Friday, April 13, 2012

निसर्गाची प्रयोगशाळा

           समुद्र झाला,बर्फ झाला,डोंगर झाले,वाळवंट झाला आता वेळ होती जंगलाची...

          प्रत्येक वेळी निष्कर्ष एकच होता निसर्ग आणि माणूस यांच्या पारड्यामध्ये  पुन्हा एकदा निसर्गाचे पारडे खूप खाली गेले होते.

        १५ वर्षापूर्वी पिंजर्यात ठेवलेले वाघ हत्ती खूप पहिले. तारेच्या कुंपणात केविलवाणी ८/१० हरणे खूप वेळा पहिली त्याच बंदिस्त पाण्यात सुस्त पडलेली मगर पहिली होती.पण आज मी पिंजर्यात होतो आणि ते मोकळे होते .आज त्यांच्या homeground वर match होती.  
    
        ऑफिसची सुट्टी,bookings चा खटाटोप,प्रवासाचे सोपस्कार यांचे स्पीड ब्रेकर ओलांडून गाडीने जेव्हा 'Nagarahole National Park A Tiger Sanctury ' च्या कमानीत प्रवेश केला तेव्हाच निसर्गाच्या अजून एक अविष्कार माझ्यासमोर उलगडायला सुरुवात झाली होती.'काबिनी' नदीवर बांधलेल्या काबिनी धरणाच्या Back water मुळे National park चे तीन भागात विभाजन झाले आहे.आणि त्यातीलच एक म्हणजे Nagarhole National Park.
        Resort,Lodges,Hotels मध्ये check-in खूप  वेळा केले आहे पण तंबूतील check-in पहिल्यांदाच केले.
        त्या रस्त्यावरून तंबूपर्यंत चालत असतानाच मी इतका भांबावून गेलो होतो कि या पेक्षा काय वेगळा निसर्ग आपण पाहू शकतो याचे कोडेच मला उलगडेना.समोर पसरलेले पाणी,दृष्टीच्या दोन्ही बाजूस घनदाट झाडी.आणि झाडाआड लपलेले आमचे तंबू.





         तंबू मध्ये सामान ठेऊन बाहेर खुर्चीत येऊन बसलो.आणि निसर्गाची मजा बघा,४ तासाच्या कार प्रवासात असलेले उन सूर्यावर चादर घालावी तसे नाहीसे  झाले होते.ऐन एप्रिल महिन्यात आभाळ भरून आले होते.सूर्यास्ताला अवकाश होता पण ढगांनी पावसाचे संकेत आधीच  दिले होते.पण 'आत्ता कसला आलाय पाऊस' या कॅलेंडरच्या ऋतुंमध्ये अडकलेल्या आमच्या सारख्यांना तो निसर्गाचा यॉर्कर कधीच समजला नव्हता.दोन तंबूंमध्ये असलेल्या जागेमध्ये पानझडीमुळे गळलेल्या  पानांचा गालीचा तयार झाला होता.
           याचवेळी काबिनी धरणाच्या back water मधील Wild life पाहण्यासाठी आम्हाला निघायचे होते.आमच्या बोटीत एकूण १६ लोक होते ज्यामध्ये आम्ही चौघे,अजून एक couple,७ foreigners आणि गाईड आणि नावाडी.आमची बोट किनार्यापासून सुमारे २ कि.मी लांब आली होती.चारही बाजूंनी स्थिर पाण्याने आम्ही वेढले गेलो होतो.पाण्यात अर्धवट कापलेल्या झाडांच्या खोडावर बसलेले पांढरे शुभ्र बगळे 'आम्हाला बघा' अशा अविर्भावात बसले होते.श्रीलंका आणि स्कॉटलंड वरून स्थलांतरित झालेले पक्षी किनार्यावर शोभेच्या वस्तूंप्रमाणे मांडून ठेवलेले होते.



             सूर्य आपले अस्ताला जाण्याचे काम चोख बजावत होता.हवेतील गारवा सूर्यप्रकाशाला 'Indiarect Proprtion' मध्ये होता.तेवढ्यात नदीत असलेल्या छोट्या बेटांवर हत्तींचा कळप नजरेस पडला.आणि त्या पेशवे बागेतील हत्ती पहिल्यांदा पाहिल्यावर जो आनंद झाला होता त्यापेक्षा जास्त आनंद आणि कुतूहल वाटले..चिखलाच्या पाण्याने मढलेले हत्ती, त्याभोवती असलेली त्यांची पिल्ले.आणि संपूर्ण वाढ झालेले ते हस्तिदंत हे पाहताना विलक्षण आनंद मिळत होता.अजून थोडे जवळ गेलो तेव्हा स्वतःच्याच अंगावर चिखल उडवणारे हत्ती कदाचित सावध झाले असावेत.पण आज त्यांना याची जाणीव असावी कि समोर कॅमेरा धरून बसलेले आपल्याला इथे काय करू शकणार आहेत? आज आम्ही त्यांच्या राज्यात होतो.




