Sunday, November 7, 2021

हुरहुर..

 रविवारची संध्याकाळ ही तशीही जरा उदासीन वाटत राहिली आहे. कुठे तो शुक्रवारच्या संध्याकाळचा तोरा, कुठे ती शनिवारची बेफिकीर संध्याकाळ आणि कुठे ती सोमवारच्या कामाचं ओझं वाहणारी, शनिवारच्या आनंदाचं चिंतन करणारी संथ सरणारी रविवार संध्याकाळ.

आज तशीच संध्याकाळ. पण ही कटुता जरा जास्तच जाणवली. मागचा संबंध आठवडा दिवाळी येणार या तयारीत अलगद सरला. दिवाळीचे चार दिवस आले म्हणेपर्यंत निसटले. दिवाळी या तीन अक्षरात सामावलेला तो उत्साह संपताना उगीचच रुखरुख लावून गेला. पुढल्या वर्षी हीच दिवाळी परत येणार हे पक्क माहीत असून देखील भाऊबीजेसोबत हा मंगल सोहळा क्षणार्धात संपल्याची एक भावना माझ्या रविवारच्या संध्याकाळ वर अजूनच गडद भासत होती.

पहिल्या दिवशी लालबुंद मातीचा असलेला किल्ला आज असंख्य भेगांनी भग्न वाटत होता. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी रेखाटलेली रांगोळी पायाच्या धक्क्याने काहीशी फिस्कटलेली आणि रात्रभर जळलेल्या आणि ओघळलेल्या पणातीमधील तेलाच्या थेंबांनी विखुरलेली बघवत नव्हती. कंदील तेवढा दिवाळीची आठवण जपत होता पण अवेळी पावसाच्या भेटीने निसतलेल्या काही झिरमिळ्या उगीचच अस्वस्थ करून जात होत्या.

मित्रमंडळी आणि नातेवाईक यांच्या फराळाच्या आलेल्या पिशव्या तशाच टेबलवर कोपऱ्यात निपचित होत्या. चव चाखावी या भावनेपेक्षा संपतील का हाच प्रश्न कदाचित विचारात होत्या. गेले ५/६ दिवस गोडाच खाणं होतंय तर आज मुगाची खिचडीच करू या वाक्यात असलेली तुलना उगीचच नकोशी वाटत होती. ज्या टेबल वर बहिणींची गिफ्ट्स काढून पसरून ठेवली होती उद्या तिथे परत लॅपटॉप येणार ही गोष्टच पटत नव्हती.

माहीत आहे आणि होतंच की दिवाळी पाचच दिवसांची आहे, दरवर्षी आहे तरीही संपताना होणारी घालमेल इतकी टोकाची का असते ? कदाचित हीच लागलेली हुरहुर पुढल्या दिवाळीची ओढ म्हणून काम करत असावी. 'पुढच्या वर्षी लवकर या' असं बाप्पाला ओरडून सांगताना जी अवस्था होते ना तशीच काहीशी गत माझी दिवाळीत लावलेल्या दिव्यांची माळ उतरवताना होते..

काय जादू आहे या आपल्या सणात हे शब्दात व्यक्त होणे जरा कठीणच पण वर्षभर वाट पाहावी असे सण आपल्या वाटेल आले हे आपले भाग्यच..

माझी रविवार संध्याकाळ याच विचारात सरली..शेवटी कॅलेंडरच पानचं ते, उलटलं आणि दिवस सरला..आठवणी साठवत पुढे सरकायचं त्यातही एक वेगळीच मजा आहे नाहीका ?

उरलेला फराळ आणि उद्यपासून सुरू होणारे ऑफिस काम या दोन्हींची विल्हेवाट लावण्याची मानसिक उभारी तुम्हास लाभो अशी मनापासून प्रार्थना करून मी माझा हा रविवार संपवतो 

- हृषिकेश पांडकर ,

०७.११.२०२१

 

Friday, November 5, 2021

दीपावलीच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा..

 सलग दोन मॅचेस हरल्यावर आपण जसे थाटात अफगाणिस्तान बरोबर जिंकलो आहोत ना अगदी तसेच एक वर्ष दिवाळी लो प्रोफाइल गेल्यावर यावर्षी लोक थाटात साजरी करत आहेत. मागच्या वर्षीची कसर व्याजासाहित वसूल होणार हे तर निश्चित आहेच.

