Friday, November 20, 2015

संजय काका मला वाचवा



स्लम डॉग मिलेनियर मधील रेहमानच्या 'रिंगा रिंगा' नंतर लीलाबाइंच्या बाजीरावांचा 'पिंगा' पाहण्याचा योग आला. अर्थात हा नशिबाने आलेला योग होता कि 'आलिया भोगासी' मधला 'भोग' होता हे सुज्ञ वाचकास सांगणे न लागो.

गाणे सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघण्याचे धाडस आम्ही सर्वांनीच दाखवले. आणि आज हे पाहण्यासाठी माझ्यासोबत काही विशेष लोक हजर होते.त्यामुळे गाणे हे ऐकण्यास आणि पाहण्यात मला कसे वाटले त्यापेक्षाही याबद्दल माझ्या बरोबर असणार्यांना कसे वाटले हे जाणून घेण्याची मला प्रचंड घाई झाली होती.गाण्याचे स्क्रीनिंग संपले.आम्ही सातही जण त्या अंधाऱ्या खोलीतून बाहेर न येता तिथेच थांबून राहिलो.

गम्मत कशी असते बघा,योग हा गाणे अथवा सिनेमा पाहण्याचा नव्हताच.आनंदाची गोष्ट हि होती कि माझ्याबरोबर असलेल्या त्या सहा व्यक्तींमुळे आणि त्यांनी केलेल्या गाण्यावरील टिपण्णीमुळे झालेलया मनोरंजनाची कुठल्याही समाधानाशी तुलना नव्हती.आम्ही सातही जण तिथेच गोल खुर्च्या मांडून बसलो होतो.अर्थात या लोकांसमोर मी म्हणजे चहा आणून देण्यासाठी आलेला आणि ग्लास रिकामे होईपर्यंत वाट पाहणारा मुलगा वाटत होतो.पण ते हि नसे थोडके असे ते वातावरण होते.

त्या पडद्यावर झालेल्या चार पाच मिनिटाच्या गाण्याचे तासभर चाललेले अवलोकन मी आयुष्यभर विसरू नाही.लक्षात राहतील तेवढ्या आणि तशाच्या तश्या कमेंट तुमच्यापर्यंत पोहोचविण्याची खूप इच्छा झाली आणि कागदाला पेन लावला. 


 मी सोडून सहा लोक होते.आम्ही गोलाकार बसलो होतो.मधे चहाची किटली आणि सात ग्लास उपडे घातले होते.कुठलाही बडेजाव नव्हता.खोलीत प्रसन्न वातावरण होते.कोण पहिले सुरु होतंय यासाठी कान आसुसलेले होते आणि तेवढ्यात माझ्या उजव्या हाताला बसलेल्या व.पु.नी मिश्किल हास्य आणि थोड्या खार्ज्यातील आवाजात बोलायला सुरुवात केली.
सौंदर्य कसं असावं ? किव्वा सौंदर्य हे कोणासाठी आहे हो ? अर्थातच ज्यांना मोत्याची चमक बघायची आहे अशा वेड्यांसाठी.वर्तमानात जगत असताना इतिहास जाणून घेण्याची इच्छा होणे स्वाभाविक आहेच.पण तो योग्यरीत्या जाणून घेणे तितकेच महत्वाचे. वर्तमानात वावरताना तोंडी लावल्यासारखा इतिहास जाणावा.इथे मात्र साहेबांनी इतिहासाचेच लोणचे घातले आहे.काही हौशी घरांमध्ये ड्रेसिंग टेबलवर निरनिराळ्या अत्तराच्या बाटल्या असतात.जसा मूड होईल तसं अत्तर वापरायचं किव्वा जसा मूड व्हावासा वाटत असेल तसं अत्तर निवडायच.इतिहाससुद्धा हवा तसा आणि मनाप्रमाणे उघडायचा याला ऐतिहासिक किव्वा इतिहासावर आधारित सिनेमा काढणे म्हणत नाहीत भन्साळी साहेब.   

एखाद्याला मैफिलीसारखं रंगवता येणार नाही का ? रंगवता येत असेलही पण त्या 'एखाद्याने किव्वा एखादीने' खरच मैफिलीत रंगावे अशी गरज आहे का ? किव्वा असे दाखवायचे आहे का ? या गोष्टीच ज्याला माहित नाहीयेत त्याने पुढचा विचार का करावा हे संजयला का उमगले नसावे याचे राहून राहून आश्चर्य वाटत.भन्साळी साहेबांना एकच विचारणं आहेबाबा इतिहास घडवणं एकवेळ सोपं आहे,ते तू कर.पण इतिहास बदलण्याच्या वाटेला तू का लागलास ? कृष्णान जरी बासरीसहित आपल्याला पाठवलं असलं तरीपण प्रत्येकवेळी सहाही छिद्रातून संगीतच बाहेर येईल असं नाहीना.

सर्वजण जोरदार हसले...मला पण हसू आले. व.पुंच्या शब्द्सामर्थ्याला आणि भन्साळीच्या मूर्खपणाला दाद देऊन मी चहाचा कप उचलला.

