Thursday, August 29, 2019

Risking life for living life... !

'कामाला बाहेर पडताना हेल्मेट घालून बाहेर पड' हे वाक्य तसं कोणालाच नवीन नाही. वाढती वाहतूक,अपघाताची भीती आणि आपण कितीही काळजीपूर्वक गाडी चालवत असलो तरी दुसऱ्याच्या चुकीने होणारे अपघात या आणि अशा अनंत बाबी लक्षात घेऊन जवळच्या लोकांकडून आलेले 'कामाला बाहेर पडताना हेल्मेट घालून बाहेर पड' हे काळजी वाहणारे वाक्य. कामाला येणे-जाणे हे मूळ कामापेक्षा जिकिरीचे वाटू लागले आहे. हि सध्याची वस्तुस्थिती.आणि याच वस्तुस्थितीला अंगवळणी पडतच हल्लीच्या कॅलेंडरची पाने उलटली जात आहेत.

तर हे आपले काम किती दमवणारे आहे आणि वाहतूक,गर्दी,खराब रस्ते त्यात पाऊस या गोष्टींना सामोरे जात आपण हे समर्थपणे निभावतोय अशी भावना मनात येत असतानाच हे वरचे दृश्य माझा डोळ्यासमोर होते.

 

फोटो पाहताना मिळणारे समाधान या फोटो मागच्या वास्तवाची जाणीव झाल्यावर भीषण वाटू लागते.हा फोटो भारताच्या पूर्वेला असलेल्या जगातील सर्वात मोठ्या खारफुटी जंगलातील आहे.बंगालच्या उपसागराच्या मुखाशी असलेला गंगा,ब्रह्मपुत्रा आणि मेघना या नद्यांच्या त्रिभुज प्रदेशात वसलेल्या सुंदरबन या जंगलातील हे दृश्य..

मी प्राणी पक्षांच्या शोधार्थ निवांत बोटीवरून फिरत होतो.समोर ही छोटी नाव आडवी आली.खाडीचा भाग असल्याने लाटा अजिबात नव्हत्या.पण वाऱ्याच्या मंद वेगासोबत पाण्यावर येणाऱ्या हलक्या तरंगामुळे किंचित हेलकावे घेणारी ही नाव मजेशीर वाटत होती.अथांग खाऱ्या पाण्याचा रत्नाकर आणि निमुळत्या वाटेने जमिनीवर घुसलेले पाणी यामुळे तयार झालेला हा खाडीचा प्रदेश.नद्यांनी वाहून आणलेल्या गाळामुळे संपूर्ण पसरलेली दलदल आणि या दलदलीवर असलेले हे खारफुटी जंगल.

मासेमारी हा इथला मुख्य व्यवसाय.किनाऱ्यालगतचे मासेमार स्वतःची छोटी नाव घेऊन या खाड्यांमध्ये आपली जाळी टाकतात आणि हीच यांची उपजीविका.खाड्यांमधून फिरताना अनेक झाडांवर लाल फडके बांधलेले दिसते. याचा अर्थ असा की या जागेवर वाघाने माणसावर हल्ला केला आणि यात माणसाने आपला जीव गमावला आहे.हेच मासेमार जे आपल्या पोटाची खळगी भरायला इथे येतात ते या वाघाच्या हल्ल्याचा बळी ठरतात.आता पर्यंत अनेक लोकांनी आपले प्राण यात गमावले.अनेक ठिकाणी बांधलेली ही लाल फडकी त्या भयानक हल्ल्याची जाणीव करून देतात.

या जीवघेण्या रोजनिशीच्या तुलनेत आपला कामावर जाण्याचा प्रवास नक्कीच सुखकर आणि सुरक्षित होता आणि आहे याची पदोपदी खात्री वाटत होती.दलदलीच्या किनाऱ्याला बोट थांबवून लावलेले जाळे काढताना अनेक माणसांवर पाठीमागून वाघाने हल्ला केल्याच्या घटना इथे घडल्या.काही वेळेस तर चालत्या नावेत झेपावून डोळ्यादेखत माणसे ओढून नेली गेली हि सुंदरबनची वस्तुस्थिती.

तिऱ्हाईत पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे सुंदरबन तितकेच रहस्यमय देखील आहे हेही तितकेच खरे.मनुष्य भक्षक वाघाची दहशत अजूनही येथे अनुभवायला मिळते.अर्थात याचे प्रमाण आता काहीसे कमी झाले आहे. स्थानिक लोकांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती काळजी वन विभागाकडून घेतली जातीये.

असो, लिहिण्याचा खटाटोप या करीत कि पोटापाण्यासाठी करावी लागणारी मेहनत आपण ज्या तोऱ्यात सांगतो, वाहनांची गर्दी, धूळ, खड्डे, पाऊस आणि अंतरे या गोष्टी आपण नेहमी सांगतो त्या तुलनेत या मासेमारांच्या दिनचर्येचे अप्रूप आणि कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही.

फोटोतील समाधानामागे असलेली भीषणता हीच येथील स्थानिकांची दिनचर्या आहे.

निसर्गाच्या सौन्दर्यासोबत उलगडत जाणारी रहस्यमयता अनुभवण्याची संधी मिळाल्यास अजिबात सोडू नका कारण जंगल या शब्दासोबत आपण रंगवलेले चित्र या सुंदरबनाच्या बाबतीत सर्वार्थाने भिन्न वाटत राहते.

 

ह्रिषीकेश पांडकर

२९-०८-२०१९

 

Sundarban | India | August 2019

 

No comments:

Post a Comment