आत्तापर्यंत निम्मी दिवाळी झालीये, वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन. आज पाडवा आणि यानंतर भाऊबीज आहे. बलिप्रतिपदा वगरे पण दिवाळीचा भाग समजला जातो पण फोटो काढावे असं या दिवसात काहीच नाही.

तर सांगायचा मुद्दा असा आहे की केवळ ३ दिवसात माझ्या मोबाईलच्या फोटो गॅलरीने हात टेकलेत.

फोटो कोणी कसे किती आणि कोणते टाकावे याबद्दल माझा कुठलाच आक्षेप नाही किव्वा माझं काही म्हणणं पण नाही. फक्त त्यातून आपण आपलं मनोरंजन कसं करून घ्यायचा हा एक मजेशीर भाग आहे.

कॅलेंडरवर विकत आणल्यापासून छापलेले दिवाळीचे दिवस लोक स्नुझ केलेल्या अलार्म सारखे रोज टाकत आहेत. आकाशकंदील, पणत्या आणि फटाके यांचे फोटो डिलिट करेपर्यंत देव दिवाळी येईल इतपत त्यांची संख्या झालीये.

या उलट काही लोक असतात जे 'सेम टू यु' या तीन शब्दात आपली दिवाळी उरकतात. ही तीच लोकं असतात ज्यांचा आकाशकंदील ७/८ वर्षांपासून एकच असतो.

घरी केलेल्या किल्ल्याचे फोटो, रांगोळी रोज वेगळी असल्याने तो रोज टाकणे क्रमप्राप्त आहेच. रांगोळी असल्याने त्यावर पणती लावताना शक्य तितके सुंदर दिसताना काढलेला फोटो गणेशोत्सवात काढलेल्या घरच्या मोदकाच्या तोडीचा असतो. त्यामुळे तो पाठवणे याला पर्याय नाही. बरं साडी तीच आणि नेसलेली व्यक्ती तीच पण पुढल्या फोटोत आकाशकंदील असल्याने त्या फोटोला सुद्धा पर्याय नाही. या नंतर अजून एक मोठा वर्ग आहे जो फुलबाजी धरलेल्या लहान मुलांचा फोटो टाकतात. पुन्हा सांगतो आक्षेप नाही पण जेव्हा असे फोटो काढणार असाल तेव्हा थोडा विचार करा, त्या फुलबाजीच्या प्रकाशात निरागस हसणारा चेहरा येतच नाही. त्यामुळे तो फोटो तेवढा नीट काढा. काही फोटोत तर पोरग घाबरून असतं पालक फोटो काढून पाठवायला मोकळे असतात.

जेव्हा रांगोळीच्या मधोमध पणती ठेवली जाते तेव्हा पणतीचे तेल रांगोळीच्या रंगात बेमालूम मिसळते. तर या तेलकट रांगोळीचा फोटो तुम्ही नक्की टाळू शकता.

कुटुंबातील कर्ता पुरुष छान आकाशकंदील लावतोय, पोरगं किल्ला करण्यासाठी विटा वाहून आणतय असं चित्र असलेली जाहिरात कधी पहिली आहे का ? जाहिरात किव्वा शुभेच्छा यामध्ये फक्त वाढीव सुंदर संतूर मम्मी कडक साडीत रांगोळी जवळ बसलेली असते. दाराला मस्त कंदील असतो.सासू सासरे कौतुकाने सुनेकडे पहात असतात. कुंपणावर ओळीने पणत्या लावलेल्या असतात.

ही तर सुरुवात आहे..आज पाडवा आहे त्यामुळे रात्री जोड्यांच्या फोटोचा पूर यायची शक्यता आहेच. आजचा बायकोचा किव्वा नवऱ्याचा फोटो उद्या अनुक्रमे बहीण किव्वा भावात बदलणार हेही तितकेच खरे.

फोटो टाकणे यात काहीच गैर नाही पण मला फोटो टाकण्यापेक्षा बघण्यात मला जास्त मजा येते म्हणून हे लिहिण्याचा खटाटोप.

भरपूर फोटो काढा..भरपूर फोटो टाका..

संस्कृतीचे डिजिटल प्रतिबिंब आज पहायला मिळेल. हल्ली सणांची हीच मजा असते. आपल्या घरी जरी शांतता असेल तरी बाकीच्या मंडळींकडे साजरा होत असणारा सण जणू आपल्याच घरात होतोय असे वाटण्या इतपत आपण सर्वाशी एकरूप झालोय...