हसणं थांबलं आणि प्र.के.अत्र्यांनी सुरुवात केली.
          अरे वाह महाराष्ट्रातील संस्कृती म्हणली कि लावणी आणि नऊवारी यापलीकडे काहीही शिल्लक नाही असा भास व्हावा इतका दळीद्रीपणा दाखवला आहे.गाण्याचे नाव पिंगा आणि नाच मात्र लावणीचा..कमाल..

बोलून चालून भन्साळी,दीपिका आणि प्रियांका शेवटी..पण प्रतिकृती मात्र पार वास नसलेल्या झेंडूच्या फुलासारखी आहे.मोहक सुवासासाठी हपापलेली रसिकता या बिनवासाच्या आणि भडक रंगाच्या दरिद्री आहेराचा कसा स्वीकार करणार ?उलट तिच्या भावनांची कोमलता दुखावल्याचा उद्धटपणा केल्याचे पाप या भन्साळीच्या पदरी यायचे दुसरे काय.
मी दिग्दर्शक कसा झालो..मी संगीतकार कसा झालो आणि सरतेशेवटी मी इतिहासकारही कसा झालो हे प्रश्न भन्साळीने आत्मपरीक्षण म्हणून एकदा पुन्हा सोडवावेत एवढी माफक अपेक्षा बाळगायला काय हरकत आहे ?

पुन्हा एकदा मंडळी हास्यरसात बुडाली आणि पुढच्या टिपण्णीकडे मी कान टवकारले.

शेजारी द.मा.मिरासदार बसले होते.चहाच्या घोटासोबत स्मितहास्य करून मिरासदार सर म्हणाले,आमच्या ग्रामीण महाराष्ट्रात संस्कृती म्हणजे काय असा प्रश्न जर कोणाला विचारला तर चिमुरड पोर पण घडाघडा सांगेल.पण आज त्याच पोराला..'बाळ, हा बघ आपल्या पेशव्यांचा इतिहास' असे म्हणून जर हि पडद्यावरची कवायत दाखवली तर पोट्टी खुळी होऊन जातील नाहीतर काय.गावाकडे पेशव्याची मस्तानी दिसायला सुरेख होती या पलीकडे माहित नाही.आणि या पलीकडे इतिहासातही काही नाही.पण हे असले सिनेमे गावाकडे पाहिले गेले तर त्यांना हे पण कळेल कि मस्तानी सुंदर तर होतीच पण ती बेंबी खाली साड्या नेसायची आणि तिची सवत म्हणजे काशीबाई ती पण सुंदर असून ती देखील बेंबी खाली साड्या नेसायची आणि दोघी एकत्र नाचायच्या तेही भर दरबारात.हि  गोष्ट अवघ्या महाराष्ट्राच्या गळी कशी उतरवणार हा भन्साळी

नऊवारी साडी या पोषाखाच्या नावाखाली भरजरी वस्त्र १८ व्या शतकात होती ? आम्हाला कधी संदर्भ लागला नाही. बर इतिहास मांडताय ना तुम्ही.मग त्याच्याशी साधर्म्य असलेल्या गोष्टी दाखवा ना.“There is no attention paid to the anthropological aspect in the song'' हेच खरे.असे म्हणून मिरासदार सरांनी हातातला कप घशात रिता केला.

एवढं होतंय न होतंय तोच शेजारच्या आराम खुर्चीवर बसलेले व्ही.माडगुळकर सर पुढे होऊन म्हणाले.प्रसंगाच गांभीर्य ठेवून गोष्टी दाखवणे यात खरं कौशल्य आहे.एखाद्या अलिशान बंगल्यात भयपट दाखवताना घराबाहेर विहीर दाखवण्याचा अट्टाहास करू नये.विहीर रात्री भीतीदायक वाटते हे जरी सत्य असले तरी दारात लावलेल्या मर्सिडीज शेजारी विहीर असावी या सारखी लिबर्टी घेवून केलेला मूर्खपणा प्रेक्षकांनी पैसे देवून सहन करावा हे तितकेसे रुचत नाही.

एवढ्या अलिशान वाड्यात नाचणारी मस्तानी सौंदर्याची परिसीमा होती असा इतिहासात उल्लेख आहे.पण सिल्कची  साडी नेसून काशीबाईबरोबर खांद्याला खांदा लावून नाचल्याचा उल्लेख नसावा.दोघींनाही अगदी तशीच आणि जरीची भरजरी साडी मिळणे हे कदाचित पानिपत जिंक्ण्यापेक्षाही थोर काम पेशव्यांनी केले असे तर भन्साळी साहेबांना सुचित करायचे नसेल ना? असो एकूण काय तर प्रेक्षकांनी पदरचे पैसे खर्च करून कस्टमाइझ केलाला इतिहास पाहणे.आणि हि आमची संस्कृती अशी होती या बाबत आश्चर्य व्यक्त करणे याखेरीज कुठलीही शक्यता यातून निर्माण होऊ शकत नाही.

