Tuesday, August 29, 2017

मजेशीर आठवडा

 आठवडा किती मजेशीर चाललाय याचा हिशोब लावतोय..

श्रद्धा,करुणा,क्रूरता,भक्ती,मांगल्य,अमांगल्य

राष्ट्रप्रेम,यश,अपयश,लहरीपणा,निर्लज्जपणा हे सगळं अनुभवतोय..

एक वेळ आधी कोंबडा कि आधी अंड हा प्रश्न चुटकीसरशी सुटेल..पण

आधी रंगारी कि आधी टिळक या प्रश्नावर विघनहर्त्याने देखील हात टेकले..

१२५वे वर्ष आणि १ डझन दिवसांचा मुक्काम या दुधारी योगायोगावर बाप्पा विराजमान झाले.

इतके दिवस वाळत पडलेला पाऊस येताना घेऊन आले..

पावसाचं एक वेळ ठीक आहे हो..त्याचे सध्या दिवस तरी आहेत..

पण ३०,६० आणि ९० च्या नशेवाचून ओस पडलेले हायवे पुन्हा नशाधीन होण्याच्या मार्गी आहेत..

राम रहीम म्हणत 'समाजसेवा' करणाऱ्यांची 'सेवा' समाजासमोर आली..

डोळ्यावर पट्टी असूनही न्यायदेवता आज न्यायाला जागली..

तिकडे युरोपात साइना सिंधू देशासाठी झुंजल्या..

पहिल्या चारात दोन दोन तिरंग्यांनी माना उंचावल्या..

१९६२ च्या पुनरावृत्तीची धमकी देणाऱ्या कपटी ड्रॅगनची एक नाही चालली.

डोकलामचा हट्ट धरलेल्यांची माघार मात्र आपल्यासाठी विजयसदृश्य ठरली.

विनायकाच्या मुक्काम पूर्वाधातच इतक्या गोष्टी घडल्या..आज तर खुद्द मातोश्री येऊन पोहोचल्या

मायलेक मिळून उत्तरार्ध खुलवतील..किमान यासर्वांचा याचिदेही याचीडोळा प्रत्यय तरी घेतील..

सगळ्यात भाग घेऊनही एक त्रयस्थ म्हणून आपण या गोष्टी अनुभवत असतो..

कधी कधी यालाच 'रुटीन' म्हणतो..तर कधी याच गोष्टी 'फॉर अ चेंज' म्हणून जगतो..

रोलर कोस्टर रोलर कोस्टर म्हणजे अजून काय वेगळ असतं..

बोगदा सुरु झाला कि समोरच्या शेवटाचा उजेड दिसतो..

बोगद्या बाहेर आलो कि पुढच्या बोगद्याच्या अंधार..

- हृषिकेश पांडकर

 

Monday, July 24, 2017

खेळणाऱ्या त्या ११ जणीस

 

|| श्री ||

प्रति,

खेळणाऱ्या त्या ११ जणीस,

पत्र लिहिण्यास कारण कि,

कौतुक करावं की सांत्वन करावं या द्विधा मनस्थितीमध्ये मी अडकलोय.राग व्यक्त करावा की या मेहनतीला शाबासकी द्यावी या दोन दगडांवर मी पाय ठेऊन उभा आहे.जिद्द,साहस,चिकाटी आणि मेहनतीने तुम्ही अंतिम फेरी गाठलीत तिथेच तुम्ही करोडो भारतीयांची मन जिंकलीत.या तुमच्या वाटचालीसाठी तुमचे करावे तितके कौतुक कमीच आहे.पण अंतिम सामन्यात तुम्हाला इंग्लंड ने हरवले असे म्हणण्यापेक्षा तुम्ही स्वतःहून हरलात हे म्हणणे जास्त संयुक्तिक ठरेल.चार वर्षांनी येणारी हि सोनेरी संधी शेवटच्या काही क्षणात डोळ्यासमोरून निसटली.


 

अंतिम सामन्याचा दबाव, समोरच्या संघाचा दबदबा,मोठी स्पर्धा, प्रतिस्पर्ध्याच्या घरचे मैदान या आणि अश्या अनेक अडचणी नक्कीच होत्या.कागदी आघाडीवर गोर्यांचा संघ सरस होताही कदाचित.पण याचा परिणाम नव्वद टक्के सामन्यात तुमच्यावर अजिबात झाला नाही.मग शेवटच्या दहा टक्क्यात ती जिद्द,ती चिकाटी आणि तो सय्यम किंचितसा कमी पडला आणि मन जिंकणाऱ्या तुम्ही करंडक जिंकण्यापासून अजून चार वर्षाकरीता वंचित राहिलात.

तुम्ही हरलात याचे दुःख किव्वा राग नाहीये.मात्र अंतिम सामन्यासहित संपूर्ण मालिकेत ज्या जबाबदारीने तुम्ही खेळलात नेमका तोच अभाव शेवटच्या अर्ध्यातासात दिसून आला आणि करंडकाचे स्वप्न भंगले.निराशा पूर्णपणे लपवून पुढे जाण्याइतका संत मी अजून झालो नाहीये.त्यामुळे जेमतेम महिन्याच्या अवधीत दोन मोठ्या स्पर्धांच्या पराभवाचे ओझे कदाचित मला अजून जड भासत असावे.पण तुमच्या कष्टाला अगदी शेवटच्या क्षणाला लागलेली नजर हुरहूर लावून गेली.