            तसेच थोडे पुढे सरकलो आणि समोर पाहतो तर एक अजस्त्र मगर नुकतीच पाण्यातून बाहेर येऊन किनार्याला निपचित पडली होती.फोटो काढण्यासाठी कॅमेरे  सरसावले.सुमारे १२ फूट तर नक्कीच असेल.आमच्या बोटीचा अंदाज आल्याने ती पुन्हा पाण्यात गेली.दृश्य इतके भारी होते मगर पाण्यात उतरत आहे आणि आम्ही देखील पाण्यात आहोत या विचाराने क्षणभर नकोसे होत होते.पण एव्हाना आमची बोट पुढे निघून गेली होती.





          आता आम्ही बरेच आत मध्ये गेलो होतो.डावीकडे आणि उजवीकडे हरणांचे कळप च्या कळप गावात खाताना दिसत होता.हत्तींच्या कळपाला बिचकून बिचारे  गवतात तोंड घालत होता.मधेच एखादा bison दृष्टीस पडत होता.असंख्य पक्षी वाऱ्याशी स्पर्धा करत होते.किनार्यावर मोर आणि लांडोर स्पष्ट दिसत होते.
आणि पुढे एका बेटावर एक सुसर तोंड उघडून बसलेली होती आणि तिच्या अंगावर दोन तीन साळुंक्या फिरत होत्या.
एव्हाना विविध रंगांच्या छटांनी संपूर्ण आकाश भरून गेले होते.मोरांचा आवाज,मध्येच माकडाचे ओरडणे आणि वार्याचा आवाज यांना छेदत आम्ही पुढे जात होतो.बोटीच्या पुढे जाण्याने पाण्यात येणारे तरंग परीघ वाढवत नाहीसे होत होते.



         आता परत फिरायची वेळ झाली होती.आम्ही बोट वळवली आणि परतीचा प्रवास सुरु झाला.वार्याचा वेग वाढला होता.आणि समोरचे ढग आता काळे होऊ लागले होते.आता पाऊस पडणार असे वाटून बोटीतील प्रत्येक जण अजून आनंदी झाला होता.आणि क्षणार्धात बारीक पावसाला सुरुवात झाली.वार्याचा वेग प्रचंड झाला होता,पाऊस भुरभूर येऊ लागला होता.नजर जाईल तिथपर्यंत नदीच होती.मध्ये मध्ये एखादे बेट दिसत होता.पावसामुळे किनार्याला असलेले प्राणी अचानक कुठेतरी दडी मारून बसले होते.आणि पावसाचा वेग देखील वाऱ्याशी स्पर्धा करू लागला,आतापर्यंत भुरभूर येणारा पाऊस चेहेर्यावर येऊन आदळू लागला.इतकावेळ दिसणारी किनाऱ्यावरची हिरवळ दिसेनाशी झाली होती.पावसाचा जोर इतका झाला होता कि पावसाचे पाणी सहज बोटीत येऊन पडत होते.बोटीतील प्रत्येक जण संपूर्ण ओला झाला होता.वर आणि पाऊस यांच्या खेळत आम्ही तुडवून निघत होतो.इतकावेळ डोळ्याला लावलेले कॅमेरे केव्हाच बोटीच्या बंद कपाटात गेले होते.पाऊस पाऊस म्हणून मगाशी  चेहेर्यावर आलेल्या आनंदाची जागा भीतीनी घेतलेली स्पष्ट पणे जाणवत होती.बोटीचे हेलकावे झुलत्या पाळण्याला लाजवतील असे होते.भिजलेला अंगामुळे थंडीनी
आपल्या सर्व मर्यादा केव्हाच सोडल्या होत्या.वार्याच्या वेगापुढे बोटीच्या इंजिनाचा थांगपत्ताही लागत नव्हता .
आता एकच उद्दिष्ट होते कि बोट फक्त एखाद्या बेटाच्या किनार्याला टेकवणे.पण वर आणि पावसाच्या इच्छेपुढे बिचारा नावाडी हतबल होता.इतकावेळ वाटणारी बोट सफारी आता suffer होऊ लागली होती.वार्यामुळे तयार झालेल्या लाटांमुळे बोट आता हेलखावे खात होती.मी सर्वात शेवटी बसलो होतो.त्यामुळे मागे असलेले मोटर  इंजिन आणि दिशादर्शक सुकाणू असून नसल्यासारखे झाले आहेत हे मला स्पष्ट जाणवत होते.आमच्या नावाड्याने कशीबशी बोट एका बेटावर लावली.पण तिथे उतरायची सोय नव्हती कारण मगाशी याच बेटावर आम्ही १३ फुटी मगरीचे फोटो काढले होते.

