Monday, May 7, 2012

स्वप्नवत झोप ...


    
        रात्र झाली म्हणून झोपतोय आणि सकाळी झालीये म्हणून उठतोय किव्वा झोप आलीये म्हणून झोपतोय आणि जाग आलीये म्हणून उठतोय हे इतके साधे सरळ समीकरण आहे झोपेचे.झोप या विषयावर लिहिण्यासारखे फार काही आहे किव्वा फार काही असेल असे मला कधीच वाटले नव्हते किव्वा असे वाटण्याची वेळच आली नव्हती.पण अशा अनेक गोष्टी आहेत ज्या कायम आपल्याबरोबर असतात आणि म्हणूनच आपण त्यांचा फारसा विचार करत नाही.त्यापैकीच झोप हि गोष्ट आहे.
        झोप या विषयावर विचार करावा असे वाटण्यासाठी प्रसंगच कारणीभूत होता.रविवार व्यतिरिक्त आलेल्या सुट्टीवर माझे विशुद्ध प्रेम आहे.अर्थात प्रत्येक वेळी आपले प्रेम  आपल्याला मिळतेच असे नाही.पण जेव्हा मिळते तेव्हा ते मी जीवापाड जपतो.तर अशाच एका रविवार व्यतिरिक्त मिळालेल्या सुट्टीच्या दिवशी दुपारी झोपण्याचा योग आला होता.आणि घड्याला भोवती खोखो खेळणाऱ्या माझ्या दिनक्रमाला जरा timeout मिळाला.
       गोडाच्या जेवणानंतर दुपारी झोपलो होतो त्यामुळे भरलेले पोट आणि फिरणारा पंख यांच्या उपस्थितीत संध्याकाळ  कशी झाली हे समजलेच नाही.झोपेतून उठलो आणि तसाच उठून गादीवर बसलो.तेव्हा डोक्यात विचार आला कि सकाळी येणारी जाग आणि आत्ता आलेली जाग  यात जमीन आसमानाचा फरक आहे.आणि याच विचारातून झोपेचे विविध प्रकार माझ्या डोळ्यासमोरून जाऊ लागले.
      खरच असे लक्षात आले कि झोप आल्यावर आपण झोपतो आणि जाग आल्यावर आपण उठतो
किव्वा बर्याचदा उठावे लागते या पलीकडे आपण झोपेचा फारसा विचार  करत नाही.हल्ली कदाचित पुरेशी झोप मिळावी म्हणून सांगितले जाते या पालीकाकडे फार नाही. पण परवाच्या त्या विचारानंतर माझे माझ्याबाबती तरी ठाम मत झाले आहे कि झोपेचे अनेक प्रकार आहेत आणि त्या प्रत्येक प्रकारची एक वेगळी ओळख आहे


        
रोजची झोप हा काही फार वर्णनाचा विषय असण्याची गरज नाही.पण बुधवारी रात्री लागणारी झोप आणि शनिवार रात्री लागणारी झोप यात कमालीचा फरक आहे हे  नक्की,अर्थात बुधवारी रात्री लागणारी झोप,शनिवारी रात्री लागणारी झोप आणि रविवारी रात्री लागणारी झोप या तीनही गोष्टींमध्ये प्रचंड विरोधाभास आहे.  एवढेच नाही तर आपल्या स्वतःच्या घरी आणि दुसर्या कुठल्याही जागी लागणारी झोप यात प्रचंड तफावत आहे.
       
रात्रभर गाढ झोपून सुद्धा आईने हाक मारल्यावर ' मिनिटे' असे म्हणून त्यानंतर जी झोप लागते त्याची तुलना आधीच्या तासंबरोबर करणे मला योग्य वाटत नाही.
        दुपारची झोप मस्त झाली याचा अर्थ जेवल्यानंतर मी लगेच झोपलो आणि बरोब्बर चहाच्या वेळेला मला जाग आली आणि उठताना उठायचा कंटाळा आला नाही असा आहे असे मी समजतो.पण कधीकधी दुपारची झोप इतकी होते कि झोपताना      असलेल्या उन्हाची जागा अंधाराने घेतलेली असते आणि संध्याकाळचा चहा आणि
रात्रीचे जेवण यांच्यातला दुरावा नाहीसा झालेला असतो.अशा वेळी दुपारची झोप
या व्याख्येची मजा नाहीशी होते.
         आम्रखंड किव्वा गुलाबजाम कितीही खाल्ले तरी दुपारचा चहा हा वेळेवरच जेव्हा होतो तेच दुपारच्या झोपेचे यश आहे.     
         