दीपावलीच्या सर्वांना पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा..

- हृषिकेश पांडकर

 

Saturday, August 7, 2021

गोड 'सायोनारा'

 राष्ट्रगीत खऱ्या अर्थाने शोभून दिसेल अशा खूप ठराविक जागा आहेत. प्रत्येक शब्द तोलून धरता येतील असे प्रसंग देखील फार कमी.

वर जाणारे सीट सांभाळत सिनेमा गृहात ऐकलेले राष्ट्रगीत आणि तीन पायऱ्या असलेल्या पोडीयम वर मधल्या उंच पायरीवर उभे राहून बाकीच्या देशांच्या तुलनेत किंचित वर सरकणारा तिरंगा पहात कानावर पडणारे राष्ट्रगीत यांची तुलना होणे नाही.


 

'सायोनारा' इतका गोड कसा असू शकतो !

मनापासून शुभेच्छा !

खूप कौतुक !

 

Thursday, June 24, 2021

हुलकावणी ते गवसणी ..

हरण्याचं दुःख कोणाला होत नाही ? तो ही एखाद्या विश्वकरंडकाचा अंतिम सामना. दुःख आहेच. आपला संघ चांगला खेळाला नाही, मोक्याच्या क्षणी कच खाल्ली, फलंदाजांनी अपेक्षाभंग केला,झेल सुटले, हवामानाचा अंदाज कदाचित चुकला आणि अशी अनंत कारण देता येतील. पण या दुखापलीकडे देखील एक सुखावह गोष्ट आज जाणवली ती म्हणजे न्यूझीलंड सारख्या संघाचा मोठा विजय.

सय्यमी आणि सरळ कर्णधार केन विलियम्सनच्या संघाचा विजय हा आपल्या पराभवावर फुंकर मारणारा ठरला. २०१९ च्या विश्वकरंडकाच्या अंतिम सामन्यात केवळ बाह्य नियमांचा फटका बसून एका मोठ्या स्वप्नपूर्तीपासून वंचित असलेला संघ तितक्याच जिद्दीने आणि जोमानं आज टेस्ट चॅम्पियनशिप मिरवतोय ही गोष्ट खूप सुसह्य वाटतीये.


 

जितका आनंद आपण जिंकल्यावर झाला असता तितकाच आनंद न्यूझीलंड जिंकल्यावर झाला अशातला भाग नाही पण तुल्यबळ संघ जिंकला आणि किंबहुन खऱ्या अर्थी वरचढ संघ जिंकला हे महत्वाच. याच जागी आपल्या विरुद्ध ऑस्ट्रेलिया किव्वा इंग्लंड जिंकले असते तर त्याचे कौतुक मला इतके नक्कीच वाटले नसते. पण २०१९ च्या फायनलची सल आज किवींनी भरून काढली याचा आनंद जास्त.

धावा,बळी, शतके या तांत्रिक गोष्टींचा विचार मी करतच नाहीये पण एक संघ म्हणून न्यूझीलंड जिंकले याचे समाधान आहे.कुठलाही गाजावाजा न करता फायनलला आलेला संघ. स्टार प्लेयर अशी बिरुदावली मिरवणारा एकही खेळाडू संघात नाही तरीही खेळाच्या तीनही अंगात मजबूत आयुध बाळगणारा संघ.

हातातोंडाशी आलेला यश केवळ नशिबात नसल्यामुळे हुलकावणी देऊन जातं आणि त्यात यत्किंचितही खचून न जाता त्याच अपयशातून भरारी घेत त्याच तोडीच्या स्पर्धेत विश्वविजेतेपद मिळवणे हा प्रवास नक्कीच सोपा नसणार.

आपल्या पराभवाची सल व्यक्त करत बसण्यापेक्षा समोरच्या संघाच्या जिद्दीचे कौतुक आणि विजयाच

अभिनंदन

करणे रास्त वाटले म्हणून हा लेखन प्रपंच.पांढऱ्या स्वच्छ पोशाखातील अनभिषिक्त सम्राट आणि खऱ्या अर्थी सिकंदर ठरलेल्या विलियम्सन आणि त्याच्या सर्व वीरांचे मनापासून कौतुक आणि

अभिनंदन

...

तेव्हा पराभव ओशाळला होता..आज विजयाला अभिमान वाटला असणार यात शंका नाही !!!

हृषिकेश पांडकर

२४.०६.२०२१