         या वार्यात मला पोहता येऊ शकेल का हा शेवटचा विचार मनात होता.आणि पाण्यात समजा पडलो तर मगाशी पाहिलेली मगर आणि सुसर आत्ता कुठे असू शकतील याचा विचार करण्याची देखील माझी हिम्मत होत नव्हती.
थोड्या वेळात पाऊस थांबला आणि वारा देखील जरा विसावला होता.क्षणभर आलेली डोळ्यासमोरील अंधेरी आता कमी झाल्यासारखी वाटत होती.सुकाणू आणि मोटर पाण्यात टाकून पुन्हा एकदा आम्ही परतीला सुरुवात केली.बोटीत जमलेले पाणी आधी बाहेर काढले.
        अंगावरील घातलेले सर्व कपडे ओले झाले होते.थंडीची सवय झाली होती.अंधार पडायला सुरुवात झाली होती.येताना असलेला उत्साह केव्हाच बुडून गेला होता.आधी किनार्याला पोहचू या विचारात आम्ही निघालो होतो.मगाशी दिसणारा निसर्ग आणि आता असलेला तोच निसर्ग याची तफावत डोळ्याला जाणवत होती आणि मनालाही.
        बोट व्यवस्थित पुढे सरकत होती.वार्याची जागा थंड हवेने घेतली होती.आपण कसे घाबरलो याचे वर्णन आम्ही एकमेकांना करत होतो.आता भीती जराशी ओसरली होती.किनारा जवळ येत होता.अर्ध्यातासात आम्ही किनार्याला आलो होतो.आता चेहरे पुन्हा हसरे झाले होते.अंधार आपली स्थिती मजबूत करीत होता.उतरल्यावर संपूर्ण किनार्यावर बेडकांचे साम्राज्य पसरले होते.पाणी शांत झाले होते.आजूबाजूचे प्राणी झोपेच्या ओढीने अभयारण्यात शिरले होते.नदीत असलेल्या झाडांवरील पक्षी उडून केव्हाच पसार झाले होते .आम्ही आमची life jackets काढून परत केली.वाटेत असलेले बेडूक चुकवत आणि निसर्गाच्या या खेळीचे कौतुक करत तंबूकडे परतलो.

           हवेत गारवा पसरला होता,मी आवरून पुन्हा तंबूबाहेर येऊन बसलो.हातात गरम चहाचा कप होता,पक्षांचे आवाज शमले होते,माकडांचा आवाज नाहीसा झाला होता.रातकिड्यांची पहाट झाली होती.वटवाघुळे उगीचच इकडे तिकडे फिरताना दिसत होती.मधूनच येणारा मोराचा आवाज थांबला होता....




             जंगल झोपेच्या तयारीत होते...आणि मी पण...

          दुसरा दिवशीचा सूर्यच कुतूहल घेऊन उगवला होता.आज वेळ होती जंगल आतून पाहण्याची.याआधी जंगलात जाऊन प्राणी पाहणे हि गोष्ट मी कधीच केली नव्हती.

          आवरणे,चहापाणी या गोष्टींचा वेळ सोडला तर ५ व्या मिनिटाला आम्ही गाडीमध्ये बसलो होतो.जंगलाला देखील आता व्यवस्थित जाग आली होती.मी माझे तीन मित्र  ड्रायव्हर आणि गाईड असे ६ जण आम्ही जंगला कडे निघालो.सुमारे ७ ची वेळ होती.पहाटेचे धुके आणि कालचा पाऊस याच्यामुळे हवेत गारवा आला होता.योग्य  परवानगी घेऊन आम्ही जंगलात प्रवेश केला.गर्द झाडी,दूरवर दिसणारे धुके.रस्ता नसल्यामुळे हेंदकाळत चालणारी आमची जीप आणि रात्रीच्या झोपेनंतर जागे झालेल्या पक्षांचा किलबिलाट.