प्रत्येकाने केलेल्या वर्णनाला माझ्याजवळ शब्द नव्हते.माझा पहिला चहा केव्हाच संपला होता आता दुसर्याची वेळ होती.आणि तेवढ्यात पलीकडे टेकून बसलेले बाबासाहेब पुरंदरे सर हलकेसे खोकून सांगू लागले.  

अरे ..काय आपला इतिहास.आणि काय हि चालवलेली ओंगळवाणी चेष्टा.दिल्लीचे तख्त राखणाऱ्या पेशव्यांचा इतका मोठा इतिहास आज मंगळागौरीच्या तीन मिनिटाच्या गाण्याने पार लाचार झाल्यासारखा भासतोय.अरे कशी होती मस्तानी कशा होत्या काशीबाई.एकीच्या सौदर्याला पेशवा भुलला आणि दुसरी अस्सल मराठमोळा खानदानीपणा भिनलेली.

काशीबाईनचा दाखवलेला नाच इतिहासालाच मोठा पीळ देऊन गेलाय.आणि अशा प्रकारची मंगळागौर संपूर्ण पेशवे खानदानात कोणी साजरी केलीये याची नोंद नाही मग कॅमेरा घेवून हि लोक थेट पेशवाईच बदलवून टाकत आहेत हि चेष्टा कोणाची ? आपल्या प्रेक्षकाची, इतिहासाची कि रंगभूमीची ?

शनिवारवाड्यात अंधार्या रात्री आजही स्मशान शांतताच असते.गारद्यांच्या पाठलागाने शहारलेल्या त्या शनिवारवाड्याच्या अभेद्य भिंती आणि नारायणरावांच्या रक्ताने रंगलेला पुणे दरवाजाचा तो बुरुज आज या भन्साळीची मस्तानी आणि काशीबाइना बघून कुठ तोंड लपविल..

अरे इतिहास दाखवायचा तर कसा याची देखील जाण हवी.काय होते पेशव्यांचे वैभव ? हे वाक्य म्हणत असताना बाबासाहेब उठून उभेच राहिले होते.तो रुबाब ती ऐट तो खानदानीपणा.असा छचोरपणा दाखवायची बुद्धी तरी कशी होते.उगीच नाथ घातली आणि साडी गुंडाळली कि मराठमोळेपणा आला असे ज्यांना वाटते त्यांनी मराठ्यांचा भूतकाळ कधी जाणलाच नाही.आज खर्या अर्थाने इतिहास इथे ओशाळला.

बाबा थोडे संतापलेच होते.हाडाचे इतिहासकार ते..त्यांचा तो आवेश पाहून माझ्या शेजारी बसलेल्या पु.लं.नी त्यांना पाण्याचा ग्लास दिला आणि त्यांना खाली बसवले.बाबा देखील नंतर हसत खाली बसले.आता वेळ होती भाईंची..



जन्मतःच वाकचातुर्य,विनोदबुद्धी आणि निरीक्षणशक्ती या तिघांचा वरदहस्त लाभलेल्या या माणसाला त्या चार मिनिटांचे वर्णन करताना ऐकणे यासारखा सुखावह क्षण नव्हता.पु.लंनी सुरुवात केली.

मस्तानीने जर तेव्हा नाभिदर्शक साडी नेसली असती आणि तशीच अगदी त्याच रंगाची साडी नेसून काशीबाइ खांद्याला खांदा लावून नाचल्या असत्या तर संपूर्ण पेशवाई 'काका मला नाचवा' म्हणाली नसती काय रे शिंच्या..

इतिहास म्हणून काहीतरी नवीन दाखवायची गरज नसते.कारण इतिहास बदलत नसतो.पण हे गाणे पाहताना कुठे तरी जुन्या गाण्यांचा भास होतो.मराठीतील नाच ग घुमा,लटपट लटपट आणि छबीदार छबी या तीन गाण्यांची एकत्रित आठवण होते.अर्थात मंगळागौरीच गाणं पाहताना लटपट लटपट या गाण्याची आठवण होणे यासारखा विरोधाभास नाही.

मस्तानी सारखी छत्रसाल राजाची मुलगी अचानक पिंगा घालत असताना मुस्लिम आणि मराठी संस्कृतीची गळाभेट बघण्याचा आनंदाला अश्रुरूपी वाट करून द्यावी कि काय या विचारात माझा काही वेळ गेला.
या बाजीराव मस्तानीची हि पाच मिनिटे जर आज खरच त्या शनिवारवाड्यासमोरच्या पेशव्यांच्या पुतळ्यांनी जर पहिलीना तर पेशवे साहेब घोडी सहित नाव्यापुलावरून नदीत स्वतःला झोकून देतील एवढे नक्की.
सर्वजण हास्यकल्लोळात बुडाले.भाई स्वतः मनसोक्त हसले.मी गेल्या तासभराच्या त्या अद्भुत अनुभवाने भारावून गेलो होतो.सर्व वंदनीय व्यक्तींचा निरोप घेवून तृप्त होवून बाहेर पडलो...

