी देखील गर्दीतून वाट काढत पुढे जात होतो.पुढे तर एक वेगळेच चालू होते.मोठ्ठी आगगाडी बनवली होती आणि त्या आगगाडीतून संपूर्ण जत्रेमधून फेरफटका मारण्याची संधी तुम्हाला मिळत होती.भलेमोठे इंजिन बनवले होते आणि त्यामेगे ३ डबे जोडलेले होते.संपूर्ण जत्रे मध्ये काय चालू आहे हे  तुम्हाला पहायचे असेल तर त्या इंजिनात बसा..एकदा इंजिनात बसलात कि बाकी ठिकाणी वेगळे जायची गरजच नाही अशा प्रकारची जाहिरात करणारे फलक  बाहेर लावलेले होते.सर्व तरुण मंडळी इंजिन भोवती जमली होती.इथे पण आधी पैसे भरायचे आणि आपल्या जागेवर जाऊन बसायचे.आणि मग फेरी मारून झाल्यवर पुढे जायला मोकळे.एकदा तिथून सुटलेले इंजिन पाहून मी तेथून निघालो.फेरफटका मारलेला तरुण वर्ग चांगलाच खुश वाटत होता पण बसल्या बसल्या  आपले स्टॉल नुसते बघून लोक पुढे जातात या कल्पनेने इतर स्टॉल वाले इंजिनावर भलतेच नाराज दिसत होते..
       तिथून पुढे गेलो, आपल्याला खूप उशीर झाला आहे असे वाटून कोणाला तरी वेळ विचारावी म्हणून आजूबाजूला पाहू लागलो तेवढ्यात समोरच्या स्टॉल वर  घड्याळ लावलेले दिसले,पळत पळत त्या स्टॉल पाशी गेलो पण तिथे फक्त मोठ्ठ्या घड्याळाचे चित्र टांगलेले होते आणि त्यात १० वाजून गेले होते.पण कागदाचे  घड्याळ काय खरी वेळ दाखवणार म्हणून मी वेळ विचारण्यासाठी त्या घड्याळाच्या स्टॉल वर गेलो.आणि समोर पाहतो तर अनंत प्रकारची घड्याळे मांडून  ठेवलेली  होती.काही मनगटी घड्याळे काही भिंतीवरची घड्याळे काही जुनी घड्याळे,'साहेब' लोक घालतात तसली बिनकाट्याची घड्याळे,मोठे शेतकरी लोक वापरतात तसली सोनेरी रंगाची घड्याळे अशी अनेकविध घड्याळे उपलब्ध होती.लोक आपल्या खिशाला आणि पसंतीला योग्य वाटतील अशी घड्याळे निवडत होते.सगळ्यांचे एकच मत होते "बाबा रे वेळ योग्य दाखव म्हणजे झालं".
           घड्याळे बघण्यात माझा बराच वेळ गेला मात्र आत्ता किती वाजले हे पाहण्यासाठी मला त्या घड्याळाचा उपयोग झालाच नाही शेवटी बाहेर येऊन एका काकांना विचारले "काका किती वाजले"...काका हसत म्हणाले अरे बाळा इतका घड्याळांच्या दुकानात जाऊन आलास आणि साधी वेळ तुला समजली नाही ?...आणि एवढे म्हणून  ...आणि ते काका गालातल्या गालात हसत मार्गस्थ झाले....मला काहीच समजले नाही.मी मात्र चालू आणि वेळ दाखवणाऱ्या घड्याळाच्या शोधात मार्गी लागलो.
         थोडे पुढे गेल्यावर ज्या लोकांना स्टॉल ची गरज नसावी किव्वा ज्यांना स्टॉल मिळाले नसावेत अशी लोक आपापले छोटे चौथरे टाकून बसले होते.तिथे काही लोक  लहान मुलांची खेळणी विकत होते ज्यामध्ये विमाने,सायकल,बॅट,शिट्टी,हत्ती अश्या प्रकारच्या गोष्टी मांडून ठेवलेल्या होत्या.या ठिकाणी जास्त गर्दी जाणवत नव्हती.मी आपला सहज वर वर सगळ्या गोष्टी आपल्या नजरेखालून घातल्या आणि पुढे निघालो.त्यांचा पसारा जरी लहान असला तरी आपल्या वस्तू विकायच्या  कश्या हे त्यांना पक्के ठाऊक होते.लोकांना आपल्याकडे खेचण्याचा एकही मार्ग त्यांनी मोकळा सोडला नव्हता ....