        आता खर्या अर्थी जंगल सफारी सुरु झाली होती.सुरुवातीला एका प्रसन्न हरणाच्या कळपाने आमचे स्वागत केले.नेहमीच गरीब वाटणारी ती हरणे कळपाने चरत होती.जीपच्या आवाजाने त्यांचे कान टवकारले गेले खरे पण ती पळून गेली नाहीत.व्यवस्थित आणि शांतपणे चरणारी ती हरणे पाहून पेशवे पार्कातील आणि आज इथली हरणे यातील फरक मला रास्त वाटला.



          पुढे जात असताना असंख्य माहित नसलेले पक्षी नजरेस येत होते. आमचा गाईड त्यांची नावे सांगत होता.प्रचंड कमी वेगात आमची जीप पुढे जात होती.जंगल नजरेत साठवण्याचे काम मी करत होतो.तेवढ्यात आमच्या गाडी समोरून ( समोरून म्हणजे पुण्यात गाडी चालवताना सायकलवाला जसा समोर येतो तसं समोरून ) मोर  पळत गेला आणि डाव्या बाजूला जाऊन थांबला.मोरपंखी रंग हे या रंगाचे नाव याच्यामुळे पडले यावर  माझी खात्री पटली.मोराच्या मानेचा भाग आणि पिसारा इतका  जवळून पाहताना याला आपला 'राष्टीय पक्षी' निवडताना फार त्रास झाला नसेल असे मला वाटायला लागले.फुललेला पिसारा पाहायला मिळाला नाही पण मिटलेला  पिसारा घेऊन पाळणारा मोर देखील अतिशय सुंदर दिसतो हे आज पाहायला मिळाले.



       मोराचा विषय संपवून गाडी अजून थोडी पुढे गेली आणि ड्रायव्हरने करकचून ब्रेक दाबला आणि जमिनीवर बोट दाखवून पाहायला सांगितले.कोणालाही काही  सांगायची गरज नव्हती.कारण आता राष्ट्रीय पक्षानंतर पाळी होती राष्ट्रीय प्राण्याची.सुमारे साडेतीन इंचाचा वाघाच्या पावलाचा तो ठसा होता.आम्ही त्याला विचारले  कि 'कधी गेला असेल वाघ इथून ?'  तो शांतपणे म्हणाला कि ' झाला असेल अर्धातास'.मी सहज म्हणून चौफेर नजर फिरवली आणि पुन्हा एकदा त्या पंजाकडे  पहाट राहिलो.पायधूळ घ्यावी कि काय असा विचार एकदा मनात येण्याइतपत मला वाघाचे कुतूहल होते.पुन्हा एकदा ते ठसे पाहून आम्ही पुढे निघालो.




          लक्ष्मी रोड वर लोक दिसावीत तसे हरणांचे कळप दृष्टीस पडत होते.मोठी मोठी माकडे आमच्या बरोबरीने पुढे येत होती.मध्ये एखादा हत्तींचा कळप राजेशाही थाटात  सहकुटुंब सहपरिवार बांबूच्या झाडत न्याहारी करत असलेला दिसत होता.या प्राण्याचा राजेशाही तहात लगेच कळून येत होता.आपण आणि आपले खाणे या पलीकडे त्याला कशाचीही काही पडलेली नव्हती.त्यांनी आमच्याकडे पाहिले देखील नाही.

           अचानक एक जंगली कुत्र्यांची टोळी आमच्या नजरेस पडली.नेहमी टोळीने हल्ला करणारे म्हणून यांची ओळख प्रसिद्ध आहे.आम्ही तिथेच गाडी थांबवली. ड्रायव्हर ने आम्हाला शांत राहण्यास सांगितले .शेजारी असलेल्या हरणाच्या कळपावर त्या कुत्र्यांच्या टोळीने हल्ला केला आणि २ क्षणामध्ये एका हरणाची आर्त  किंकाळी कानावर आली.क्षणार्धात शांतता पसरली.इतक्यावेळ ओरडणारे माकड निपचित पडले.आणि ड्रायव्हर ने हरीण गेल्याचे confirm केले.
थोडे वाईट वाटले पण याच तत्वावर जंगल जगते याची खात्री पटली.