भन्साळीनची पेशवाई अटकेपार झेंडे गाडेल कि नाही हे प्रेक्षकच ठरवतील.त्या पेशव्यांनी दिल्लीचे तख्त राखले आता हि पेशवाई किमान आठवडाभर तरी पुण्याचे तख्त राखते कि नाही हे लवकरच कळेल.

पुण्यात राहून पेशव्यांचा इतिहास बदलताना पाहणे यासारखा ऐतिहासीक विरोधाभास नाही..

संजय...तेरी लीला अपार हे...  माफ करा..लीला तेरा संजय अपार हे  :)


                                                             हृषिकेश पांडकर
                                                             २०.११.२०१५

Sunday, November 8, 2015

déjà vu




हमारा कल ..हमारा आजहमारा कल ..हमारा आज 
बुलंद भारतकी बुलंद तसबीरहमारा बजाज …हमारा बजाज … 
आकाशवाणीने भल्यापहाटे साद घातली…
सहामाही संपल्याचा आनंद आज ऑफिस सुट्टीच्या आनंदावर भारी पडत होता

चिमुरड्या मावळ्यांचा किल्ला बालेकिल्ल्याला येवून ठेपला
बुरुजाच्या कामाला पोरांनी मला हाताला धरून खेचला

ओल्या चिखलात आज मनमुराद बरबटलो
आईच्या हाकेपर्यंत त्या किल्ल्यातच रमलो…

माखलेल्या कपड्यांच्या शिव्या हसून सोयीस्कर दुर्लक्षिल्या
स्वच्छतेच्या नावाखाली सगळ्या बादल्या चॉकोलेटी केल्या...

ती बंद पडलेली मॅगी आज नव्याने पुन्हा फोडली
चमच्यात येत नाही म्हणून भांडीच तोंडाला लावली...

DDLJ - २ येतोय म्हणून कि काय...पहिला DDLJ पुन्हा दाखविला
राज सिमरन आणि लंडन पंजाब आज पुन्हा नव्याने अनुभवला…

मोहालीच्या कडक उन्हात परदेशी पुन्हा फिरकीत अडकला
अगदी कुंबळे हरभजन प्रमाणे आज जडेजा अश्विन चमकला…

संध्याकाळचा चहा आकाशकंदिलाच्या चर्चेत सरकला 
तासभराच्या चर्चेनंतर झिरमिळ्यावाला कंदील लटकला

सगळीकडच्या बातम्यांनी पुन्हा तोच बिहार दाखवला
गंगाजलचा बिहार आज पुन्हा लालूने बळकाविला

रात्रीचा नजारा काही औरच होता
रवींद्र जडेजाच्या जागी अजय जडेजा होता

वॉर्नच्या लेगस्पिनला सचिन क्रीजवर होता
पॉइन्ट बाउंड्री सांभाळायला पुन्हा जॉन्टी झेपावत होता…

वसीम,डोनाल्ड आणि कालिस समोर आज सचिनच ठाकला होता
तो बाद झाल्यावर पुन्हा संपूर्ण भारत झोपला होता…

शेवटी …डायरी लिहिताना चित्त थाऱ्यावर आले
निसटलेले नव्वदीचे पान अलगद घरंगळत आले...



                                                                            हृषिकेश पांडकर
                                                                            ०८-११-२०१५

Monday, October 5, 2015

कोकण - एक गूढ



काम,क्रोध,लोभ,मोह,मद आणि मत्सर या रसांमध्ये कुठेही भीतीचे वर्णन का केले नाही याचे मला राहून राहून आश्चर्य वाटते.भीती वाटणे हि स्थिती झालेल्या प्रसंगानंतर जास्त परिणामकारक असते.भीती वाटण्यासाठी अनेक कारणे आहेत आणि असतील.पण आज मी जे मांडतोय ती भीती अमानवी घटनांमधून वाटणारी आहे.ज्याला 'Supernatural' असे म्हटले जाते.अर्थात भूत असते नसते,देव असतो नसतो,माझा विश्वास आहे नाही या गोष्टींचा इथे काहीही संबंध नाही.प्रश्न फक्त इतकाच आहे कि प्रसंग आणि सभोवतालची परिस्थिती यांच्या मांडणीमुळे एक मानसिक चंचलता येते त्यालाच भीती वाटणे असे म्हणतात का ?  

हिंदी सिनेमात असलेली भीतीदायक दृश्ये हि विनोदी भासतात हे सत्य आहे.पण याच सिनेमातील कदाचित एखादाच प्रसंग लक्षात राहतो आणि बरोबर अशाच वेळी त्याची आठवण होते आणि भीती या संज्ञेचा हळूहळू उलगडा होतो.मला असा खूप वाटत कि चेहेरे पाहून किव्वा आवाज ऐकून दचकणे याला भीती वाटणे असे म्हणत नाहीत.भीती वाटणे आणि दचकणे या संपूर्ण भिन्न गोष्टी आहेत.

वास्तविक भीती हि संकल्पना अतिशय शांत आणि गंभीर स्वरुपाची असते असा माझा समज आहे.कर्णकर्कश्य आवाजाने दचकविणे हा माणसाच्या इंद्रियाने दिलेला तत्पर प्रतिसाद असतो त्याला भीती म्हणता येणार नाही.  

