Thursday, March 11, 2021

Chameleons - One of the most popular reptile pets.

 रंग बदलू गीरगीट

सरड्यासारखे रंग बदलणे ही म्हण जरी प्रचलित आणि वापरात असली तरी प्रत्यक्षात रंग बदलणारे सरडे पहायचा योग फारसा आला नाही. किळस वाटणे किव्वा घाबरणे यामुळे तसा दुर्लक्षित झालेला प्राणी अशी काहीशी याची ओळख.


 

सरड्यांमध्ये अनेक प्रकार असतात हे वयपरत्वे समजत गेले. वर असलेला फोटो आणि आपण बागेत किव्वा भोवताली बघतो तो सरडा यांच्यात फरक आहे. लिझर्ड आणि 'chameleon' हा तो फरक. फोटोत जो आहे तो chemeleon. दोन्ही प्राणी रंग बदलतात. पण हा chameleon मात्र आपल्या चकली सारख्या शेपटीमुळे लक्षात राहतो. निशाचर असल्याने दिवसा सहसा पहायला मिळत नाही.

अजून एक मजेशीर माहिती समजली ती म्हणजे सापाप्रमाणे हा प्राणी देखील कात टाकतो. मात्र साप जशी संपूर्ण आणि एकसंध कात टाकतो तशी हा टाकत नाही. याची कात तुकड्या तुकड्यात असते. असो , तर कात टाकणे आणि रंग बदलणे या दोन्ही गोष्टी या प्राण्याकडून माणसापर्यंत आल्या हे महत्वाचे.

रात्री झाडाच्या फांदीला आपल्या चारही पायांनी बिलगून बसलेला हा जीव शोधणं फारसं कठीण नाहीये करण त्याचा असलेला आकार आणि रंग. संथ गतीने डोळ्याचे बुबुळ फिरवणारा आणि भोवतालचा अंदाज घेऊन शेपटीची चकली करणारा छोटा जीव पहायला मजा येते.

'सरड्यासारखे रंग बदलणे' या म्हणीमुळे हा प्राणी जितका बदनाम झाला आहे प्रत्यक्षात तसं काहीच नाहीये. कारण सरड्याचे रंग बदलणे आणि त्या म्हणीतील रंग बदलणे या भावार्थात,उपयोगात कमालीचा फरक आहे.

लोकवस्ती पासून काहीस दूर जर रात्री फेरफटका मारणार असाल तर मध्यम उंचीच्या झाडावरील फांद्यांमध्ये नक्की लक्ष ठेवा. अनेकविध रंग धारण करणारा हा chameleon नक्की पहायला मिळेल.

हृषिकेश पांडकर

११.०३.२०२१

Chameleon | Bhigvan | March '21

 

Friday, February 5, 2021

निरागस

 बालपणातील रूप खऱ्या अर्थी निरागस असतं असं म्हणतात मग ते मनुष्याचे असो की वन्य प्राण्याचे. त्यात ते मोकळं आणि स्वैर असलं तर अधिकच खुलत असावं.

मांजराची जातकुळी असल्यामुळे रंगीत आणि गुबगुबीत कापसाचा गोळा भासावा असे ते दृश्य.


 

आईच्या निगरणीमध्ये बेफिकिरीत रस्ता ओलांडणारी ही पिल्लं या लाकडी ओंडक्यावर बाललीला दाखवत होती. समवयस्क असल्याने अंगापिंडाने देखील साधारण सारखीच. नकळत एकमेकांसमोर उभी ठाकल्याने एकाने आरश्यात आपले प्रतिबिंब पहावे अशी काहीशी मुद्रा.

कॉर्बेट सारख्या विस्तीर्ण जंगलात असे क्षण तसे दुर्मिळच. सकाळची थंडी विसाव्याला निघण्याच्या वेळी डोकावलेली तिरकस उन्ह झेलत मार्गक्रमण करणारे हे कुटुंब माझी सकाळ तेवढी उबदार करून गेले याचे समाधान अधिक.