       एव्हाना  उन्हं डोक्यावर आली होती.पण डोक्यावरील झाडांनी याची चाहूल लागू दिली नाही. पुढे जात असताना एक भला मोठा रानगवा नजरेस पडला.गाडीच्या उजव्या बाजूला असलेला गवा मोठ्या दिमाखात समोरून चालत डाव्या बाजूला गेला.महाकाय असलेला गवा चालत असताना आमच्या तोंडातून एक शब्द देखील फुटला नाही.सुमारे १० फुट लांब आणि साडेतीन फुटी रुंद असा तो देह समोरून चालत असताना कॅमेर्याचे बटन दाबण्या खेरीज आमच्याकडून काहीही घडले नाही.



        तिथून पुढे निघालो पाणवठ्यावर हत्तींचा कळप विसावला होता.मधूनच एखादी जंगली कोंबडी आपले अस्तित्व स्पष्ट करीत होती.जिथे जिथे पाणी दिसेल तिथे तिथे  बदक आणि बगळे आपली हजेरी लावत होते.
पक्षांचा किलबिलाट,माकडाचे ते typical ओरडणे,जंगली खारीचा तो बसका आवाज याने जंगलाची शांतता विस्कळीत होत होती.
        काही वेळात आम्ही जंगलाबाहेर पडलो.फोटो काढणाऱ्यांचे कॅमेरे भरले होते.माझे मन भरले होते.ज्या गोष्टी साठवता येतील त्या घेऊन मी जंगलाबाहेर पडत होतो.
       वाघ बघायला मिळाला नाही याची खंत सलत होती.पण हल्ली फोन करून कोणाच्या घरी गेलो तर ती लोक भेटतील याची खात्री नाही देता येत.इथे तर आम्ही त्यांच्या घरी न सांगताच गेलो होतो.
        का कोण जाणे पण बाहेरील डांबरी रस्त्याच्या आरामदायी प्रवास जंगलातील खडबडीत रस्त्याइतका सुसह्य वाटत नव्हता.

        प्राण्यांच्या राहणीमानाचा हेवा करत आम्ही पुन्हा आमच्या तंबूत परतलो, आता जंगल सोडायची वेळ आली होती.निसर्गाच्या या चमत्काराचा निरोप घ्यायची अजिबात इच्छा नव्हती.

      सामान गाडीत भरले आणि निसर्गाच्या प्रयोगशाळेतून बाहेर पडलो...








      अभयारण्याची हद्द सोडली आणि highway वर आलो...मागे हिरवा निसर्ग हसत होता..आणि पुढे उन्हाने तापलेल्या डांबरी रस्त्यावरील मृगजळ....


                                                    
                                                                                                 फोटोस - गंधार पारखी

                                                                                                 - हृषीकेश पांडकर
                                                                                                 १३-०४-२०१२


Friday, March 9, 2012

खरच...तो फक्त द्रविडच होता....





पृथ्वीतलावर गुरुत्वाकर्षणाचा नियम लागू होणारे सर्वच आहेत...
पण क्रीजवर मात्र चुंबकत्वाचा नियम लागू होणारा द्रविडच होता...

 One down Batsman कसला हो हा ???
 पहिल्याच drinks break ला हजेरी लावणारा हा द्रविडच होता...

दुसरी इंनिंग असताना उन्हामध्ये लेग स्टंप मागून...
Night  Watchman ला पाठीमागे लपवून दिवस वाचवणारा हा द्रविडच होता...

खूप वेळा वाटायचे याचा नंतर सचिन आहे batting  ला ....
पहिली wicket गेल्यावर दुसरी विकेट लगेच पडावी...

 पण असे कधीच वाटले नाही कि द्रविड आउट व्हावा.
का कोण जाणे सचिन असूनही नेहमी वाटायचे द्रविड असावा बाबा ...

 सचिनच्या विश्वासावर बोट नव्हते..
 पण द्रविडच्या खंबीरपणावर  हृदय होते....

समोरच्या टीमच्या  धावांचा डोंगर पाहिल्यावर 
विश्वासाचा पहिला शिलेदार द्रविड होता....

स्लीप मधला catch म्हणल्यावर bowler चे नाव पुरेसे होते
 कारण catch घेणारा द्रविडच होता....

दही हंडी फोडणारा जरी वेगळा असला ...
तरी पहिल्या वर्तुळात पाय रोवलेला द्रविडच होता....

नवीन कोर्या लाल Ball ला शाइन करणारा....आणि..
नवीन कोर्या लाल Ball ची शाइन घालविणारा देखील द्रविडच होता....

सचिन,सौरव,VVS च्या विक्रमांच्या ...
धगधगत्या मशालीचे तेल द्रविडच होता....

Captain,keeper,opener,hitter...
टीम च्या प्रत्येक हाकेला ओ देणारा द्रविडच होता....