          आता मात्र मला आपल्याला पोट आहे आणि पाय देखील याची प्रकर्षाने जाणीव होऊ लागली होती.खिशात फारसे पैसे नव्हते त्यामुळे चहा कुठे मिळतोय का हे  शोधत मी थोडा पुढे गेलो आणि एका ठिकाणी मोठ्ठा फलक लावला होता "चहा घ्या...आणि तो सुद्धा फक्त आमच्याच कप -बशी मधून"मी आनंदाने तिथे गेलो माझ्याप्रमाणे अनेक लोक तिथे जमले होते.मी पैसे देऊन चहा घेतला तेव्हा तिथल्या स्टॉल वरचा माणूस मला म्हणाला कि चहा कसाही असो आमच्या कप -बशीतून घेतला म्हणजे चवदार लागणारच.मी तोंडदेखले हसून ती कप बशी घेतली आणि शेजारी उभा राहून चहा प्यायलो.चहा घेऊन झाल्यावर..चहा नसता प्यायला तर किमान पैसे तरी वाचले असते असे वाटण्याइतपत चवहीन चहा होता.माझ्याप्रमाणेच इतर लोकांच्या पण प्रतिक्रिया अश्याच होत्या.पोटातील अग्नी  विझाव्ण्याच्यी  कल्पनाच मुळात विझ्ल्यामुळे मी काहीसा निराश होऊन पुढे निघालो...
        सरतेशेवटी
  मी जत्रेच्या बाहेर पडण्याच्या दाराजवळ येऊन पोहोचलो. जत्रा संपूर्ण पाहून झाली होती. माझ्याबरोबर बरेच लोक बाहेर पडत होते काही लोक आनंदी वाटले  काहींना मनासारखे न मिळाल्याचे नैराश्य लपविता येत नव्हते.काही लोक छान टाईमपास झालं या आनंदात हसत बाहेर पडले.तर काही लोक पैसे जाऊन देखील  नेमबाजी जिंकता आली नाही याच दु:खात बाहेर पडत होते.काहींना चुकीच्या ठिकाणी पैसे घालवले याची खंत सलत होती.
परंतु जत्रेच्या दाराजवळ भिक मागणारा भिकारी आणि जत्रेतील
 प्रत्येक स्टॉल मालक यांना मात्र फक्त फायदाच होत असावा.कारण त्यांचे चेहरे कायम आनंदीच होते.
        याच  विचारात मी तेथून बाहेर पडलो.समोर पुन्हा भिडे पूल होता...घरी निघायचे यासाठी मी खिशात ठेवलेल्या गाडीच्या किल्ली साठी हात नेला आणि "चला उठा...रात्री विनाकारण जागरणं करायची मग सकाळी जाग येत येत नाही...मग अंघोळीला बरोबर घाई होते" असा आईचा गोड आवाज कानावर आदळला....ताडकन जागा झालो...
    घड्याळात ८ वाजून गेले होते....उठण्याशिवाय गत्यंतर नव्हते...






         




                                                                                                                               हृषीकेश पांडकर
                                                                                                                                (१४-०२-२०१२)

3 comments:

  1. एकदम झकास लिहिलं आहेस...तुझ्या कल्पनाशक्तीला ला माझा सलाम!

    ReplyDelete
  2. ghadlelya ghatananwar lihine sope .. Kalpanik goshtinwar lihine avghad ... tula saglyach avghad goshti jamtat .. he pan jamlay .. mast mast ... Firvun aanlas !!

    ReplyDelete
  3. Jatrechi safar lai jhakas jhali bagh ! Kalpanetil jatra khupach avadali. Sarva stall var mi pan ramun gelo. Hech ya agalya jatreche vaishishtha mhanave lagel.

    Good Article. Keep it on.

    Pradeep Mama

    ReplyDelete