आत्तापर्यंतचे सिनेमे पहिल्यानंतर मला काही प्रश्न पडले होते आणि कालानुरूप मला त्याची उत्तरेही मिळत गेली.भीती वाटण्यासाठी रात्रच असणे बंधनकारक आहे का ? किव्वा एखाद्या विशिष्ट जागेवरच भीती वाटते का ? वगरे वगरे.अर्थात या प्रश्नांची उत्तरे माझ्यादृष्टीने तरी 'नाही' अशीच आहेत.

मराठी,हिंदी अथवा इंग्रजी कुठल्याही भयपटाची व्याख्या काय असावी ? जो सिनेमा कुठल्याही कर्कश्य आवाजाखेरीज किव्वा विकृत चेहऱ्याविना प्रेक्षकांना घाबरवू शकतो तो भयपट.आणि कदाचित याच एका बळावर इंग्रजी चित्रपट हिंदी चित्रपटांना मागे सोडतात. हीच सल मनात ठेवून एखादा मराठी सिनेमा असावा जो कुठल्याही 'Special Effects' शिवाय प्रेक्षकांना खिळवून ठेवेल हि कल्पना सुचली आणि विचारांची जागा कृतीने घेतली.

कथा उगीचच वास्तवाचे भान न ठेवता रेखाटलेली अनाकलनीय नसावी.तर अशी एखादी कथा कशी सुचेल या विचारात त्याच दिशेने माझे पहिले पावूल पडले.माझ्या तीन समविचारी मित्रांना घेऊन कोकणात दोन चार दिवस रहावे आणि काही सुचतंय का हे पहावे यावर आम्ही येवून पोहोचलो.रहायची तजवीज मित्राने केली होती.सुट्टीचा विषय उरकून शुक्रवारी सकाळी आम्ही ताम्हिणी कापत पलीकडे निघालो.

अगदी आतमध्ये कोकणात कुठेतरी वेळणेश्वर मंदिराच्या दिशेने जात असताना एक फाटा उजव्या हाताला थेट गर्द झाडीत घेवून जातो.समुद्राला समांतर जाणारा रस्ता काही वेळाने कारूळ या ठिकाणी येवून विसावला.
गाडी शक्य तितकी घराजवळ उभी केली.काकांनी सांगितल्या प्रमाणे त्यांच्याच नारायण पेठेतल्या घरातून घेतलेली किल्ली खिशातून चाचपून काढली आणि गाडीतले सर्व सामान बाहेर काढून आम्ही चौघे आणि काकांचा पुण्यातला घरगडी चिंतन असे पाचजण घराकडे निघालो.

दहा मिनिटांवर असलेला स्थिर समुद्र.वाडीत उभे राहिले कि दोन पोफळीमधून दिसणारा निळा रंग आणि मुलगा म्हणतो 'आई बाबा आता पुन्हा कशाला जाताय भारतात,इथेच रहा माझ्याजवळप्रशस्त घर आहे कशाची कटकट नाही गर्दी प्रदूषणाचा त्रास नाही' म्हणून आग्रहाखातर परदेशी मुलाकडे स्थित असलेल्या पुण्याच्या साठ्ये काकाचं ते वडिलोपार्जित घर आणि त्या मागची ती ऐसपैस पोफळीची वाडी.आजूबाजूला नजर जाईल तिथपर्यंत वाढलेले तण.वस्तीचा मागमूस नाही.उन्हामुळे पानगळती झालेली झाडे.तीनही दिशांना हेच भकास दृश्य.आणि चौथ्या बाजूला अथांग सागर.नाही म्हणायला आडवाट जिथे हमरस्त्याला मिळते तिथे वडाच्या झाडाचा पार आणि शेंदूर फसलेली एक देवाचा अवतार ओळखता येणारी दगडी मूर्ती तेवढी होती.कोणे एकेकाळी लावलेल्या उदबत्त्या आणि धूपामुळे काळाठिक्कर पडलेला पाषाण.उरुसाच्या वेळी लावलेल्या आणि आता फक्त जीर्ण होऊन शिल्लक असलेल्या दोन तीन पताका तेवढ्या फडफडत होत्या.



बॉलीवूड आणि हॉलीवूड मधले भयपट पाहण्याचा दांडगा अनुभव असल्यामुळे अशा परिस्थितीत कुठून काय दिसू शकेल याची काल्पनिक समीकरणे मांडून पहिली.ज्याला भीती वाटत नाही अशी व्यक्ती आयुष्यातील अशा क्षणाची मज घेऊ शकत नाही हे अगदी खरे आहे.

' काकांचे दोन्ही भाऊ आणि काका अशा तिघांनीही दुर्लक्ष केले असल्या सोन्यासारख्या जागेकडे' हे वाक्य एका उच्छवासात उच्चारून चिंतनने कुलुपात किल्ली घातली.समोरच्या बाजूला असलेल्या खिडक्यांच्या गजावर कोळ्याने आपले साम्राज्य उभारले होते.मांडीचा आधार घेवून किल्ली कुलुपात फिरवली आणि तेरा वर्षांचा भूतकाळ गंजलेल्या बिजागीर्यांनी पुन्हा उघडला.