Taunton,Eden,Leeds,Lahore .....
साथीदाराच्या  यशात झाकोळला गेलेला द्रविडच होता....

'Bradman Oration' ला अभिमानाने आणि 
WC पराभवाची जबाबदारी स्वीकारून धीराने बोलणारा देखील द्रविडच होता....

मोहाली,मोटेरा किव्वा  मेलबोर्न...
टीम चे जहाज किनार्याला लावणारा 'Captain' द्रविडच होता....

१६ वर्षापूर्वी घातलेले पांढरे शुभ्र कपडे....
१६ वर्षानंतर उतरविताना देखील पांढरेशुभ्र ठेवणारा...द्रविडच आहे..

|| कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ||

अर्जुनापेक्षा हे वचन ज्याने सर्वात जास्त पाळले असेल 
तर तो फक्त राहुल द्रविडच होता...आहे ...आणि राहीलही....

                                                            - हृषीकेश पांडकर
                                                             ०९-०३-२०१२  

Wednesday, March 7, 2012

माझे जीवन गाणे ...

         "गुरुवार"  ..वार जरी दत्ताचा असला तरी मात्र 'लाईट नसणे' हा प्रश्नच आमच्या समोर दत्त म्हणून हजर असतो.थोड्या फार प्रमाणात हा प्रश्न कमी झाला आहे.असे  वाटत असतानाच परवाच्या गुरुवारी लाईटच्या 'जाण्याने' धक्का बसणे हे मी पुन्हा अनुभवले ..Invertor, battery backup,solar backup यांनी केव्हाच हात वर  केले होते..Laptop असल्यामुळे "लाईट नाहीत" याचा आनंद फार काळ  टिकला नाही.आणि शांततेत कामाला पूर्ववत सुरुवात झाली.Server चा आवाज,लिफ्ट चा आवाज या आवाजाची अनुपस्थिती सुसह्य वाटत होती.मी सहज म्हणून माझ्या फोन मधला FM चालू केला आणि earplugs लटकावून कामाला लागलो.मी शक्यतो असे गाणी ऐकत बसलोय असे घडत नव्हते पण एवढ्या शांततेत तेवढाच टाईमपास म्हणून मी रेडीओ ऐकायचे ठरवले होते. मात्र पुढचे सुमारे साडेतीन तास मी एका वेगळ्याच विश्वात गेलो.सर्वसाधारणपणे पुण्यामध्ये ६/८ music stations आपण व्यवस्थित ऐकू शकतो.ज्याला 1500 रुपयांचा फोन  आणि ८५ रुपयाचा ear plug खूप पुरून उरत होता.
        मी संध्याकाळी घरी आलो,आणि आवरून जिम मध्ये गेलो.व्यायाम करत असताना माझ्या शेजारी माझा  मित्र trademill वर पळत असताना earplug लावून गाणी ऐकत असल्याचे मी पाहत होतो ,जिम झाल्यावर मी त्याला विचारले कि तुझ्या ipod वर तू किती गाणी टाकली आहेस आणि किती बसतात ? मोठ्या अभिमानाने त्याने Ipod माझ्या हातात ठेवला,मला म्हणाला कि 'सध्या २०० गाणी आहेत आणि अजून हजार दीड हजार सहज बसतील.मी चांगली, नवीन selected गाणी टाकली आहेत'.मी हसलो आणि त्याला विचारले कि 'अरे म्हणजे तुला कुठली गाणी लागणार आहेत हे माहित असणार' ? तो यावर म्हणाला  'म्हणजे काय...मीच तर टाकली आहेत...सगळी आवडीची आहेत रे..' मी हसलो..त्याला ipod परत केला..आणि घरी मार्गस्थ झालो...अर्थात मी त्याच्यावर हसलो  नव्हतोच...
