Thursday, June 24, 2021

हुलकावणी ते गवसणी ..

हरण्याचं दुःख कोणाला होत नाही ? तो ही एखाद्या विश्वकरंडकाचा अंतिम सामना. दुःख आहेच. आपला संघ चांगला खेळाला नाही, मोक्याच्या क्षणी कच खाल्ली, फलंदाजांनी अपेक्षाभंग केला,झेल सुटले, हवामानाचा अंदाज कदाचित चुकला आणि अशी अनंत कारण देता येतील. पण या दुखापलीकडे देखील एक सुखावह गोष्ट आज जाणवली ती म्हणजे न्यूझीलंड सारख्या संघाचा मोठा विजय.

सय्यमी आणि सरळ कर्णधार केन विलियम्सनच्या संघाचा विजय हा आपल्या पराभवावर फुंकर मारणारा ठरला. २०१९ च्या विश्वकरंडकाच्या अंतिम सामन्यात केवळ बाह्य नियमांचा फटका बसून एका मोठ्या स्वप्नपूर्तीपासून वंचित असलेला संघ तितक्याच जिद्दीने आणि जोमानं आज टेस्ट चॅम्पियनशिप मिरवतोय ही गोष्ट खूप सुसह्य वाटतीये.


 

जितका आनंद आपण जिंकल्यावर झाला असता तितकाच आनंद न्यूझीलंड जिंकल्यावर झाला अशातला भाग नाही पण तुल्यबळ संघ जिंकला आणि किंबहुन खऱ्या अर्थी वरचढ संघ जिंकला हे महत्वाच. याच जागी आपल्या विरुद्ध ऑस्ट्रेलिया किव्वा इंग्लंड जिंकले असते तर त्याचे कौतुक मला इतके नक्कीच वाटले नसते. पण २०१९ च्या फायनलची सल आज किवींनी भरून काढली याचा आनंद जास्त.

धावा,बळी, शतके या तांत्रिक गोष्टींचा विचार मी करतच नाहीये पण एक संघ म्हणून न्यूझीलंड जिंकले याचे समाधान आहे.कुठलाही गाजावाजा न करता फायनलला आलेला संघ. स्टार प्लेयर अशी बिरुदावली मिरवणारा एकही खेळाडू संघात नाही तरीही खेळाच्या तीनही अंगात मजबूत आयुध बाळगणारा संघ.

हातातोंडाशी आलेला यश केवळ नशिबात नसल्यामुळे हुलकावणी देऊन जातं आणि त्यात यत्किंचितही खचून न जाता त्याच अपयशातून भरारी घेत त्याच तोडीच्या स्पर्धेत विश्वविजेतेपद मिळवणे हा प्रवास नक्कीच सोपा नसणार.

आपल्या पराभवाची सल व्यक्त करत बसण्यापेक्षा समोरच्या संघाच्या जिद्दीचे कौतुक आणि विजयाच

अभिनंदन

करणे रास्त वाटले म्हणून हा लेखन प्रपंच.पांढऱ्या स्वच्छ पोशाखातील अनभिषिक्त सम्राट आणि खऱ्या अर्थी सिकंदर ठरलेल्या विलियम्सन आणि त्याच्या सर्व वीरांचे मनापासून कौतुक आणि

अभिनंदन

...

तेव्हा पराभव ओशाळला होता..आज विजयाला अभिमान वाटला असणार यात शंका नाही !!!

हृषिकेश पांडकर

२४.०६.२०२१

 

Friday, May 7, 2021

हुलॉक गिबन

 ज्याच्या शेंडीला पावशेर तूप असतं ते माकड. ज्याला शेपटीच नसते ते हे वानर. वानर आणि माकड हे दोन वेगळे विषय आहेत हे समजायला मला तसा बराच वेळ गेला. अर्थात हा फोटो काढायच्या बऱ्याच आधी तो फरक समजला होता पण प्रत्यक्ष वानर पहायची ही माझी पहिलीच वेळ. 


 

मनुष्यप्राण्याच्या जातकुळीतीलच हे दोन्ही जीव.वानराला शेपटी नसते आणि माकडाला ती असते. त्यामुळे माणसाच्या जवळ जाणारा या दोघांमधला प्राणी म्हणजे वानर असं म्हणायला हरकत नाही.

वरील फोटोमध्ये असलेले वानर हुलॉक गिबन या नावाने ओळखले जाते. भारतात सापडणारी एकमेव वानराची प्रजाती. भारताच्या उत्तरपूर्वेला असलेल्या सात बहिणींना कधी भेट देण्याची संधी मिळाली तर या वानराची सुदधा भेट घ्या.

याच्या हातांची लांबी ही पायाच्या लांबीच्या साधारण दुप्पट असते. तोल सांभाळण्याचे काम जसे माकड आपल्या शेपटीने करतात साधारण तसेच काहीसे हे हुलॉक गिबन आपल्या हाताने करतात. लटकत अंतर कापणारी काळी वानरं हिरव्या झाडांवर मजेशीर दिसतात.