जिथे कुलुपाची धूळ तेरा वर्षांनी झटकली गेली तिथे घरातला एखादा दिवा पेटावा या चमत्काराची अपेक्षाच नव्हती.


दरवाजा पूर्ण उघडूच शकत नव्हता.धूळ नसलेल्या भागावर जोर देऊन दरवाजा रेटला आणि आम्ही पाचहीजण आत गेलो.पाचवा आत आला आणि दरवाजा लावून घेतला.आतून तो मोठा कोयंडा निट लागत नव्हता पण तसाच सारून तो घाईने आमच्यात मिसळला.घराच्या मध्यभागी असलेल्या मोकळ्या जागेत छत नसल्याने येणारे उन्हाचे तिरकस कवडसे वाट दाखवत होते.मधल्या चौकोनी परसात मध्यभागी असलेल्या तुळशी वृंदावनात तुळशीचे रोपटे सोडून बाकी सर्व गोष्टी शिल्लक होत्या.पणतीच्या जागेवर चार पणत्या होत्या.पणत्यांचा तळ जळलेल्या तेलाने रापला होता.कधीकाळी काढलेली रांगोळी उन पाऊस आणि थंडीने शिल्लकही राहिली नव्हती.उगीचच राहिलेल्या रंगावरून रांगोळी असावी असा अंदाज लावून मी चिंतनच्या मागून निमुटपणे चालू लागलो.
उतरत्या कौलांचा तो देखावा वर्णनाला सुंदर होता.पण का कोण जाणे एक विचित्र गूढता बोचत होती.बंद असल्यामुळे आणि मुळातच दमट हवेत असल्यामुळे येणारा कुंद वास श्वास घेण्यात बाधा आणत होता.पुढे सरकत असताना कोळ्यांची अनंत जाळी पायदळी तुडवली जात होती.गालीचा अंथरावा त्याप्रमाणे धुळीचा थर साचला होता.छत नसल्यामुळे उघड्या असलेल्या मधल्या चौकोनानेच तेवढे ऋतू पहिले होते.बाकी घर बकाल.मधले अंगण सोडले तर रात्र काय अन दिवस काय सगळं सारखाच.

परसातून थोडा पुढे आलो.डावीकडे दिवाणखाना होता तिकडे डोकावले.फार काही भव्य किव्वा सोफा खुर्च्यांची रेलचेल नव्हती.पण अडगळीला पडलेली आणि डावा हात निखळलेली आराम खुर्ची घराची अवस्था सांगत होती.तिथे घुटमळता पुढे गेलो.त्याच्याच पुढे अजून एक खोली होती.दाराला खालच्या बाजूने तडे गेले होते.उंबरा मात्र मजबूत होता.भक्कम लाकडाचा तो दरवाजा काळाच्या ओघात जीर्ण झाल्याचे दिसत होते.बिजागीरीच्या फटीतून सहज डोकावून पहिले.धूळ आणि अडगळ याखेरीज कशाचाही लवलेश नव्हता.शेजारी मोठे स्वयंपाकघर होते.डाव्या हाताला विस्तवाच्या अर्थात चुलीचा आखाडा होता.कधीतरी जळून कोळसे झालेली काळी ठिक्कर लाकडे आणि त्यावर जमा झालेली धूळ मिश्रित राख याखेरीज स्वयंपाकघर वाटावे अशी कुठलीच खुण शिल्लक नव्हती.शेणाने अर्धवट सारवलेली जमीन आणि बंद असल्याने उडलेले शेणाचे पोपडे यामुळे निर्माण झालेली पोकळी कोकणची दुर्लक्षिलेली श्रीमंती उघडी पाडत होते. वरच्या बाजूला झरोका तेवढा होता.पण तेव्हाच्या तेलकट धुराने आणि आताच्या अखंड धुळीने झारोक्यावरही आता मेणचट पडदा आला होता.एकूण काय तर बंद आणि रुक्ष अशा त्या वस्तूच्या खुणा पदोपदी दिसत होत्या.


प्रवासाचा शीण जाणवत नव्हता.रहस्यमय कुतूहल जागे झाले होते.भूक मात्र मरणाची लागली होती.चिंतन सामान टाकून पाण्यासाठी बाहेर गेला.आम्ही दिवाणखान्यात जरा झटकूनच आमचे सामान टाकले.आणि उगीचच आजूबाजूच्या गोष्टी न्याहाळू लागलो.

दुपारचा एक वाजत आला होता.ओहोटी सुरु असल्यामुळे समुद्राची गाज कानावर येत नव्हती.बाहेर टळटळीत उन असूनही ती दगडाची फारशी सुसह्य गार लागत होती.
भिंतीवर ओघळलेले पाण्याचे थेंब.कौलांच्या दोन वास्यांमध्ये अडकलेले गवताचे भारे.खिडकीत ठेवलेल्या म्हणजे उरलेल्या तंबाखू आणि चुन्याच्या दोन डब्या.भिंतीवर उलटा लटकवलेला मोठा कोयता आणि कोपर्यात पडलेले लुगडयाचे बोचके यापलीकडे दिवाणखान्यात काहीच नव्हते.कुतूहल हळूहळू शंकेत बदलू लागले होते.आणि तेवढ्यात चिंतनने शांततेचा भंग केला.

