Wednesday, August 5, 2020

वनवासाची अखेर !!!

 श्री रामांचे नाव घेतल्यावर इतिहास म्हणून पहिले डोळ्यासमोर यायचा तो चौदा वर्षाचा वनवास..मग नंतर पर्णकुटी,लक्ष्मणरेषा,सोन्याचे हरीण, शुर्पणखा,भिक्षा मागणारा भिक्षुक,रेषा ओलांडणारी सीतामाई,लढणारा जटायू, वानर सेना, श्रीराम लिहिलेले दगड,माती टाकणारी खारुताई, पर्वत उचलून आणणारा हनुमान,लंका जाळणारा हनुमान,अंगठी देणारा हनुमान,शेपटीच्या आसनावर बसणारा हनुमान,राम-रावणाचे युद्ध आणि सीतामाईंची सुखरूप सुटका....


 

हा इतिहास पाहण्यात आणि वाचण्यात बालपण सरले..

पुढे दुर्दैवाने मोठे झालो..आता श्रीराम म्हणल्यावर डोळ्यासमोर यायची ती सदैव वादाच्या विळख्यात जखडलेली अयोध्या.. राम जन्मभुमीच्या जागेवर बांधलेली बाबरी मशीद..त्यावरून पेटलेले रण..१९९२ च्या शेवटाला पाडली गेलेली मशीद..एकमेकांच्या जीवावर उठलेले हिंदु आणि मुस्लिम..बदला घेण्याची लागलेली चढाओढ...९३ चे मुंबई वर झालेले वार..अनंत जखमांनी लाल झालेली मुंबापुरी...तीच तेढ..तोच राग..राम जन्मभूमी मात्र तशीच..तिथे ना श्रीरामाचे मंदिर..ना ती बाबरी मशीद..दोन्ही वास्तु डोळ्यावर पट्टी बांधलेल्या त्या न्याय देवतेच्या कसाट्यात गेली कित्येक वर्षे..मंदिर वही बनाएंगे या एका अजेंड्याची चातका सारखी वाट पाहणारी शरयू..ती संपूर्ण अयोध्या आणि पर्यायाने अखंड भारत...

सुमारे ४९० वर्षाच्या कालावधी नंतर कदाचित आज ही कौसल्येच्या रामाची अयोध्या मोकळा आणि स्वच्छ श्वास घ्यायला सजलीये..हा वनवास तर त्या चौदा वर्षांवर कित्येक पटींनी भारी पडला..

इतकी वर्षे अयोध्या म्हणल्यावर दगडी गोलाकार मशिदीच्या डोमवर चढून ती काठी आणि विविध गोष्टींनी पडणारे लोक हाच व्हिडिओ डोळ्यासमोर असायचा..आज बातम्यांमध्ये अयोध्या या नावाखाली प्रसन्न आणि आनंदी चित्र प्रथमच पाहिले..सजलेला शरयूचा काठ..दिवाळीला लाजवेल अशी दिव्यांची रोषणाई..रांगोळ्यांचा पायघड्या..चौकातील दीपोत्सव..जय श्रीरामाचा जयघोष....देशाला ओढ आहे ती मंदिराच्या पायाची..शहराला आज आनंदाच्या भरात झोप नाही..असेल तरी कशी हो..मर्यादा पुरुषोत्तम वनवास संपवून परत येतायत..

या राम मंदिराच्या यशात वानरसेनेचे योगदान आणि खारीचा वाटा उचलणाऱ्या सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि

अभिनंदन !!!

खऱ्या अर्थी रामराज्य अस्तित्वात यावं ह्यासाठी प्रभू रामरायाच्या चरणी मनोमन प्रार्थना...

राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे ।

सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने ||

जय श्रीराम..

हृषिकेश पांडकर

०५.०८.२०२०

 

Sunday, July 12, 2020

ऑनलाईन शाळा

 'ऑनलाईन शाळा' म्हणजे सरकार अन शिक्षण बोर्डाचा मोघम तोडगा झाला..

करोनामुळे वर्ष वाया जाऊ नये म्हणून चिमुरड्यांवर मात्र अन्यायच झाला...

स्क्रीन शेअर करून आकडे,चित्र आणि अक्षरे तर स्पष्ट वाचता येतील कि..

पण काळा फळा,ओला खडू आणि डस्टर मधून उडणारी पांढऱ्या खडूची पूड कशी दिसायची ?

सोनी,JBL चे हेडफोन लावून शांत आणि एकांतात सरांचा अन बाईंचा आवाज अगदी व्यवस्थित येईल हो..

पण मधल्या सुट्टीची घंटा,सुट्टीच्या बातमीचा धिंगाणा आणि राष्ट्रगीतातील 'भारत माता कि जय' कुठून ऐकू येईल ?

घरीच असल्यामुळे रोज आईच्या हातचे गरम जेवण सहज मिळू शकेलच कि..

पण घोळका करून खाल्लेल्या थंडगार पण 'व्हरायटी फूड' ची चव कशी मिळणार ??

इंटरनेट बंद पडून किव्वा लाईट जाऊन सुट्टी मिळेलही कदाचित..

पण 'शाळेभोवती तळे साचून' मिळणाऱ्या सुट्टीच मोल त्याला कधी यायचे ??

परवा बाईंनी वारीचे फोटो दाखवून पालखीची माहिती व्यवस्थित सांगितली खरी..