प्रवासातली झोप हा पूर्णपणे वेगळा विषय आहे प्रवासातील झोपेचे यश हे वाहनावर अवलंबून असते असे माझे स्पष्ट मत आहे,कारण समोरच्या सीट वर किव्वा बार  वर हात ठेऊन मला आजतागायत झोपता आलेले नाही आणि जोपर्यंत डोके कुठे टेकत नाही तोपर्यंत झोपेची शक्यताच निर्माण होत नाही हा माझा निष्कर्ष आहे.झोपताना खिडकीच्या फटीतून येणारा वारा,उन किव्वा पाऊस या गोष्टी अनुक्रमे वारा,उन किव्वा पाऊस यामध्ये जाऊन झोपण्यापेक्षा देखील त्रासदायक
    आहे.पाय  किव्वा डोके या पैकी एकही अवयव जर अधांतरी असेल तर मी प्रवासात
झोपू शकत नाही यावर मी ठाम झलोय. असह्य उकाडा आणि असह्य थंडी या दोन गोष्टींमध्ये झोपणे किव्वा झोपेचा प्रयत्न करणे हे खरच जिकीरीचे काम आहे.कारण उकड्यामध्ये गरमी टाळण्यासाठी
एका  कुशीवरून दुसर्या कुशीवर होणे किव्वा फार तर फार काही ठराविक वेळानंतर उशी उलटी करून त्यावर झोपणे या पलीकडे मी काहीही करत नाही.आणि थंडी मध्ये चुकून खालच्या बाजूने पाय पांघरुणाबाहेर आला तर त्या सारखे झोपेचे दुर्दैव नाही आणि पर्यायाने माझे.
           थंडी मध्ये पांघरुणात कमी कमी हालचाल करणे या एका तत्वावर मी संपूर्ण रात्री झोपून काढतो.त्यामानाने पावसाला हा ऋतू झोपेमध्ये काही बाधा आणू  शकत नाही हा  अतिशय समविचारी निर्णय असू  शकतो.थंड केल्याने आकुंचन पावणे आणि उष्णतेने विस्तारणे या वैज्ञानिक गुणधर्माला झोप हि गोष्ट थोबाडीत मारते.
         काही वेळेस फार छोट्या कालावधीची झोप प्रचंड आनंद आणि उत्साह देऊन जाते आणि या उलट खूप वेळ झोपून राहिलो कि उरलेला दिवस देखील अर्धझोपेत आणि निरुत्साही जातो आणि हि गोष्ट साधारणतः रविवारीच घडते.सुट्टी असून देखील लवकर आलेली जाग आणि नको तेव्हा झोपेमुळे झालेला उशीर यांच्यातील फरक वयागणिक  कदाचित कमी होतोय.पण मला असा नेहमी वाटता कि उद्या कधी उठायचे आहे याचा हिशोब करूनच आपण डोळे मिटतो.
         पांघरून अपुरे पडणे यासारखी त्रासदायक झोप नाही.एक वेळ पांघरून नसेल तर चालेल पण ते अपुरे पडणे नकोसे होते.गादी जमिनीवर घातली असताना उशी वरच्या बाजूने गादीच्या बाहेर गेल्याचा अनुभव घेतलाय ? नसेल तर घेऊ देखील नका.झोप लागल्यावर बेल वाजली, तहान लागली या गोष्टीमुळे उठावे लागणे या सारखे कटकटी अडथळे नशिबानेच येतात.
    