'चला जेवून घेऊ' या वाक्याने आम्ही भानावर आलो.व्हारांड्यात असलेल्या लाल मातीवर वर्तमानपत्र पसरून आम्ही जेवायला बसलो.जेवायचे आधीच मांडून ठेवले होते.ताम्हीणीत खाल्लेल्या पोह्यानंतर आत्ताच खाण्यासाठी तोंड उघडले असल्याने सपाटून भूक लागली होती.अनुभवलेल्या गेल्या तासाभराचा विचार आणि लागलेली भूक यामुळे त्या पंधरा मिनिटाच्या काळात कोणीच काही बोलले नाही.

काय दशा केलीये वाडीची' या चिंतनच्या वाक्याने आमचे जेवण झाले.सोन्यासारखे घर आज बेवारस पडलंय.गेल्या आठ वर्षात काय काय पाहिलंय या भिंतींनी हे यांनाच माहीत.आणि आता तुम्ही आलाय इथे विचार करून भयपटाची गोष्ट लिहायला योगायोग कि नशीबकाय म्हणावं कोण जाणे.एवढं बोलून तो ताटं उचलून घरामागच्या विहिरीला निघाला.चिंतनच्या या शेवटच्या वाक्याने मी सुन्न झालो होतो.इतक्यावेळ असणारी अनाकलनीय गूढता अजूनच गर्द झाली होती. आम्ही शेजारच्या कळशीतून पाणी घेऊन हात धुतले.

दोन वाजून गेले होते.तापलेल्या कौलानमुळे आत देखील गरमी जाणवायला लागली होती.पण बाहेरच्यपेक्षा बरंच सुसह्य होते.केवळ शांतता होती म्हणून आम्ही आपापसात देखील हळूच आवाजात बोलत होतो.वास्तविक हळू बोलायची गरज नव्हती.पण सभोवतालच्या वातावरणाचा प्रभाव असावा.निरव शांतता होती.अगदी कधीतरीच मागच्या वाडीत एखादा शहाळ्याचा नारळ निसटून पडला तरच त्याचा आवाज होता.टळटळीत दुपार असल्याने पक्षांचा मागमूसही नव्हता एकूण काय तरशुकशुकाट
  
चिंतन भांड्यांच आटपून विहिरी शेजारी असलेल्या पंपाच्या छताखाली पहुडायला गेला.जाताना आवर्जून सांगितले'पोरांनो उगीच भलती सलती कडे भटकू नकाअडनीडी वेळ आहे,जागाही अपरिचित'. मला भर उन्हात शिरशिरी जाणवली.आमच्यातले दोघेजण तिथेच सुस्तावले.तिसरा मोबाईल घेऊन गाडीत झोपायला गेला.आणि मी माझा कॅमेरा घेवून बाकीचे घर आणि मागची वाडी बघायला निघालो.

स्वयंपाकघराच्या समोर असलेली बंद खोली सोडून मी पुढे निघालो.उजव्या हाताला बागकामाची हत्यारे अडगळीला पडली होती. जाणो आत काय काय पाहायला मिळेल.काहीही हलवता मी पुढे गेलो.एक वाट मागच्या वाडीत जात होती.डाव्या हाताला न्हाणीघर होतं.त्याच्या विरुध्द बाजूला भारतीय बनावटीचे संडास होते.ज्याच्या खिडकीतून झाडाची फांदी डोकावत होती आणि  दरवाजाचा पत्ताच नव्हता.न्हाणीघराला लागुनच मोठा पितळी बंब ठेवला होता.चार पायांचा बंब होता ज्याचे मागचे दोन पाय निम्मे जमिनीत घुसले होते आणि तो कलंडला होता.बंबाच्या वर असलेला धूर जाण्याचा काळा दंडगोल कोळ्याच्या जाळ्यांनी व्यापला होता.दोन तीन लाकडाच्या मोळ्या इतस्ततः विखरून पडल्या होत्या.



तिथूनच पुढे वाडी सुरु होत होती.वाडीचे रुपांतर गर्द झाडीत झाले होते.निगा घेतल्याने वेडी वाकडी वाढलेली झाडे आणि त्याला छेद देत आकाशात घुसलेली नारळाची झाडे.फक्त चौकोनी फारश्या घालून केलेला रस्ता तेवढा ओळखू येत होता.बाकी दुतर्फा जंगल.शेजारी पडलेल्या पोफळीच्या लाकडाने माजलेले तण बाजूला सारत फरशीच्या वाटेवरून थोडे वाडीत शिरलो.उजव्या हातात कॅमेरा,डाव्या हातात काठी आणि दमट हवेत असल्याने पाठीमागून चिंब भिजलेला शर्ट अशा अवतारात ,मी पुढे गेलो.साधारण पन्नास पावले आत गेल्यावर क्षितिजावर समुद्राचा पृष्ठभाग दिसू लागला होता.