असो, खेळाडू म्हणून यश आणि अपयश तितक्याच समर्थपणे जर तुम्ही पचवू शकत असाल तर एक प्रेक्षक म्हणून आम्ही देखील हा पराभव तितक्याच सकारात्मक पद्धतीने घेणे अपेक्षित आहे.आणि ते आम्ही नक्की करूच.पण विश्वविजेतेपद गमावल्याची रुखरुख मात्र लागून राहील एवढे निश्चित.

प्रत्येक अनुभव हा नवीन असतो.जो संघ सुरुवातीला स्पर्धेसाठी पात्र सुद्धा ठरेल कि नाही इथपासून प्रवास सुरु करतो आणि थेट अंतिम फेरीत धडक मारतो त्याचा आम्हाला कायमच अभिमान राहील.मायदेशी जेव्हा विमानतळावर उतराल तेव्हा ताठ मानेने या,संपूर्ण देश तुमच्या स्वागताला उभा असेल. 🙂

हृषिकेश

भारत

 

Thursday, July 20, 2017

मर्फीचा नियम

 “Anything that can go wrong will go wrong.”

'निर्भेळ' या सौज्ञेवरचा विश्वासच उडलाय माझा..

पाऊस आणि गर्दी यांच्या फुगडीतून लवकर घरी पोहोचावं तर शेवटच्या टप्प्यातील रस्त्याचे काम वेळ चोरून नेते.ऑफिस मधून लवकर निघाल्याचा निर्भेळ असा आनंद, नेहमीचीच वाट हिरावून नेते.

यश तर नाहीच पण निर्भेळ अपयशानेही हात सोडलाय माझा..हरल्यासारशी हरणे होतेच..मार्जिन मात्र तोकडे पडते..हि मॅच दणदणीत हरलो तर पुढली मॅच किमान ऑस्ट्रेलिया बरोबर खेळावी लागणार नाही या समाधानालाही मी पारखा होतो..जिंकण्याचा आनंद दूरच राहिलाय ..पराभवही मनासारखा नसतो.

हाफ चड्डी आणि बनियनवर तक्क्याला टेकून चहात खारी बुडवत मॅच पहायला बसतो तेव्हा सोसायटीचे सेक्रेटरी वॉचमनच्या पगाराचा हिशोब सेटल करायला दत्त म्हणून हजर होतात...पुढे नाईलाजास्तव कपडे चढवावे लागतात..चहा,खारी,तक्क्या,मॅच या निर्भेळ आनंदाला जाता जाता तेवढी हाय लागते.

मर्फीचा नियम म्हणजे अजून काय वेगळे असते..?

वर्षा सहलीला टळटळीत ऊन आणि रेनकोट नसताना मुसळधार पाऊस परीक्षा पाहतो का खिल्ली उडवतो हेच मला अजून समजत नाही.

खिशात कायम दोन चाव्या असतात,प्रत्येक वेळी पहिल्यांदा चुकीचीच चावी हातात येते..हे म्हणजे ५०-५०-९० चा नियम झाला..एखादी गोष्ट योग्य पद्धतीने होण्याची शक्यता जर ५०-५० असेल तर ती अयोग्य रीतीने होण्याचे प्रमाण ९० टक्के असते हा समज दृढ होत चाललाय माझा.

काही लोक लांबून छान दिसतात..इतकेच काय तर जवळूनही छान दिसतात.प्रश्न फक्त इतकंच आहे कि बोलायला तोंड उघडले कि कमालीचे नकोसे होतात.हे उदाहरण प्रकाशाचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा जास्त असतो याचे आहे कि मी विज्ञानाची टर उडवतोय ?

एखादा महत्वाचा फोन येणार असेल तर साधारण त्याच वेळेला रेंज जाऊन हकनाक शिव्या पदरात पडून घेण्याचे श्रेय कधी अनुभवलंय ? ब्रेडला जॅम किव्वा बटर लावताना चुकून हातातून ब्रेड पडला तर कायम तीच बटर वाली बाजू खाली पडलेली पाहून कधी नशिबाला दोष दिलाय ? पण याला दुर्दैव म्हणत नाहीत..हाच तो मर्फीचा लॉ आहे जो फक्त माझ्याच बाबतीत सफल होतो असं प्रत्येकाला वाटत. 🙂

काही वेळा सहज गाडीवरून जाताना अशा दैनंदिन आयुष्यात येणारे प्रसंग आठवतात आणि मग त्याची कारणमीमांसा करण्याची इच्छा होता.तर अशाच काही प्रसंगांचा उल्लेख इथे केला.अश्या अनंत घटना रोज घडतात.

बरं या गोष्टी बदलल्या पाहिजेत,यावरील उपाय किव्वा या गोष्टी होऊच नये यासाठी घेता येणारी काळजी वगरे गोष्टींवर मी बोललेलो नाही. फक्त अनुभव सांगितले.कारण काही गोष्टी न बदलता तश्याच अनुभवण्यात देखील वेगळीच मजा असते.तुमच्या बाबतीत असे काही मर्फीचे अनुभव असतील तर सांगा नक्की.कारण दुसऱ्याच्या अनुभवात 'अरे हो माझंही नेहमी असंच होतं' असे वाटण्यात एक वेगळाच आनंद असतो. नाही का ?

- हृषिकेश