रात्री टीव्ही पहात असताना झोप आली तर टीव्ही रिमोट ने बंद करता येतो पण मेन स्वीच बंद करायला उठावे लागते याची जाणीव मला टीव्ही लावतानाच झालेली असते.पावसात खूप भिजून घरी जात असताना जेव्हा आपल्याला माहित असते कि आता घरी जाऊन फक्त कपडे बदलून झोपायचे आहे आणि उद्या सुट्टी आहे तेव्हा ती थंड पाण्याची उउब देखील नक्की जाणवते.
   
अंघोळ झाल्यानंतर येणाऱ्या झोपेची तुलना कशाशीच होऊ शकत नाही एवढे मात्र नक्की.अंघोळ झाल्यावर आवरून पेपर वाचत बसावे आणि फक्त headline आणि ती सुद्धा अर्धवट वाचून पेपर तसाच टाकून झोपणे आणि थेट दुपारच्या जेवणाला उठणे यालाच रविवार असे म्हणतात.काळानुसार रविवारच्या व्याख्या जरी बदलत  गेल्या असल्या तरी व्याख्येनुसार आपण बदललेच पाहिजे असे नाहीये.पण अंघोळी नंतरच्या झोपेला झोप म्हणत नाहीत तिला डुलकीच म्हटले जाते कारण ती थोड्याच वेळेची बरी वाटते मंजे जेवणं नंतरच्या कार्यक्रमाची रंगीत तालीम होईल एवढी
पुरेशी असते.
          झोप आलीये हि गोष्ट एखादे lecture,रटाळ गप्पा,सुमार pictures या वेळी प्रकर्षाने जाणवते.
संध्याकाळी जेवणाआधी आलेली झोप सर्वात भयानक वाटते कारण जेवायला नाईलाजाने उठावे लागते जे खूप जिकीरीचे होते आणि जेवणामुळे झोप उडते आणि मग नंतर झोपेचे पाय धरावे लागतात.आणि शेवटी काय जेवलो याचा हिशोब शेवटपर्यंत लागत नाही तो भाग वेगळाच.झोप येणे या पेक्षा झोप वेळेवर येणे हे जास्त महत्वाचे असते.
          
झोपेच्या बाबतीत सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्याला जाग येते आणि उठायच्या वेळेला अजून अवकाश असतो हे आपल्याला घड्याळाकडे पाहून समजते आणि आपल्याला आता परत झोपायचे आहे हे माहित असणे.माझा तर असं खूप वेळा झाला आहे कि सकाळी लवकर उठून कुठे तरी जायचा आहे आणि मला उठवण्यासाठी मित्र मला रिंग (फोन ची ) देणार आहे पण त्याची रिंग येत नाही आणि आपल्याला माहित असूनही केवळ रिंग आल्याने मी उठत नाही,थोडी निर्लज्जतेची भावना असते पण या सारखी मजा नाही.
      
रात्री लवकर झोपल्यावर सकाळी लवकर जाग येते या विचारसरणीवर माझा काडीमात्र विश्वास नाहीये.कारण रात्री लवकर झोपण्याची स्थिती आणि सकाळी  लवकर उठण्याची स्थिती यात बराच फरक पडतो.कदाचित घड्याला नुसार झोप पुरेशी होत असेलही पण सकाळी येणारी जाग हि घड्याळाच्या आकड्यात अडकलेली  नसते. झोप हि अशी गोष्ट आहे कि सर्व लोक रोज एका दिवसात इतर कामांपेक्षा जास्त वेळ नक्की करतात पण फारसा विचार करायची वेळ येत नसावी.
          कोणाला कशी झोप आवडते आणि झोपेबाद्दलाचे कोणाचे काय अनुभव आणि
विचार आहेत याची मला फारशी कल्पना असण्याची शक्यता नाहीये.पण झोप या 
विषयावर पांघरून घालणे मला मात्र काही जमले नाही.
     एवढे नक्की सांगू शकतो कि ज्याला इच्छेनुसार झोप येऊ शकते आणि मनाप्रमाणे जाग येऊ शकते त्यासारखा नशीबवान तोच.   


                                                                           -  हृषिकेश पांडकर
                                                                           - 
०७/०५/२०१२