दिवस मावळतीला झुकला होता.मी मागे फिरलो.वाडीतून बाहेर आलो आणि घरच्या मागून उजव्या बाजूने प्रदक्षिणा सुरु केली.लाल मातीवर वाढलेले तण बाजूला सारत आणि घराचा बाह्यभाग न्याहळत मी पुढे चालत होतो.दणकट गजांच्या खिडक्या.तुटलेली तावदानं,विखुरलेली कौले,शेणाने सारवलेल्या भिंतींचे उडलेले पोपडे आणि जीर्ण झालेल्या लोखंडी दरवाजांच्या कड्याकोयंड्याचे गंजलेले अवशेष याखेरीज पाहण्यासारखे काहीही नव्हते.खिडकीच्या बाहेरच्या बाजूने आलेल्या पाण्याच्या ओघळामुळे तयार झालेल्या काळपट रेषा आणि वर्षानुवर्षे लावलेल्या आकाशकंदीलाची आता फक्त धुळीने माखलेली वायर आणि लटकवलेली तार तेवढी शिल्लक होती.डाव्याबाजूला सरपण म्हणून कोणेएकेकाळी रचलेली लाकडे होती.काही भाग वाळवी लागून भुसा झाला होता.तर काही तशीच शिल्लक होती.त्यातले एखादे जरी लाकूड धक्का लागून हलले तर फुरुसे किव्वा घोणस सरपटत येईल कि काय अशी परिस्थिती.



फिरून मुख्य दारापाशी आलो.झोपलेली लोकं बहुदा उठली असावीत असा समज करून आत जायचे ठरवले.कॅमेरा गुंडाळून ठेवला.

मे महिन्याच्या उत्तरार्धाची संध्याकाळ.साधारण साडेपाच वाजण्याची वेळ.विसावलेली उन्ह.आपसूकच ढगामागे जाणाऱ्या सूर्यामुळे होणारा निमिशार्धाचा काळोख.आणि दिवस संपल्याची जाणीव करून देणारी थकलेली संध्याकाळ.शेवटच्या उन्हाच्या तीरीपेने देखील निरोप घेतला.अंधार आणि समुद्रावरून झेपावणारा थंड खारा वारा यांनी ताबा घ्यायला सुरुवात केली.मी दार ढकलून आत गेलो.
एव्हाना सव्वा सहा वाजून गेले होते.तिन्ही सांजेची वेळ होती.अंधाराने माखलेला संधिप्रकाश सर्वत्र सांडला होता.


आत आलो तेव्हा चिंतन उठला होता.परसात असलेल्या हापशाला पाणी नसणे स्वाभाविक होते.सकाळी कळशीमधून आणलेल्या पाण्याने तोंड धुवून त्याच परसात चिंतनने चूल लावली.'एवढं विस्तीर्ण घर असूनही परसात चूल लावावी लागतीयेकाय दशा झालीये घराची '.चिंतन विस्तवाला वारा घालत पुटपुटला.

बाकीचे पण एक एक करत उठले.पडवीत येवून पाचही जण चहा घेत बसलो.झपाट्याने अंधार पडत चालला होता.आम्ही चौघे आता परिस्थितीला सरावलो होतो असे वाटून जरा विसावलो.चहा झाला.दिसेल ती गोष्ट न्याहाळण्याची सवयच लागून गेली होती.आता जो काही नैसर्गिक प्रकाश शिल्लक होता तो केवळ परसात होता.तसा बाकी सगळा अंधारच.शहराच्या प्रदूषणापासून लांब असल्याने डोक्यावर नक्षत्रांचे देणे होते.सिग्नल नसलेल्या मोबाईल फोनचा उजेड आणि पेटवलेली चूल या दोन प्रकाश स्त्रोतांवर रात्र सरकत होती.

चिंतन आतून कंदील घेवून आला आणि आमच्यात येउन बसला.माझ्या शेजारी बसलेल्या मित्राने सहज विचारले कि 'चिंतन हे एवढं मोठं घर साठ्ये काकांनी दुर्लक्षित का केलंय ?…म्हणजे निदान व्यवस्थित देखभाल तरी' चिंतनने खुणेनेच त्याला थांबवले कंदील खाली ठेवला आणि कपाळावरचा घाम बाहीने टिपत आमच्याकडे पहात राहिला.

'हे असले भलते सलते प्रश्न विचारण्यापेक्षा रात्रीच्या जेवणाला काय करायचं ते सांगालवकर बनवलं तर आवरा आवरीला उशीर नाही व्हायचा.' एवढा बोलून तो पाठमोरा झाला.

आम्ही चौघेही हातातल्या कपासहित स्तब्ध झालो.आमच्या कथेतल्या नायकाची अंधुक होत जाणारी आकृती चुली मागून निमुटपणे लांब गेल्याची जाणीव मला होत होती.

                     कोणीही नाहीये या पेक्षा कोणीतरी आहे याची भीती जास्त वाटत होती…   

हृषिकेश पांडकर
०५.१०.२०१५