चेहेऱ्यावर असलेली पांढऱ्या रंगाची किनार एखाद्या मुखवट्या सारखी भासत राहते. नर आणि मादी यांच्या रंगात जरी काहीसा फरक असला तरी चेहेर्यावरील हा मुखवटा दोघांनाही तसाच असतो.यांची अजून एक मजेशीर बाजू म्हणजे गाणं म्हणल्यासारखा केला जाणारा आवाज. आवाजाच्या वेळा इतक्या ठरलेल्या असतात की कोंबड्याच्या बांगे प्रमाणे यांचा आवाज देखील वेळ सांगण्यासाठी होत असे अशी माहिती समजते.

जंगलातील उंच आणि भरगच्च झाडाच्या शेंड्यावर लोम्बकळात खेळणारी ही वानर पहायला मिळतात. माकडं जशी खाली जमिनीवर पण सहज दिसतात तशी ही वानरं खाली दिसणं तसं दुर्मिळच.

आसाम मध्ये गिबन अभयारण्य नावाचे स्वतंत्र अभयारण्य आहे जिथे हा जीव पहायला मिळतो. मात्र वर काढलेला फोटो हा काझीरंगा अभयारण्यातील आहे. काझीरंगा अभयारण्याला स्पर्शून जाणाऱ्या महामार्गावरून जाताना जर नशिबाने साथ दिली आणि नजर जाईल तिथपर्यंत पसरलेले चहाचे मळे पहाण्यातून वेळ झाला तर झाडावर बागडणारे हे गिबन सुद्धा दिसू शकतात. त्यामुळे अगदी अभयारण्य असे नाही पण बाकीच्या गोष्टी पाहण्यासाठी इथे जाणे झाले तर हा माणसाचा पूर्वज नक्की पहा.

हृषिकेश पांडकर

०७.०५.२०२१

We admit that we are like apes, but we seldom realize that we are apes.

Hoolock Gibbon | Assam, India | Mar '21

 

Thursday, April 29, 2021

माझ्या डायरीचे पान...

 कालच्या पावसात गारांच्या तडाख्यात निखळलेले माझ्या डायरीचे पान...

----

मोदी,शहा,महाविकास,डावे,उजवे,राजकारण,समाजकारण,अर्थकारण आणि मीडिया यांच्या पालिकडला करोना..

सध्या सकाळ होते ती झोप पूर्ण झाल्यामुळे कारण उठून घाईने करण्याची काम सद्ध्या थंड झालीयेत. ग्राउंडला चालायला,व्यायामाला किव्वा टाळ्या देऊन नुसत्याच गप्पा मारणाऱ्यांची वर्दळ नसते ना. डबा, दात घासणे आणि चहा झाल्यावर घरून ऑफिसचे काम याखेरीज दिवसातले काही शिल्लक नसते.

पेपर वाचायचा छंद चिंटू आणि शेवटचे खेळाचे पान इतकाच मर्यादित होता. सचिन रिटायर्ड आणि चिंटू मोबाईल वर आल्यावर रद्दी विकणे यापलीकडे पेपर हाताला लागला नाही. त्यामुळे चहा घेत घेत छान पेपर वाचणे वगरे शौक कधीच नव्हते.

दिवसभरात फेसबुक,इन्स्टाग्रामवर, ट्विटर, व्हाट्सएप आणि इथून तिथून येणाऱ्या करोनाच्या बातम्या हे समांतर आयुष्यासारखं चालू आहे. कदाचित करोना हा विषय अजूनच अंगावर यायचं कारण म्हणजे या बेंबीच्या देठापासून ओरडत सुरू असलेल्या, बऱ्याच वेळा असंबद्ध आणि सतत नकारात्मक गोष्टी वाजवून सांगणाऱ्या बातम्या. एखादी गोष्ट माहीत होण्यापेक्षा मनस्ताप व्हायची शक्यता अधिक..असो हे पाहणं टाळतोय..तुम्ही सुद्धा प्रयत्न करा.

प्लास्मा, रक्तदान, ऑक्सिजन, बेड ची व्यवस्था, रिपोर्ट, आर टी पी सी आर, आयसोलेशन, मास्क, सॅनिटायझर, वॅक्सिन, डोस यापैकी एखादा शब्द स्क्रीन वर सहज वावरतोय. लोकांच्या जुन्या सहलींचे फोटो 'टेक मी देअर', सी यु सून' या ओळी पांघरून पुन्हा पुन्हा येतायत. घरपोच डबे, घरपोच भाज्या, घरपोच औषधे सेवेला तत्पर आहेत. कोणी स्वच्छ मनाने आणि काळजीपोटी सेवा देतंय काही तिथंही खिसा भरत आहेत.

केंद्राचं चुकलं, राज्याचं चुकलं, कोणी कसं लुटलं, कोणाचं कसं पटलं, कोण कसं सुटलं, कोणाचं बिंग फुटलं, सरकारने असंच का रेटलं याचे हिशोब जमवता जमवता सामान्य मतदारांच्या माथ्यावरच आभाळ तेवढं फाटलं.