पण कपाळाला गंध,हातात टाळ आणि सोनेरी कागद लावलेली पालखी प्रत्येक वर्गात मिरवण्याची हौस तेवढी राहूनच गेली।.

कॅमेरा आणि माईक म्यूट करून घरच्या घरी डुलकी काढणे सहज शक्य आहे..

पण वर्गात बसून पुस्तकात डोके घालून घेतलेल्या वामकुक्षीचा आनंद त्यात कधी असेल का ?

झूम मीटिंग,गूगल हॅन्गआउट किव्वा अगदी स्काईप वर लॉगिन करून शाळेची सुरुवात तर दिमाखात होईल..

पण 'एक साथ नमस्ते' किव्वा 'भारत माझा देश आहे..सारे भरतीय माझे बांधव आहेत' याने सुरु होणाऱ्या मराठीच्या तासाची ऐट काही न्यारीच..

सकाळची शाळा असूनही आवरायला लवकर उठायची गरज भासणार नाही कदाचित..

पण रिक्षा वाल्या काकांची हाक आणि शाळेत जाईपर्यंतचा रिक्षातील 'कल्ला' हरवून गेलाच कि..

ऑनलाईन शिकवताना चित्र,प्रेझेंटेशन्स आणि ऑडिओ नक्कीच उत्कृष्ट दर्जाचे असतील..

पण फळ्यावर लिहिलेला सुविचार वाचणे किव्वा बाईंनी काढलेला प्राणी घोडा कि गाढव हे ओळखताना होणारी कसरत तेवढी पुन्हा होणार नाही..

पँडेमिकच्या लाटेत श्रावण तर सहज सारून जाईल..पाठोपाठ गणपती,दसरा आणि दिवाळी देखील वाहून जातील..

पण शाळेतली दही हंडी..गणपतीची आरती,सहामाही परीक्षा आणि बऱ्याच गोष्टींचा उल्लेखही आता होणार नाही ..

ऑफलाईन होऊन किव्वा विंडो मिनिमाइझ करून शाळा सुटेल रोजच..

पण घंटा ऐकताच गर्दी करून वर्गातून पळण्याची हौस त्यातून भागणार नाही हे नक्की..

घरूनच शाळा असल्याने डबा,गणवेश आणि दप्तराच्या ओझ्यातून मुलं बाहेर येतील..

पण खाऊचा डबा, शाळेचा धुतलेला गणवेश आणि तासाप्रमाणे लावलेले दप्तर यातली मजा हिरावली जाईल..

ऑनलाईन शिक्षण हि काळाची गरज असेलही कदाचित...त्यात मुलांची सुरक्षितताही नक्की असेल..

पण 'शाळा' म्हटल्यावर ज्या गोष्टी आपण अनुभवल्या त्या आनंदाला हि चिमुरडी मुकणार याची सल जास्त बोचणार..

#lockdownreturns

हृषिकेश पांडकर

१२/०७/२०२०

 

Wednesday, July 8, 2020

काटेरी मुकुटधारी

 

एकाने 'भारतीय क्रिकेट' रथाच्या अश्वाला टाच मारून खऱ्या अर्थी घोडदौड सुरु केली आणि दुसऱ्याने सय्यम,कुशलता आणि चातुर्याने वेग वाढवत अग्रक्रमांक गाठला…

एकाने हिरे वेचून संघ बांधला..दुसऱ्याने बांधलेल्या संघाला तारुण्याचे तोरण बांधून सोने केले…

एक मुळातच खानदानी,राजेशाही आणि गडगंज..दुसरा तसा सामान्य,धडपडून आणि प्रतिकूल परिस्थिती मधून वर आलेला…

साम्य इतकेच कि कारकिर्दीच्या सूर्यास्ताला दोघांकडेही रुबाब तितकाच…

एकाने सगळ्यांना क्रीज सोडून मारले..दुसऱ्याने क्रीज सोडणाऱ्यांना मारले…

एक टाईमिंग आणि पदलालित्याचा जादूगार तर दुसरा मनगटाच्या ताकदीचा धनी..

एक योग्य वेळी बोलून किव्वा कृतीतून लगेच व्यक्त होणारा निर्भीड दुसरा तसा अलिप्त आणि प्रसिध्दी झोतापासून हात राखून...

एकाने २००३ ला स्वप्नासमीप नेले...दुसऱ्याने तेच स्वप्न २०११ ला पूर्णत्वाला नेले..

एकाने 'आरे' ला 'कारे' विचारण्याची सवय लावली..दुसऱ्याने कोणी 'आरे' विचारणारच नाही याचीच खबरदारी घेतली..

'प्लेयर्स तो ऐसेही बनते है' असं म्हणत एकाने दुसऱ्याला बढती दिली..'आखरी सेशन है दादा कप्तानी आप करो' असे म्हणत दुसऱ्याने पहिल्याला मानवंदना दिली…

पहिला कायमच वाघासारखा आक्रमक,खमक्या आणि रुबाबात होता..दुसरा नेहमीच चित्त्या सारखा चपळ धूर्त आणि सय्यमी राहिला…

क्रिकेटवेड्या देशाचे जगाच्या नकाशावर यशस्वी नेतृत्व करणाऱ्या दोनही काटेरी मुकुटधारी सेनापतींना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा !!!

हृषिकेश पांडकर

०८.०७.२०२०