जंगल कायमच आनंद देते. त्यात हे क्षण आठवणी म्हणून कैद होतात. गेल्या संबंध वर्षाच्या पार्श्वभूमीवर या वर्षाची सुरुवात तरी निश्चितच सुखावह झाली. बघुयात पुढे काय काय कसे कसे पहायला मिळतंय..

गेल्या वर्षाचा शीण झटकण्यासाठी जंगलात जायची इच्छा असेल तर जिम कॉर्बेट ला जायचा नक्की विचार करा कारण दिल्ली जवळ असूनही राजकारणाची बाधा अजूनही न झालेल्या जागा तशा कमीच..आणि त्यातलीच ही एक. रामगंगा नदी ओढणी सारखी अंगावर घेणारं हे कॉर्बेट जंगल कायमच जवळचं वाटत राहतं. 

- हृषिकेश पांडकर

 

Monday, January 11, 2021

स्मरणातलं क्रिकेट.

शतकाला टाळया घेतं ते क्रिकेट असतंच... पण

निव्वळ २३ आणि ३९ धावा जमवून संबंध देशाची छाती अभिमानाने फुगवणार क्रिकेट जास्त लक्षात राहतं..


 

शाब्दिक चकमक,स्लेजिंग आणि मैदानावरील इतर गैरप्रकार हे क्रिकेट असतंच... पण

सगळ्या गोष्टींचा मारा समोरच्या संघाकडून होत असताना जिद्दीने आणि चित्त विचलित होऊ न देता थोपवून त्यावर मात करणारे क्रिकेट जास्त लक्षात राहत...

डावाने विजय,एकतर्फी विजय आणि निर्भेळ यश हे क्रिकेट असतंच...पण

जवळजवळ पराभव निश्चित असताना प्रतिस्पर्धी संघाचा भेदक मारा समर्थपणे थोपवून सामना वाचवणारे क्रिकेट जास्त लक्षात राहत..

कसोटीच्या शेवटच्या दिवशी आणि तेही ऑस्ट्रेलियामध्ये आपली गत काय होते हे सर्वश्रुत क्रिकेट असतेच.. पण

त्याच ऑस्ट्रेलियात, त्याच चौथ्या डावात आणि त्यांच्या भक्कम माऱ्या समोर तंबू ठोकून केलेली सामना वाचवणारी सय्यमी खेळी जास्त लक्षात राहाते..

ऑस्ट्रेलियात सामना चालू असताना सकाळी थोडे उशिरा उठलो की आपल्या संघाची असलेली दयनीय अवस्था हे क्रिकेट असतंच..पण

पण सकाळी उशिरा उठून सुद्धा सुस्थितीत असलेली फलंदाजी पाहणे हे क्रिकेट जास्त लक्षात राहत..

ऑस्ट्रेलियात ४०० धावांचा पाठलाग करत सामना वाचविण्याची स्वप्न पाहणेही जिथे दुरापास्त असते हे सवयीचे क्रिकेट होतेच... पण

दीड दिवस खेळून एक वेळ विजय मिळवण्याची स्वप्न बाळगून सुखरूप वाचविलेला सामना जास्त लक्षात राहतो..

अधिक धावा किव्वा बळी मिळवणारा सामनावीर होतो हे क्रिकेट नित्याचे आहेच...पण

यातील काहीही न करणारे देखील खऱ्या अर्थी सामनावीर ठरतात हे पाहणे जास्त लक्षात राहते..

आशिया बाहेर खेळताना मालिका वाचवावी किव्वा बरोबरीत काढावी याच्या तयारीने शेवटचा सामना खेळणे हे क्रिकेट नित्याचे...पण

कांगारुंच्या भूमीवर त्यांच्यावर ही वेळ आणत शेवटच्या सामन्यासाठी तयारी करणे हा क्षण जास्त लक्षात रहातो..

काही क्षण सवयीचे आणि नित्याचे असतात..पण

काही नकळत घडून जातात आणि कायमचे स्मरणात राहतात ..

- हृषिकेश पांडकर

११.०१.२०२१