गेल्या वर्षी रुग्णांच्या बातम्या लांबून यायच्या आज जवळचेच रुग्ण होतायत. प्रश्न जवळ लांबच्यांचा नव्हताच कधी पण विस्तव जवळ आल्याखेरीज त्याची धग जाणवत नाही हा त्यातला भाग. आता आपलेच होरपळत आहेत त्यांच्यावर पाणी टाकावं की बाकीची आग विझवावी.

कुंभमेळा कशासाठी, निवडणूका का, लॉकडाउन हवा की नको यावर चाललेल्या चर्चा आता बेड कुठे उपलब्ध आहेत, औषध कुठे मिळतील,लस कधी कुठे कशी मिळेल, जेवणाचा डबा तेवढा कसा पोहोचेल आणि मित्र,नातलग आणि आप्तेष्टांच्या तब्येतीच्या काळजीत बदलल्या. जवळचा गेल्याची हुरहूर आणि स्वतःच्या जीवाची काळजी अशा दुहेरी कात्रीत दिवस सरतोय इतकं नक्की.

काही पोष्टि सामुदायिक अंत्यविधी दाखवतात, काही पोष्टि ऑक्सिजनविना आणि औषधावीना हवालदील रुग्ण आणि त्याचे सोबती दाखवतात. काही पोष्टि हिम्मत ठेऊन लढायला सांगत आहेत. हेही दिवस जातील याची खात्री देतायत. काही पोष्टि आपल्यातील कलाकार व्यक्त करतायेत.काही पोष्टि लोकांनी कशी आणि किती मदत केली याचे आकडे फिरवत आहेत. काही पोष्टि प्रामाणिकपणे किती रुग्ण वाढले किती बरे झाले याचे धावते समालोचन करीत आहेत. यातच सुरू झाला लसीचा खेळ. वयाची बंधन लावून लसीकरण सुरू झाले. पहिला डोस दुसरा डोस, त्यातलं अंतर , त्याचा परिणाम याचा पण उहापोह वाचायला मिळतोय. ऍलोपॅथी, आयुर्वेदिक की होमिओपॅथी याचा जो तो आपापल्या परीनं समजवायचा प्रयत्न करतोय. आमचंच कसं चांगलं यापेक्षा उपयुक्त कोणतं आणि कसं हेही सांगणाऱ्या पोष्टि वाचल्या की हुरूप येतोय.

माझ्यातला सामान्य माणूस भीती,काळजी,राग,जबादारी,हतबलता,उसन अवसान, निःश्वास, आशा आणि विश्वास या भावना ओळीने गिरवत दिवस उलटतोय.

सुखाच्या व्याख्या जशा सारख्या नसतात तशाच व्यथा देखील एकाच तराजूत तोलता येत नाहीत. विस्कटलेली घडी कधी सरळ बसेल याचे उत्तर मात्र कोणाकडेच नाही.

दिवस असाच सरून जातो. असेही काही सल्ले येतात या करोनाच्या बातम्या किव्वा पोष्टि वाचू नका म्हणतात. व्यायाम करा, आहार नीट ठेवा आनंदी रहा वगरे वगरे.

आपली काळजी आणि पर्यायाने सर्वांची काळजी या खेरीज आता फारसं काही शिल्लक नाहीये आपल्याकडे. गेलेल्या व्यक्तीला शेवटचं पहायची सोय शिल्लक नाहीये. राजकारण, आरोप, प्रत्यारोप, दिखाऊ काम आणि जनहितापेक्षा वैयक्तिक तिजोऱ्या भरण्याकडे कदाचित खुर्चीधारी मन लावून प्रयत्न करतील. संबंध भारत देश यापेक्षा देखील आखून दिलेल्या राज्याच्या सीमा मदतीला वेसण घालतील पण आपला धीर सुटता कामा नये.

या सगळ्या चढ उतारात दिवस कसा मावळतो कळत नाही. शनिवार रविवार आणि इतर दिवस यामध्ये नावापेक्षा जास्त असा काही फरक जाणवत नाही. इच्छाशक्ती आणि मन मात्र नक्की सांगतं उसळलेली लाट नक्की शमेल. सय्यमची आणि धीराची कसोटीच की ही.काही परीक्षा अवघड असतात पण पास होण्याला पर्याय नसतो. त्यातलाच हा भाग.

काहीशी स्वयंशिस्त, पुरेशी खबरदारी,काळजी आणि बेफिकीर,फाजीलआत्मविश्वासाला आळा या गोष्टी आचरणात आणल्या तर कदाचित यंदाच्या दिवाळीची खरेदी जोरात होईल. प्रत्यक्ष फराळाला जायचा योग येईल. बाप्पा वाजत गाजत येईल. सगळं तसंच अलबेल असेल जसं आधी होतं. कदाचित तेव्हा जरा जाण आली असेल आपल्याला...सर्वात चाणाक्ष म्हणून मिरवत असलेली मनुष्यप्राणी ही जमात प्रत्यक्षात मात्र किती असुरक्षित, हतबल आणि केविलवाणी आहे..नाही का ?

माझा दिवस असाच संपतो..निजतो ..

हृषिकेश पांडकर

२९.०४.२०२१