         रात्री अंथरुणावर आल्यावर दुपारचा आणि संध्याकाळचा प्रसंग एखाद्या डासासारखा माझ्याभोवती गुणगुणत आला.मी सहज दुपारचा प्रसंग आणि संध्याकाळचा प्रसंग compare केला होता..
         दुपारी मी FM ऐकत होतो.तेव्हा मला अजिबात कल्पना नसायची कि पुढचे गाणे कोणते आहे.फक्त ऐकत राहणे हे एकच काम होते.. दुपारचे ३ तास मी वेगळ्याच विश्वात होतो हे सांगायचे मुख्य कारण हेच होते.गाण्याची आवड निवड हा वेगळाच मुद्दा आहे.पण आठवणीतील गाणी हि गोष्ट मात्र सगळ्यांना नक्कीच  लागू होते.भले ती आठवण चांगली असो किवा वाईट.असे बरेच प्रसंग एखाद्या गाण्यामुळे आयुष्यभर कायम लक्षात राहतात.काही अशी गाणी आहेत जी अचानक कानावर आली कि आपल्याला एखाद्या जुन्या वेळेची आठवण होते.काही गाणी अशी असतात कि ती ऐकल्यावर अगदी तोच क्षण देखील आहे तसा आठवतो.'तू चीज बडी हे मस्त मस्त' हे गाणे मी ऐकलं आणि  'एक से बढकर एक' नावाचा गाण्यांचा कार्यक्रम जसाच्या तसा डोळ्यासमोर आला.आता तस पहायला गेला तर फार  काही विशेष कार्यक्रम नसेलही  कदाचित पण या ४ मिनिटाच्या गाण्याने संपूर्ण उजळणी करून दिली.हीच गत झाली 'हमसे हे मुकाबला' मधील 'मुकाबला' या  गाण्याची, हे गाणे ऐकले आणि थेट 'फिलिप्स Top 10' आठवले, कारण या गाण्याचे lyrics कधीच समजले नव्हते आणि तेव्हा या कार्यक्रमात खाली lyrics लिहून यायचे.त्यामुळे गाणे ऐकणे आणि पाहणे या पेक्षा Lyrics वाचणे हा कार्यक्रम असायचा. हे गाणे ऐकल्यावर पुन्हा भूतकाळात येऊन विसावलो होतो.
काही गाणी आणि प्रसंग याचा ताळमेळ काहीच नसतो पण त्यांचा संबंध का लागतो याचे कोडे उलगडत नाही पण ते गाणे ऐकले कि क्लिक करावे तसे आपण भूतकाळात त्या प्रसंगाच्या फोल्डर मध्ये येऊन पडतो एवढे मात्र नक्की.
      'स्वदेस' मधील "ये तारा वो तारा " हे गाणे मी आत्ता जरी ऐकले तरी मी त्या दिवाळीच्या दिवशी आम्ही japanese group भेटलो होतो हे मला का आठवते. आणि ते सुद्धा ठिकाण,वेळ,लोक यांच्या संपूर्ण तपशीलासाहित.रणरणत्या उन्हात देखील 'कहो न प्यार है' मधील ती दोन गाणी ऐकली कि  मी direct ' हिमालयातील पिंडारी' Glaciour वर जाऊन का पोहोचतो."चक दे इंडिया" चे Title song ऐकल्यावर भले आज भारत डावाने हरला असेल तरीही मी मात्र कोकणातील मित्राच्या घरी पाहिलेल्या आणि आपण जिंकलेल्या २०-२० विश्वकरंडकाच्या फायनलच्या आठवणीत का रमतो.
   या ५ मिनिटाच्या गाण्यात एवढी ताकद असते का या वर माझा अजूनही विश्वास बसत नाही.

         एखादे गाणे ऐकले कि मी direct मित्राच्या लग्नात जाऊन पोहोचतो.आणि लग्नात नाही बरका, लग्नाला जाताना केलेल्या बस च्या प्रवासात जाऊन पोहोचतो.आणि मग तो बस चा प्रवास,ते रूम वरचे राहणे,मित्राचे लग्न,लग्न असूनही हॉटेल मध्ये केलेले जेवण आणि परतीचा प्रवास या गोष्टी आपसूक माझ्या  डोळ्यासमोरून जाण्याची भूमिका न चुकता बजावतात.काही वेळेला तर एखादे गाणे आपल्याला एका विशिष्ट क्षणाची आठवण करून देतात म्हणजे ते गाणे ऐकले  कि मला फक्त, मी कुठे उभा होतो माझ्या समोर काय दिसत होते याचीच फक्त आठवण करून देते.म्हणजे मी ते गाणे ऐकले कि मी direct 'रानडे institute ' च्या  canteen मध्ये सगळ्यात उजवीकडच्या खुर्चीत बसलोय आणि समोर FC road झाडाच्या फांद्यांमधून दिसतोय एवढंच फक्त आठवते.
       एखादे गाणे मला कुठेही असलो तरी आमच्या नवीन गाडीच्या माझ्या पहिल्या राइड ची आठवण करून देते.म्हणजे भले मी रस्तावरून चालत असीन आणि मी ते गाणे ऐकले तर मला नकळत आमच्या गाडीतूनच जावे लागते.....किमान 5 मिनिटे तरी.
        भले मी आत्ता ५४ इंची ' home theater ' वर इंग्लिश सिनेमा पाहत आहे आणि अचानक कुठून तरी 'भोली भाली लडकी' हे गाणे मी ऐकले तर मी थेट ५४ वरून १४ इंची ' black n white ' टीव्हीवर जातो...टीव्ही वर असलेले मोट्ठे आवाजाचे बटन मला आवाज वाढविण्याची साद घालतात..आत्ताच्या हातातल्या रिमोट चे काय घेऊन बसलाय.
             बर प्रत्येक वेळी गाण्यामुळे जुन्या आणि छान आठवणींना उजाळा मिळेल असेही नाही.एखाद्या आनंदाच्या क्षणी मी ते गाणे ऐकले मी direct 'Dukes Nose ' च्या  ट्रेक ला गुडघा दुखावल्याने दोन मित्रांचा आधार घेऊन चालतोय याची आठवण करून देते.पण म्हणून ते गाणे ऐकूच नये असे मला कधीच वाटले नाहीये.कारण ती ५ मिनिटे मला तो संपूर्ण ट्रेक, तो पाऊस, तो ट्रेन प्रवास आणि तो लंगडत तुडवलेला लोणावळ्याचा रस्ता या गोष्टीनी न्हाऊ घालते.
         एखादे गाणे थेट दिवाळीच्या सुट्टीत केलेल्या किल्ल्यावर नेऊन सोडते.आता ते गाणे मी तेव्हा किल्ला करताना ऐकले होते कि काय हे मला आठवत नाही पण ते गाणे आत्ता कानावर आले कि मी थेट आमच्या galery मध्ये केलेल्या किल्ल्यावर जाऊन थांबतो.
          गाण्याचे lyrics या गोष्टीला कारणीभूत असेल..असेही नसावे कारण अहो इयत्ता ४ / ५ मध्ये 'उर्वशी' सारख्या गाण्याचे lyrics समजल्यामुळे लक्षात राहिले असे होणे किमान माझ्यासाठी तरी शक्य होते असे मला प्रामाणिक पणे वाटत नाही.पण अजूनही उर्वशी हे गाणे ऐकले कि मी मला आमच्या घरासमोरचा चिखलाने माखलेला  रस्ता आठवतो.कारण तिथे डांबरीकरण झाले नव्हते.पण आता हे गाणे आणि तो रस्ता याचा संबंध काय असेल याचा विचार करण्यापेक्षा 'आत्ताचा रस्ता तेव्हा असा दिसत होता होय' या आश्चर्याने त्या वेळेचा आनंद लुटतो.
         अश्या अनेक गोष्टी मला अनेक क्षणांची आणि प्रसंगांची  आठवण करून देतात.कदाचित मला जसे गाण्याबद्दल असे वाटते तसेच कदाचित सगळ्यांचे असेलही.याला कारण काय असेल हे शोधण्यात मला काडीमात्र रस नाहीये.पण आश्चर्य नक्की आहे.पण प्रत्येक कुतूहल उलगडून बघायची गरज असतेच असे नाही.
          आता रात्रीचे बरेच वाजून गेले होते...आणि मी या निष्कर्षावर पोहोचलो होतो कि ipod वर गाणी ऐकणे किव्वा FM वर गाणी ऐकणे यात फरक एवढंच आहे कि iPod मध्ये कोणती गाणी लागणार आहेत हे त्याला आधी माहित होते पण तसे FM चे होत नाही...आणि त्यामुळेच कदाचित अनपेक्षित लागलेल्या गाण्यामुळे भूतकाळात  जाण्याचा माझा आनंद जास्त होता..

           अर्थात यात कुठेही तुलना नाहीये.पण अचानक एखादे ऐकलेले गाणे आपल्याला भूतकाळातील एखाद्या ठराविक आठवणीवर नेऊन सोडते.म्हणजे ५ मिनिटाचे  गाणे आपल्या आयुष्यातील कित्त्येक आठवड्यांचा,महिन्यांचा आणि वर्षाचा देखील काळ एका क्षणात rewind करतात.

....आणि याच विचारात माझ्या झोपेने माझ्या डोक्यातील विचारांचा ताबा घेतला ...

कदाचित आयुष्याच्या पुस्तकात हि गाणी Bookmarkचे काम करतात कि काय असे मला नेहमी वाटते...

                                                                                                                                  हृषीकेश पांडकर
                                                                                                                                  ( ०७-०३-२०१२ )